१९००
अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे.
अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्या आहे.
श्री. काशीनाथ भैय्या सावकार यांनी हर्द्याला पट्टाभिषिक्त रामाचे छान मंदिर बांधले होते, त्याच्या उद्‍घाटनास त्यांनी श्रींना आवर्जून बोलावले होते. श्री प्रथम इंदूरला गेले. तेथे श्रीब्रह्यानंदांचे श्रींना कर्नाटकात बेलधडीस रामनवमीसाठी येण्यासंबंधी पत्र आले. श्रींनी ब्रह्यानंदांना अतिशय उद्‍बोधक पत्र पाठविले. ते पुढीलप्रमाणे आहे. "शब्दज्ञान व जगाचे महत्त्व आणि निंदा हे दोन्ही उपयोगाचे नाही. तू तर तशाचा सहवास करू नये. नास्ति कुतर्कासी वाद न करिता, अहंभावरहित, व्यवहाराचा संबंध न ठेवता, अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्या आहे, मी आपणास काय लिहावे असे नाही. पण सूचनार्थ लिहिले आहे." ( या पत्राची मूळ हस्तलिखित प्रत पाहता येईल ) श्रींनी हर्द्याला पट्टाभिषिक्त रामरायाची स्थापना केली. श्रीरामरायाचे ध्यान अतिशय सुंदर आहे. पुढे श्रीमहाराज हर्द्याहून गोंदवल्यास आले. त्यावेळी काळे नावाचे एक सरकारी अधिकार कामासाठी फिरतीवर असताना गोंदवल्यास आले. बरोबर त्यांची पत्नीही होती. ती पंगू व परावलंबी होती. श्रींचे नाव ऐकून त्यांच्या दर्शनाला ते दोघे मंदिरात आले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्रींनी त्यांचा आदरसत्कार केला व मुद्दाम येण्याचे कारण विचारले. काळे यांनी बायकोच्या रोगाची सर्व हकिकत सांगितली. तेव्हा श्रींनी तिला बरे वाटेला असे सांगून एका काढयाची औषधे सांगितली. त्यांपैकी एक औषध कोणालाच माहीत नव्हते म्हणून काळे यांनी त्या औषधाविषयी श्रींनाच विचारले.
त्यावर श्री म्हणाले, "ते औषध वाटेचा वाटसरू सांगेल." काळे गप्प बसले. बाईंना श्री म्हणाले, "माय, पुन्हा याला तेव्हा आपल्या पायांनी चालत याल." काळे टांग्यात बसले व श्रींचा निरोप घेतल्यावर टांगा चालू झाला. २/३ मैल गेल्यावर एक कुणबी रस्त्याच्या मधून चालला होता, त्याला
टांगेवाल्याने हटकले, त्यावर तो कुणबी टांग्याजवळ आला व त्याने काळे यांना औषधाचे दुसरे नाव सांगितले व चालता झाला. श्रींच्या प्रत्येक शब्दाला काय किंमत असते याची काळे यांना कल्पना आली. पुढे आपल्या गावी जाऊन तो काढा काही दिवस घेतल्यावर त्या बाईचे पाय सुटले, ती व्यवस्थित चालायला लागली. पुढे काळे पतिपत्नी गोंदवल्यास श्रींना भेटायला गेले व त्यांच्या पायावर डोके ठेवले. काळे यांचा स्वभाव जरा तापट व वादविवादप्रिय होता. श्रींशी परिचय वाढल्यावर त्यांनी आपल्याला अनुग्रह व्हावा अशी इच्छा प्रगट केली. त्यावर श्री म्हणाले, "पतिव्रतेचे लग्न जसे एकदाच लागते तसे अनुग्रह व्हायचा असतो, त्यावर माणसाने घाई करू नये, गुरूची चांगली परीक्षा करावी, त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला गुरुपद द्यावे." त्यावर काळे म्हणाले, "मला देवाकडूनच अनुग्रह पाहिजे. माणसाकडून नको, आपण तेवढी व्यवस्था करावी." श्री म्हणाले, "राम करेल तर तसेही घडेल." या गोष्टीला ८/१५ दिवस झाल्यावर काळे श्रींना आठवण करू लागले. एके दिवशी श्रींनी त्यांना स्नान करून लागले. एके दिवशी श्रींनी त्यांना स्नान करून येण्यास सांगितले. स्नान करून आल्यावर श्रींनी त्यांना रामाची यथासांग पूजा करण्यास सांगितले. पूजेच्या शेवटी "रामा, तुझे नाम तूच मला दे." अशी प्रार्थना श्रींनी त्यांच्याकडून करवून घेतली. श्रींनी एका कागदावर "श्रीराम जयराम जय जय राम " असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिकटवला आणि पाया पडून आपला उजवा कान त्याच्या तोंडाला लावा ’ असे काळे यांना सांगितले. काळे यांनी आपला कान मारुतीच्या तोंडाला लावला तेव्हा पहिली "श्रीराम " अशी अक्षरे स्पष्ट ऐकू आली. तितक्यात बाहेरच्या गलक्यामुळे मंत्राच्या पुढच्या भागाचे कुजबुजणे तेवढेच ऐकू आले. काळे यांना देवाचे नाव त्याच्याकडूनच आपल्याला मिळाले याचे पूर्ण समाधान वाटले व त्यांनी लगेच श्रींचे पाय धरले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel