१९१३
भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥
या वर्षी साजरी केलेली रामनवमी शेवटचीच होय. श्रींनी अनेकांना पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाकरिता बोलावून घेतले. "मी नैमिषारण्यात कदाचित जाईल म्हणून तुम्हाला एकदा पाहावेसे वाटते." असा प्रत्येक पत्रात मजकूर होता. त्यामुळे यावेळी रामनवंमीला पाच हजार मंडळी जमली होती. अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद सुरु होते. अर्थात सर्व समुदायाचे केंद्र श्रीमहाराजच होते. पारण्याला श्रींनी गावजेवण घातले. जवळजवळ दहा हजार पान झाले. रात्री पालखीतून रामरायांची मिरवणूक निघाली. दशमीला लोकांनी श्रींना आहेर केला. द्वादशीपासून मंडळी परत जाऊ लागली. तेव्हा प्रत्येकाला श्रींनी काही ना काही दिले. प्रत्येकाला "नाम घ्यायला विसरु नका" म्हणून आग्रहाने सांगितले. आण्णासाहेब घाणेकर यांनी एक महिन्याची रजा घेतल्याने उत्सव संपल्यावर ते तेथेच होते. रामनवमीच्या उत्सवापासून ‘आप्पा’ (वेडा आप्पा असे गावातले लोक म्हणत) श्रींच्या मागे मागे लागला. एके दिवशी राममंदिरात येऊन श्रींना आप्पा म्हणाला, " दादा, मी पुढे जातो आज्ञा द्या." श्री म्हणाले, " जा काही हरकत नाही, रामाचा प्रसाद खाऊन जा." श्रींनी त्याला आपल्या शेजारी जेवायला बसवला. परत जाताना श्रींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. दुसर्‍याच दिवशी आप्पांनी नदीकाठी देह ठेवला. श्रींचे बोलणे चालणे आता एकदम सूचक झाले होते. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. या वर्षीच्या जून महिन्यात बडव्यांच्या आग्रहावरुन श्री शंभर माणसे घेऊन पंढरपूरला गेले. गुरुपौर्णिमा तेथेच झाली. त्यावेळी श्रीब्रह्मानंद कर्नाटकातील बर्‍याच मंडळींना घेऊन पंढरपूरला आले. पूजा आटोपल्यावर श्रींनी थोडे निरुपण केले." यापुढे कोणी सांगणारा भेटो न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये, जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा. त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवावा." ऐकणार्‍या मंडळींच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. यानंतर पंढरपुरातच तुकारामबुवा वल्हवणकर या वेदात निष्णात मठपतीची श्रींशी भेट झाली. भगवंताच्या नामापेक्षा त्याचे रूप श्रीष्ठ असे ते मानत असल्याने या बाबतीत सोक्षमोक्ष लावण्यासाठी शास्त्री- पंडितांच्या उपस्थितीत मोठी सभा झाली. श्रींनी उत्तम प्रकारे सुखसंवाद करून शास्त्रीबुवांचे पूर्ण समाधान केले. ‘आजपासून माझे जीवन मी नामाला वाहून घेणार ’ असे शास्त्रीबुवा म्हणाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ते श्रींच्या पाया पडले. श्रींनी त्यांना उचलून आपल्या गळ्यातील तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. सर्व मंडळी प्रसाद घेऊन घरी माळ त्यांच्या आयुष्यातील हा शेवटचा मोठा विजय होय. पंढरपुरात रोज संध्याकाळी श्री विठोबाच्या दर्शनाला जात. गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नुसता नववा अध्याय साधकाने वाचावा. त्यात भक्तीचे रहस्य आहे - "आता आमुते गोड करूनि घ्यावे । ऐसे तांदुळी कासया विनवावे । साई खडियाने कायी प्रार्थावे सूत्रधाराते ?" या अध्यायात गीतेचे सार आले आहे. आपण बाहुली असून आपल्याला नाचविणारा परमात्मा आहे हे ध्यानात ठेवावे. आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्तमात्र आहोत याचा अनुभव येतो. पंढरपूरला येऊन श्रींना चार महिने झाले. काही ना काही निमित्त काढून श्रीब्रह्यानंदांना थांबवून घेत. निघताना "मी थोडयाच दिवसांत इहलोक सोडणार " हे श्रींनी सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांना पाणी आले. श्रींच्या पायावर मस्तक ठेवून लगेच गाडीत जाऊन बसले. सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर श्री गोंदवल्यास आले. तेथून आठ दिवसांनीच कुरवळीच्या दामोदरबुवांनी बांधलेल्या राममंदिरात दर्शनाला गेले. तेथे श्री चार दिवस राहिले. गोंदवल्यास परत आल्यावर अनेक मंडळींना खुबीने आपापल्या घरी धाडून दिले. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंतीला श्री दत्तमंदिरात गेले, तेव्हा बाळंभट तीर्थ देण्यास आले असता "अशीच सेवा भगवंताची करीत जा, तुम्हाला काही कमी पडणार नाही." त्यावर बाळंभट म्हणाले," आपण असल्यावर मला कमी कसे पडेल ?" त्यावर श्री म्हणाले, "कुणास ठाऊक किती दिवस आहे, रामाने बोलावले की मी जाणार." श्रींचा देह दिवसेंदिवस थकत चालला. डॉ. गोपाळराव जोशी यांनी श्रींची छाती तपासली. ह्रदयाची विलक्षण धडधड आढळली, पायावरची सूजवाढली, दमाही जोर करू लागला.
१७डिसेंवरला म्हसवडला नागोबाच्या यात्रेत जाऊन श्रींनी अनेक गायी कसायाच्या हातून सोडवल्या. "ही आता अखेरची सेवा " असे श्री म्हणाले. १८ डिसेंबरला बत्ताशा घोडयावरून ५/१० मैल रपेट केली संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांच्या धाकटया राममंदिरात जाऊन तेथे भात-पिटले खाल्ले. १९ डिसेंबरला शाळेचे इन्स्पेक्टर काळे यांच्याकडे भाऊसाहेबांना घेऊन श्री जेवायला गेले. रात्री नवीन कफनी घालून रामापुढे भजन निरूपण झाले. २० डिसंबरला श्रींचे चुलते संन्यासी होते, त्यांची पुण्यतिथी म्हणून धाकटया राममंदिरात वृदांवनाकडे गेले. रात्री पुन्हा १॥ वाजेपर्यंत भजन-निरूपण झाले. २१ डिसेंबरला श्रींनी सकाळी १० वाजता आऊताईंला बोलावले व सांगितले, "आता भात गावाला गेला आहे. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्यावे आणि काळ कंठावा. अंताजीपंत व काका फडके यांना म्हणाले, "आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते गोड करून घ्यावे, रामाचा प्रसाद म्हणून खावे."
संध्याकाळी ५ वाजता गोठयात गेले. पाऊणशे जवावरे होती. तेथे खुर्ची ठेवून भवानरावाला म्हणाले, "ही जागा फार छान आहे, येथेच कायम राहावेसे वाटते. आपल्या खडावा अभ्यंकरांपाशी दिल्या. रात्री पुन्हा भजनाला उभे राहिले. आयुष्यातील शेवटच्या दिवशी त्यांनी निर्वाणीचे अभंग सांगितले.
"आजवरी तुम्हा सांगितली मात । नामाविण हित समजू नका ॥१॥
मानू नका नाम साधन हे लहान । तुम्हा माझी आण जीवे भावे ॥२॥
मानू नका सार संसार असार । द्दष्य जोजार मानू नका ॥३॥
सोडू नका नाम, धरू नका काम । नाही नाही नेम आयुष्याचा ॥४॥
दीनदास म्हणे सांगतो ते ऐका । अभ्यास वैखरी सोडू नका ॥५॥
श्रींनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टाहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचे महत्त्व फार मोठे आहे, ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठया कळकळीने सांगितली. श्रींच्या बोलण्यात त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की, ऐकणार्‍या सर्व स्त्री - पुरूषांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. भजन होता होता रात्री १ वाजला. श्रींनी ह अभंग म्हटला.
सरली आयुष्याची गणना । आता येणे नाही पुन्हा ॥१॥
तुझ्या पायी मन राही । हेचि सुख आम्हा देई ॥२॥
तुझ्या पायी पडली मिठी । आता जातो उठाउठी ॥३॥
दीनदास म्हणे रघुनाथा । आज्ञा द्यावी मजाआता ॥४॥
अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला - भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला ॥१॥
आजिपुण्य पर्वकाळ । पुनः नाही ऐसी वेळ ॥२॥
रामनाम वाचे बोला । आत्मसुखामाजी डोला ॥३॥
दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रींचे शेवटचे भजन संपले. ज्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्मास आले, नामाच्या मह्त्त्वाचे जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले. श्रींनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, बुद्धीने नाम चिंतले. कया - वाचा-मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही.
२२ डिसेंबरला रात्री १॥ वाजून गेल्यावर रामाची आरती झाली. श्री सिंहासनावर बसले. रात्री दर्शनास आलेल्या मंडळींना निजावयास सांवून आपण स्वतः खोलीमध्ये आले व अंधरुणावर लवंडले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराम ‘श्रीराम श्रीराम ’ असे म्हणत उठून बसले. सिद्धासन घातले. ५। वाजता वामनरावांबरोबर शौचमुखमार्जन उरकून रामाला साष्टांग नमस्कार घातला व "माझ्या माणसांना सांभाळ " असे म्हणाले. वामनरावांनी पायावर डोके ठेवले. श्री म्हणाले, "जेथे नाम तेथे माझे प्राण । ही सांभाळावी खूण " त्यानंतर जवळच्या माणसांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. अमृतघटका सुरू झाली. श्वास जोराने बाहेर पडू लागला. ५/५० ला श्रींनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. श्री जेथून आले तेथे पुन्हा गेले. अनंतात विलीन झाले. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे येऊ पहात असताना गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य कायमचा मावळला. एका अतिदिव्य जीवन चरित्रातील हा शेवटचा अंक समाप्त झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel