श्रीगणेशाय नमः ॥

जो लावण्यामृतसागर ॥ सगुणलीला विग्रही यदुवीर ॥ मुकुटीं तेज झळके अपार ॥ शशिमित्र झांकुळती ॥१॥

दिक्चक्राचिये वदनीं ॥ तें तेज न माये गगनीं ॥ मकराकार श्रवणीं ॥ दिव्य कुंडलें तळपती ॥२॥

कीं ते अनंत विजांचे उमाळे ॥ कीं प्रळयाग्नीनें उघडिले डोळे ॥ कीं अनंत बालसूर्य उगवले ॥ प्रकाशलें स्वरुप तैसें ॥३॥

मेरुपाठारीं सुंदर ॥ वाहे सुवर्णनदीचा पूर ॥ तैसा टिळक मनोहर ॥ विशाळभाळीं झळकतसे ॥४॥

चंदनचर्चित श्यामकांती ॥ सुवासें भरलीं द्वारावती ॥ जनघ्राणदेवता नाचती ॥ निजानंदेंकरुनियां ॥५॥

मुक्ताफळांच्या रुळती माळा ॥ तेजें झांकती चंद्रकळा ॥ कीं तीं अनंत ब्रह्मांडें गळां ॥ मौक्तिकरुपें डोलती ॥६॥

ऐसा द्वारकेसी मुरहर ॥ रुक्मिणीमनचकोरचंद्र ॥ कीं तो स्वानंदामृतसागर ॥ भक्तांलागीं अवतरला ॥७॥

चोविसावे अध्यायीं चरित्र ॥ झालें रुक्मिणीचें स्वयंवर ॥ विजयी होऊनि श्रीधर ॥ द्वारावतीये पातला ॥८॥

यावरी यादव सत्राजित ॥ परम अनुष्ठानी शुचिष्मंत ॥ प्रसन्न केला तेणेंअ आदित्य ॥ बहुत तप करुनियां ॥९॥

मुख्य दैवत सूर्यनारायण ॥ सूर्यानुष्ठानें श्रेष्ठ ब्राह्मण ॥ वरकड दैवतें कल्पित पूर्ण ॥ चंडकिरण प्रत्यक्ष ॥१०॥

सूर्यमंडळ विलोकून ॥ नित्य न करिती जे कां नमन ॥ ते अभागी परम अज्ञान ॥ अल्पायुषी जाणावे ॥११॥

व्यासवाल्मीकादि ऋषी सकळ ॥ वर्णिती अद्‌भुत सूर्यमंडळ ॥ सूर्यउपासक सदा सुशीळ ॥ यम काळ वंदी तया ॥१२॥

असो सत्राजितासी सूर्यनारायण ॥ तपांतीं झाला वो प्रसन्न ॥ म्हणे इच्छित माग वरदान ॥ काय वचन बोले तो ॥१३॥

म्हणे दर्शनें पूर्ण मनोरथ ॥ ऐकोनि संतोषला आदित्य ॥ मग स्यमंतकमणि अद्‌भुत ॥ प्रसाद देत सत्राजिता ॥१४॥

नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण ॥ सूर्यासम प्रभा परिपूर्ण ॥ व्याधि सर्प व्याघ्र अवर्षण ॥ देशांतूनि दूरी जाय ॥१५॥

तो मणि घेऊनि त्वरित ॥ नगरासी आला सत्राजित ॥ गजरें महोत्साह करीत ॥ स्वगृहातें प्रवेशला ॥१६॥

तों एके दिवशीं सत्राजित ॥ गळां घालोनि स्यमंत ॥ निजभारेंसीं त्वरित ॥ द्वारावतीये पातला ॥१७॥

दुरुनि देखतां नृपवर ॥ म्हणती उतरला दिनकर ॥ दैत्यें गांजिलें म्हणोनि सत्वर ॥ शरण आला हरीतें ॥१८॥

हरीसी सांगती सेवकजन ॥ भेटीसी आला सहस्त्रकिरण ॥ मग बोले वसुदेवनंदन ॥ सत्राजित येत असे ॥१९॥

ऐसें बोलतां वैकुंठनाथ ॥ तों अकस्मात आला सत्राजित ॥ मान देऊनि बहुत ॥ सभेमाजी बैसविला ॥२०॥

स्यमंतकमणि देखोन ॥ तटस्थ झाले सभाजन ॥ तों नारदमुनि उठोन ॥ कृष्णकर्णीं लागला ॥२१॥

म्हणे हा स्यमंतकमणी ॥ तुमचे कंठीं असावा चक्रपाणी ॥ याचें तेज कौस्तुभाहूनी ॥ विशेष मज वाटतसे ॥२२॥

हरि म्हणे कैसा येईल हाता ॥ येरु म्हणे मी मागतों सत्राजिता ॥ मग बोले पद्मजातपिता ॥ मणि सर्वथा नेदी तो ॥२३॥

मग म्हणे नारदमुनी ॥ तुमच्याचि घरा येईल मणी ॥ यावरी ब्रह्मनंदन तेचि क्षणीं ॥ सत्राजिताजवळी आला ॥२४॥

म्हणे धन्य धन्य तूं सत्राजित ॥ तुज प्रसन्न जाहला आदित्य ॥ या स्यमंतकमण्याचें तेज अमित ॥ ऐसी वस्तु तुज दिधली ॥२५॥

ऐसा हा मणि सगुण ॥ जरी करीसी कृष्णार्पण ॥ तरी त्रिभुवनीं कीर्ति पूर्ण ॥ तुझी राया ठसावेल ॥२६॥

ऐकतां ऐसें नारदवचन ॥ सत्राजित जाहला क्रोधायमान ॥ म्हणे तुमच्या सभे आजिपासून ॥ न यों आम्ही सर्वथा ॥२७॥

कृष्ण असे गोरसचोर ॥ महाकपटी अकर्मी जार ॥ हाचि काय मणि लेणार ॥ जाहला थोर अवघ्यांत ॥२८॥

ऐसें बोलोनि क्रोधें उठिला ॥ स्वभारेंसीं नगरा गेला ॥ मणि देऊनि देव्हारां ठेविला ॥ मग पूजिला यथासांग ॥२९॥

तों रायाचा धाकुटा सहोदर ॥ प्रसेन नामें महावीर ॥ तेणें आपुल्या कंठीं मणि सुंदर ॥ एके दिवशीं घातला ॥३०॥

सवें घेऊनि चतुरंग दळ ॥ मृगयेसी प्रसेन निघे तत्काळ ॥ तों एक मृग देखिला चपळ ॥ प्रसेन वेगें धांविन्नला ॥३१॥

दळभार दूरी राहिला ॥ प्रसेन घोर कांतर प्रवेशला ॥ परी स्यमंतक तेजागळा ॥ गळां झळके धांवतां ॥३२॥

असंभाव्य तेज देखोन ॥ गिरिदरींतूनि उठिला पंचानन ॥ भयानक हांक देऊन ॥ प्रसेनावरी पडियेला ॥३३॥

अश्वासहित प्रसेन मारुन ॥ सिंह चालिला मणि घेऊन ॥ तों जांबुवंत हिंडत विपिन ॥ त्याचि पंथें येतसे ॥३४॥

देखोनि मणियाचें तेज ॥ वेगें धांविन्नला ऋक्षराज ॥ एक्याचि मुष्टिघातें तेणें सहज ॥ सिंह मारुनि टाकिला ॥३५॥

बाहात्तर कोटी रीस गणित ॥ तयांचा नृप एक जांबुवंत ॥ जेणें मेरुवरुनि उडी अकस्मात ॥ पृथ्वीवरी घातली ॥३६॥

ते वेळीं सूर्यरथींचें चक्र ॥ मांडीस झगटलें अणुमात्र ॥ तो ब्रह्मयाचा अवतार ॥ रामकार्या साह्य जाहला ॥३७॥

श्रीरामाचें परम प्रीतिपात्र ॥ राघव घडिघडी पुसे त्यासी विचार ॥ जो बहुकाळाचा वृद्ध साचार ॥ परमचतुर पंडित जो ॥३८॥

पूर्वीं श्रीरामें रावण मारुन ॥ अयोध्येसी आला परतोन॥ अकरा सहस्त्र वर्षें पूर्ण ॥ राज्य केलें रघुवीरें ॥३९॥

एके दिवशीं अयोध्यानाथ ॥ सभेसी बैसला असतां समर्थ ॥ तो कर जोडूनि जांबुवंत ॥ विनवीतसे श्रीरामातें ॥४०॥

रावण कुंभकर्ण तुम्हीं वधिले ॥ बहुत राक्षस आम्हीं मर्दिलें ॥ परी मजशीं मल्लयुद्धासी मिसळे ॥ ऐसा वीर न देखों ॥४१॥

मग बोले जनकजावर ॥ तुजशीं भिडे ऐसा वीर ॥ कोणी दिसतो साचार ॥ सांगें मज सर्वज्ञा ॥४२॥

जांबुवंत म्हणे कौसल्यात्मजा ॥ तुजविण वीर न दिसे दुजा ॥ तुजशीं झोंबी घ्यावी ऐसा माझा ॥ मनोरथ पूर्ण असे पैं ॥४३॥

ऐकोनि हांसिन्नला श्रीराम ॥ गोष्टी बोललासी उत्तम ॥ परी कृष्णावतारीं हा नेम ॥ पूर्ण करीन जाण पां ॥४४॥

स्यमंतकमण्याचे काजें ॥ तुम्ही आम्ही भिडों सहजें ॥ त्यावरी मग रघुराजें ॥ अवातार आपुला संपविला ॥४५॥

मग पाताळविवरीं जांबुवंत ॥ बहुत दिवस काळ क्रमीत ॥ सहज बाहेर आला अकस्मात ॥ तंव तो मणि सांपडला ॥४६॥

सिंहावलोकनेंकरुन ॥ पहा मागील अनुसंधान ॥ जांबुवंतें मारुनि पंचानन ॥ मणि घेऊनि गेला तो ॥४७॥

प्रवेशला विवराभीतरी ॥ मणि बांधिला पाळण्यावरी ॥ जांबुवंती नामें कुमरी ॥ बहु आवडे पितयातें ॥४८॥

इतुका वृत्तांत वर्तला ॥ परी आळ श्रीहरीवरी आला ॥ म्हणती प्रसेन कृष्णें मारिला ॥ मणि नेला चोरोनि ॥४९॥

लोकापवाद बोलती जनीं ॥ लागती एक एकाचे कर्णीं ॥ कृष्णें ऐसी करुं नये करणी ॥ मणियासाठीं सर्वथा ॥५०॥

सत्राजित पाठवीत सांगून ॥ मणि नेला आमुचा बंधु मारुन ॥ कृष्णासी सांगती सेवकजन ॥ वर्तमान जें जाहलें ॥५१॥

मग म्हणे वनमाळी ॥ हा डाग लागला यादवकुळीं ॥ धुवोनियां तत्काळीं ॥ शुद्ध करावा लागेल ॥५२॥

सवें घेऊनि यादवभार ॥ चतुरंग दळ समग्र ॥ शोधावया रुक्मिणीवर ॥ अरण्यामाजी चालिला ॥५३॥

जो वैकुंठपुरीचा सुकुमार ॥ तो शोधीत बहु कांतर ॥ तों देखिलें प्रसेनाचें कलेवर ॥ विदारोनि पाडिलें ॥५४॥

माग पाहिला गोपाळें ॥ तों उमटलीं सिंहाचीं पाउलें ॥ मग तैसेचि लोक चालिले ॥ तों सिंहाचें देखिलें प्रेत वाटें ॥५५॥

तेथूनि उमटलीं रिसाची पाउलें ॥ मग तैसेचि पुढे चालिले ॥ तों घोर विवर देखिलें ॥ लोक थोपिले तेथेंचि ॥५६॥

विवर दिसे भयानक ॥ सकळांसी म्हणे द्वारकानायक ॥ तुम्ही द्वारकेसी जावें सकळिक ॥ सैन्य घेऊनि माघारें ॥५७॥

मणियाविण अवधारा ॥ मी सर्वथा न यें द्वारकापुरा ॥ अठ्ठाविसावे दिवशीं माघारा ॥ येईन सत्य जाणिजे ॥५८॥

द्वारकेसी लोक आले समस्त ॥ अवघें नगर चिंताक्रांत ॥ सत्राजितासी शापित ॥ आळा घातला म्हणोनियां ॥५९॥

रुक्मिणी होऊनि व्रतस्थ ॥ देवीचें आराधन करी नित्य ॥ क्षेमें यावा द्वारकनाथ ॥ याचि स्वार्थेंकरुनियां ॥६०॥

असो इकडे विवरांत ॥ प्रवेशला कमलोद्भवतात॥ कृष्णप्रभेनें विवर उजळत ॥ अंधार तेथें कैंचा हो ॥६१॥

विवर क्रमिलें गोपाळें ॥ तो ऋषीपतीचें नगर देखिलें ॥ पर्वताकार रीस बैसले ॥ महाद्वार रक्षीत ॥६२॥

हातीं धरुनि जपमाळ ॥ अवघे रामउपासक निर्मळ ॥ रामस्मरण सदाकाळ ॥ करिती नेत्र लावूनियां ॥६३॥

नगराभोंवतीं मर्गज पोंवळी ॥ त्याहीवरी लिहिल्या रामनामावळी ॥ असो तो नाटकी वनमाळी ॥ गुप्तरुपें आंत गेला ॥६४॥

जांबुवंताचें निजमंदिरीं ॥ कमलदलाक्ष तो कंसारी ॥ प्रवेशला तों पालखावरी ॥ मणि बांधिला देखतसे ॥६५॥

तंव त्या जांबुवंताच्या अंगना ॥ दृष्टीं देखती जगन्मोहना ॥ म्हणती याचिया सुंदरपणा ॥ मदन उणा वाटतसे ॥६६॥

दिव्य मुकुट कर्णीं कुंडलें ॥ आकर्णपर्यंत नेत्रोत्पलें ॥ सगुण रुप सांवळें ॥ वदन सुहास्य उदार ॥६७॥

चतुर्भुज तमालनील ॥ गळां वैजयंती देत डोल ॥ पीतवसन वेल्हाळ ॥ कटीं मेखळां शोभतसे ॥६८॥

मदनमनोहर सांवळा ॥ अकस्मात कोठूनि आला ॥ एक लाज सांडूनि ते वेळां ॥ श्रीरंगाशीं बोलत ॥६९॥

त्रैलोक्यसुंदरा मनमोहना ॥ कोमलांगा राजीवनयना ॥ तुज विलोकितां आमुच्या नयनां ॥ समाधान जाहलें ॥७०॥

जिचे कुशी हे मूर्ति निपजली ॥ धन्य धन्य ते तुझी माउली ॥ जे तुझे पाठीं बैसली ॥ किती तपली तप न कळे ॥७१॥

निद्रिस्थ आहे जांबुवंत ॥ तों तूं येथूनि जाय त्वरित ॥ हा जागा झालिया निश्चित ॥ तुज ग्रासील सगळाचि ॥७२॥

जा तुज दिधलें जीवदाना ॥ वेगीं जाय आपुल्या स्थाना ॥ वाट पाहत असेल तुझी ललना ॥ कंठीं प्राण धरुनियां ॥७३॥

मग बोले द्वारकाविहारी ॥ मी जन्मापासूनि ब्रह्मचारी ॥ राणी मजसी प्रीति धरी ॥ परी मी उदास सर्वथा ॥७४॥

मी सर्वांचा आदिकर्ता ॥ मज नाहीं मातापिता ॥ मी मायाचक्रापरता ॥ सगुण झालों भक्तांलागीं ॥७५॥

पालखावरी बांधिला मणि ॥ तो मज द्याल जरी सोडूनी ॥ तरी मी उगाचि जाईन येथूनी ॥ न करीं करणी विपरीत ॥७६॥

मग म्हणती रे चतुर ॥ ह्या गोष्टी तोंवरीच सुकुमारा ॥ जों चेव आला नाहीं महावीरा ॥ जांबुवंतासी जाण पां ॥७७॥

मग हसोनियां जगजेठी ॥ दृढ घातली माळगांठी ॥ पीतांबराचे पदर पोटीं ॥ खोवीं उचलूनी माघारे ॥७८॥

मग बोले भुजा पिटोन ॥ याचा बळगर्व सर्व हरीन ॥ म्हणूनि वांकीसहित चरण ॥ धरणीवरी आपटी पैं ॥७९॥

तों जागा जाहला जांबुवंत ॥ नेत्र उघडूनि क्रोधें पाहत ॥ तों वीर देखिला अद्‌भुत ॥ मग पुसत तयासी ॥८०॥

तूं कोणाचा रे कोण ॥ हरि म्हणे मणि आणिला चोरुन ॥ तुज शिक्षा करावया पूर्ण ॥ विवरामाजी उतरलों ॥८१॥

जांबुवंत म्हणे तुज शिक्षा करीन ॥ हरि म्हणे व्यर्थ काय बोलून ॥ ऐसें ऐकतांचि वचन ॥ महावीर लोटला ॥८२॥

बाप भक्तवत्सल भगवंत ॥ निजभक्ताशीं झोंबी घेत ॥ जांबुवंताचे मनोरथ ॥ पूर्ण करावया पातला ॥८३॥

पिळिती एकमेकांचे हात ॥ हृदयावरी हृदय आदळत ॥ सवेंचि देती मुष्टिघात ॥ वर्मकळा लक्षूनियां ॥८४॥

एकमेकांसी चरणीं धरुनी ॥ दूरी भिरकाविती भवंडूनी ॥ जैसे मेरुमांदार दोन्ही ॥ एके ठायीं मिळाले ॥८५॥

कीं विष्णु आणि शंकर ॥ कीं रोहिणीवर आणि मित्र ॥ कीं राम आणि भार्गववीर ॥ तैसे दोघे दीसती ॥८६॥

कीं सूर्यसुत आणि शक्रकुमार ॥ पूर्वीं मल्लयुद्ध केलें थोर ॥ तैसे जांबुवंत आणि यदुवीर ॥ परस्परें युद्ध करिती पैं ॥८७॥

अठ्ठावीस दिवस अहोरात्र ॥ दोघे युद्ध करिती महावीर ॥ जांबुवंताचें शरीर ॥ जाहलें चूर युद्ध करितां ॥८८॥

सत्वहीन देह होऊनी ॥ मूर्च्छागत पडिला धरणीं ॥ कृष्णें वक्षःस्थळीं बैसोनी ॥ म्हणे मणि देईं वेगें ॥८९॥

जांबुवंत म्हणे हा कोण वीर ॥ प्रचंद पुरुषार्थी दिसे थोर ॥ म्हणवूनि उघडूनि पाहे नेत्र ॥ विलोकीत कृष्णमुख ॥९०॥

तों स्वेदबिंदु थबथबले भाळा ॥ तेणें कस्तूरीमळवट भिजला ॥ अंगींचा चंदन पुसला ॥ तुळसीवनमाळा सुकुल्या हो ॥९१॥

जांबुवंत करी रामस्मरण ॥ म्हणे देहांत आला कीं मजलागून ॥ आठविलें रघुपतीचें ध्यान ॥ धनुष्यबाणांसमवेत ॥९२॥

कृष्ण विचारी मानसीं ॥ रामरुप धरावें या समयासी ॥ ऐसें इच्छितां तेजोराशी ॥ राम जाहला श्रीकृष्ण ॥९३॥

सुहास्यवदन राजीवनयन ॥ हातीं विराजे चापबाण ॥ जांबुवंतें तें देखोन ॥ सावध होऊन चरण धरिले ॥९४॥

नयनीं देखतां सीतापती ॥ तत्काळ शरीरीं भरली शक्ती ॥ सवेंचि अवलोकूनि पाहे मूर्ती ॥ वारंवार सप्रेम ॥९५॥

श्रीरामरुप देखतां दृष्टी ॥ ब्रह्मानंदें भरली सृष्टी ॥ मग राम म्हणे एक गोष्टी ॥ जांबुवंता ऐक पां ॥९६॥

रामअवतारीं युद्धवरदान ॥ तें पावलें कीं तुजलागून ॥ ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ जांबुवंतासी भेटला ॥९७॥

सद्गदित जाहला जांबुवंत ॥ म्हणे पुरले मनोरथ ॥ जो राम तोचि कृष्णनाथ ॥ अभेदरुप संचलें ॥९८॥

मग श्रीकृष्णासी आसनीं बैसवून ॥ षोडशोपचारें पूजा करुन ॥ कृष्णें सांगितलें वर्तमान ॥ स्यमंतकमणियाचें ॥९९॥

जांबुवंत म्हणे यदुनायका ॥ माझी कन्या जांबुवंती सुरेखा ॥ हे अंगींकारीं कंसांतका ॥ वरी मणि आंदण देईन मी ॥१००॥

कार्य जाणोनि हृषीकेश ॥ अवश्य म्हणे जांबुवंतास ॥ तंव तो अत्यंत उत्तम दिवस ॥ लग्न तत्काळ धरियेलें ॥१॥

जांबुवंतें आपुले वनचर ॥ वर्‍हाडी मेळविले अपार ॥ देखोनि कोतिकामसुंदर ॥ वनचरें तटस्थ पैं होती ॥२॥

लग्नघटिका जवळी आली ॥ धांवती वर्‍हाडिणी आस्वली ॥ नवरीस हळदी लाविली ॥ कृष्णासी चर्चिली उरली ते ॥३॥

आस्वल वर्‍हाडी मोठमोठे ॥ भ्यासुर वदनें विशाळ पोटें ॥ अंतःपट धरिती नेटें ॥ मंगलाष्टकें पैं म्हणती ॥४॥

ॐपुण्याहं म्हणवून ॥ दोघां लाविलें ऐक्यलग्न ॥ तों नारदमुनि तेथें येऊन ॥ अकस्मात उभा ठाकला ॥५॥

हांसें आलें नारदासी ॥ म्हणे उत्तम केलें हृषीकेशी ॥ नवरी देखतां मानसीं ॥ संतोष मज वाटला ॥६॥

तूं मदन मनोहर तमालनीळ ॥ नोवरीपाशीं केश पुष्कळ ॥ ऐसी हे पुढें घेऊनि वेल्हाळ ॥ कैसा निजसी सांग पां ॥७॥

हिचें स्वरुप देखोनी ॥ मज उणी वाटे रुक्मिणी ॥ द्वारकेचे लोक पाहूनी ॥ बहुत संतोषी होतील ॥८॥

बरें आतां क्षणभरी ॥ तुमचें हळदीउटणें पाहूनि निर्धारीं ॥ मग जाईन द्वारकापुरीं ॥ लोकांलागीं सांगावया ॥९॥

तों हळदी लावूनि वनमाळी ॥ काढी नवरीच्या आंगींचीं मळी ॥ तुझी सासू हरि म्यां नाहीं देखिली ॥ ऐसें प्रसवली कन्यारत्‍न ॥११०॥

मग हांसे चक्रपाणी ॥ म्हणे बैसा क्षणभरी नारदमुनी ॥ कृष्णें तेव्हां हातीं धरुनी ॥ आपणाजवळी बैसविला ॥११॥

हरि म्हणे कांहीं गायन ॥ करावें आजि असे सुदिन ॥ मंगळदायक परमकल्याण ॥ गाऊन श्रवण तृप्त करीं ॥१२॥

नेदी हरिवचनासी मान ॥ नारदासी चढला अभिमान ॥ म्हणे कोणापुढें करुं गायन ॥ कोण सुजाण येथें असती ॥१३॥

अभिमान जाणोनि माधव ॥ झाडावया नारदाचा गर्व ॥ कौतुक दाविलें अपूर्व ॥ एका रिसा बोलाविलें ॥१४॥

चिमणाच आस्वल येऊन ॥ हरीपुढें बैसे आसन घालून ॥ मग त्यासी पुसे भगवान ॥ कांहीं गायन येतें कीं ॥१५॥

तो म्हणे हरि तुझें दयेंकरुन ॥ करीन मी आतांचि गायन ॥ म्हणे वीणा नारदाचा एक क्षण ॥ मजपाशीं देइंजे ॥१६॥

नारद म्हणे दोन्ही तंत ॥ तोंडूनि टाकील अकस्मात॥ हरि म्हणे तो समस्त ॥ कळा जाणत गायनाच्या ॥१७॥

मग वीणा त्याचे हातीं दिधला ॥ तेणें स्वरांचा थाट बैसविला ॥ तेणें नारदाचा गर्व हरला ॥ म्हणे नवलकळा येथें असे ॥१८॥

तेणें साही राग छत्तीस भार्या ॥ चौसष्टी मूर्च्छना दावूनियां ॥ अनेक उपरागांच्या क्रिया ॥ गाइल्या तेव्हां रिसानें ॥१९॥

गीतप्रबंध नृत्यकळा ॥ दावूनि तोषविलें गोपाळा ॥ मग साबडी नामें ते वेळां ॥ हरीची लीला आरंभिली ॥१२०॥

साबडें सप्रेम गायन ॥ तेथें लुब्धला मनमोहन ॥ हरि डोले आनंदेंकरुन ॥ धांवोनि अलिंगन देत तया ॥२१॥

मग नारदेंही उठोन ॥ वंदिले आस्वलाचे चरण ॥ विरोनि गेले पाषाण ॥ त्याचें कीर्तन ऐकतां ॥२२॥

हरि म्हणे रे गुणवंता ॥ भागलासी पुरे करीं आतां ॥ तेणें टाळ वीणा तत्काल ठेविला खालता ॥ तों शिळा गोठल्या सर्वही ॥२३॥

वीणा टाळ ते वेळां ॥ शिळेमाजी पैं गुंतला ॥ नारद काढावया गेला ॥ तंव तो सर्वथा न निघेचि ॥२४॥

आश्चर्य जाहलें सकळां ॥ म्हणती गायन ऐकतां विरल्या शिळा ॥ मग नारदें गायनाच्या कळा ॥ नाना रीतीं दाविल्या ॥२५॥

परी शिळाअ कदा न विरती ॥ मग म्हणे जय जय श्रीपती ॥ तुझी अद्‌भुत कर्तव्यगती ॥ ब्रह्मादिकां नेणवे ॥२६॥

मग आणीक एक रीस बोलावून ॥ त्याच्या मुखें करविलें गायन ॥ तत्काळ शिळा गेल्या विरोन ॥ वीणा टाळ काढिला ॥२७॥

मग आणीक एक केलें अद्‌भुत ॥ जैसें रंभेचें रुप विराजित ॥ त्याहूनि विशेष जांबुवंती दिसत ॥ नारद विस्मित पाहतसे ॥२८॥

असो चारी दिवस जाहला सोहळा ॥ मणि मग आंदण दीधला ॥ कृष्ण जांबुवंती घेऊनि निघाला ॥ वेगें परतला द्वारकेसी ॥२९॥

आणिक अश्व गज रथ ॥ जांबुवंत आंदण देत ॥ जांबुवंतीसहित कृष्णनाथ ॥ मिरवत आला द्वारकेसी ॥१३०॥

सभेसी आणिला मणी ॥ दाविला समस्तांलागूनी ॥ मग सत्राजितासी बोलावूनी ॥ स्यमंतक हातीं दीधला ॥३१॥

परम लज्जित सत्राजित ॥ अधोवदनें खालीं पाहत ॥ म्हणे हा रुसला कीं कृष्णनाथ ॥ म्यां नसता आळ घातला ॥३२॥

मजवरी रुसला हृषीकेश ॥ मग मज कालत्रयीं नाहीं यश ॥ काय करुं ऐसियास ॥ जगन्निवास समजे कैसा ॥३३॥

म्हणे सत्यभामा आणि हा मणी ॥ देऊनि समजावूं चक्रपाणी ॥ मग कृष्णापुढें हात जोडूनी ॥ करी विनवणी सत्राजित ॥३४॥

माझी सत्यभामा सुंदर कन्या ॥ हे अंगीकारीं जगज्जीवना ॥ कृष्णें मान्य केलें वचना ॥ लग्न धरिलें तत्काळ ॥३५॥

परम उत्साहें लावूनि लग्न ॥ सत्यभामा केली कृष्णार्पण ॥ वरी मणि दिधला आंदण ॥ आणि बहु धन गज रथ ॥३६॥

कृष्ण म्हणे सत्राजिता ॥ तुम्हीं खेद न करिजे आतां ॥ आम्हीं वरदचतुर्थीचा चंद्र अवचितां ॥ देखिला होता गोकुळीं ॥३७॥

गाई घेऊनि येतां देख ॥ गोखुरीं सांचलें उदक ॥ त्यांत बिंबला होता मृगांक ॥ तो म्यां दृष्टीं देखिला ॥३८॥

म्हणोनि आला हा आळ ॥ मग बोले सत्राजित भूपाळ ॥ गणेशचतुर्थीसी चंद्रमंडळ ॥ कायनिमित्त न पहावें ॥३९॥

श्रीकृष्ण म्हणे कैलासी ॥ प्रदोषकाळीं शिवदर्शनासीं ॥ आपुलाले वाहनीं बैसोनि वेगेंसीं ॥ सुरांचे भार चालिले ॥१४०॥

इंद्र चंद्र वरुण कुबेर ॥ अष्टवसु गंधर्व किन्नर ॥ मूषकारुढ शिवपुत्र ॥ गजवदन चालिला ॥४१॥

शिवगिरी चढतां झाली दाटणी ॥ गणेश पडिला मूषकावरुनी ॥ मागुती बैसला सांचरोनी ॥ तों चंद्र गगनीं हांसला ॥४२॥

तें गजवदनें जाणोन ॥ शाप दिधला दारुण ॥ जो तुझें करील मुखावलोकन ॥ त्यावरी येती अपजाळ ॥४३॥

ऐसें चंद्रें ऐकिलें ॥ मुख आपुलें आच्छादिलें ॥ मग सकळ देवी प्रार्थिलें ॥ गजवदनासी ते वेळे ॥४४॥

केलें देवीं बहुत स्तवन ॥ तेणें गणेश झाला प्रसन्न ॥ देव म्हणती चंद्राचें शापमोचन ॥ करावें जी कृपाळुवा ॥४५॥

मग चंद्र आणूनि ते अवसरीं ॥ घातला गणपतीचे पायांवरी ॥ म्हणे माझे वरदचतुर्थीसी निर्धारीं ॥ वदन याचें न पहावें ॥४६॥

वरकड दिवस अवघे मुक्त ॥ परी वरदचतुर्थीस न पहावा सत्य ॥ सत्राजितासी म्हणे कृष्णनाथ ॥ पूर्ववृत्तांत ऐसा असे ॥४७॥

तो चंद्र गोकुळीं पाहिला ॥ यालागीं वृथा आळ आला ॥ मग हरि म्हणे भूपाळा ॥ गोष्ट एक ऐकिंजे ॥४८॥

आम्हांसी सत्यभामेऐसें दिधलें रत्‍न ॥ इतुकेनि आमुचें समाधान ॥ हा मणि तुम्ही जा घेऊन ॥ आग्रहें श्रीकृष्णें दीधला ॥४९॥

मणि घेऊन सत्राजित ॥ आपुल्या ग्रामासीं पातला त्वरित ॥ दिवस लोटले बहुत ॥ तों एक अनर्थ जाहला ॥१५०॥

शतधन्वा नामें यादव जाण ॥ त्यासी सत्यभामा द्यावी लग्न करुन ॥ हा पूर्वी नेम होता तो सांडून ॥ कन्या दिधली श्रीकृष्णातें ॥५१॥

सत्यभामा माझी ललना ॥ ते कैसी दिधलीं श्रीकृष्णा ॥ तो द्वेष मनीं धरुनि जाण ॥ शतधन्वा पातला ॥५२॥

विश्वासोनि आला घरांत ॥ तों निजला होता सत्राजित ॥ त्याचा शिरच्छेद करुनि त्वरित ॥ मणि घेऊनि पळाला ॥५३॥

द्वारकेमाजी असे तो गुप्त ॥ ते सत्यभामेसी जाहलें श्रुत ॥ कीं सत्राजिताचा करुनि घात ॥ मणि नेला शतधन्व्यानें ॥५४॥

ते वेळां पांडवांच्या समाचारा ॥ राम कृष्ण गेले होते हस्तिनापुरा ॥ मागें वृत्तांत जाहला तो सत्वरा ॥ सत्यभामेसी कळला पैं ॥५५॥

शरीर टाकिलें धरणीं ॥ पितयाचे गुण आठवूनी ॥ म्हणे सत्राजिता तुज कोणे स्थानीं ॥ येऊनियां भेटो आतां ॥५६॥

बुडालें माझें माहेर ॥ रुक्मिणीसी कळला समाचार ॥ सत्यभामेच्या मंदिरा सत्वर ॥ जगन्माता पातली ॥५७॥

देवकी वसुदेव उग्रसेन ॥ करिती बहु समाधान ॥ मग ते सुखासनीं बैसोन ॥ हस्तिनापुरा चालिली ॥५८॥

वेगें घेतली बहुत सेना ॥ येऊनि भेटली जगमोहना ॥ सांगोनि सकळ वर्तमान ॥ शोक करी अद्‌भुत ॥५९॥

शतधन्व्यानें मारिला सत्राजित ॥ ऐकोनि राम हरि जाहले संतप्त ॥ आले द्वारकेसी सत्य भामेसहित ॥ झालें श्रुत शतधन्व्यातें ॥१६०॥

परम भयभीत जाहला मनीं ॥ अक्‍रुराचे येथें ठेविला मणि ॥ म्हणे स्यमंतक केवळ तरणी ॥ न लपे कोठें सर्वथा ॥६१॥

अक्‍रुरा तूं परम विश्वासी ॥ म्हणोनि मणि ठेवितों तुजपाशीं ॥ येरु म्हणे हे गोष्टी हृषीकेशीं ॥ कळल्या अनर्थ होईल ॥६२॥

द्वारकेबाहेर शतधन्वा पळत ॥ तों तुरंगीं राम कृष्ण बैसत ॥ पूर्वसमुद्रापर्यंत ॥ पळाला तेव्हां शतधन्वा ॥६३॥

मग श्रीरंगें सुदर्शन टाकिलें ॥ शतधन्व्याचें शिर उडविलें ॥ कलेवर समुद्रतीरीं पडिलें ॥ परी मणि नाहीं त्याजवळी ॥६४॥

परतोनि आले द्वारकापुरा ॥ नगरीं पिटिला डांगोरा ॥ कोणें चोरासी दिधला थारा ॥ मणि सत्वर आणिंजे ॥६५॥

तें अक्रूरें ऐकोनी ॥ भयभीत जाहला मनीं ॥ मणि आपुल्या संगें घेऊनीं ॥ गेला पळोनि वाराणसी ॥६६॥

हेर सांगती चक्रपाणी ॥ अक्रूर घेऊनि गेला मणि ॥ परी निरपराधी भक्तशिरोमणि ॥ भयेंकरोनि बाहेर गेला ॥६७॥

मग बोले यादवेंद्र ॥ अन्याय नसतां अणुमात्र ॥ माझा प्राणसखा अक्रूर ॥ गेला न कळे कोणीकडे ॥६८॥

अक्रूरासरिखें निधान ॥ जो सात्त्विक आणि प्रेमळ पूर्ण ॥ मज न गमे त्या सखयाविण ॥ जगज्जीवन बहु कष्ट ॥६९॥

अक्रूराकारणें श्रीहरी ॥ रात्रंदिवस चिंता करी ॥ तों द्वादशवर्षें द्वारकेवरी ॥ अवर्षण पडियेलें ॥१७०॥

बहुत केले प्रयत्‍न ॥ परी कदा न वर्षे धन ॥ तों अंबरीं देववाणी वदे वचन ॥ समस्त जन ऐकती ॥७१॥

अक्रूर आहे वाराणसीनगरीं ॥ तो आणाल द्वारकापुरीं ॥ तरी जलद वर्षेल निर्धारीं ॥ निश्चय हा जाणिजे ॥७२॥

तों दूतमुखीं वार्ता आली समग्र ॥ कीं आनंदवनीं आहे अक्रूर ॥ मणि सुवर्ण प्रसवे अष्टभार ॥ धर्म अपार करीतसे ॥७३॥

भागीरथीचे जे कां घाट ॥ अक्रूरें बांधिले असती सदट ॥ अद्यापि जन देखती स्पष्ट ॥ अक्रूरघाट नाम त्यांचें ॥७४॥

मग श्रीकृष्णें उद्धवासी ॥ वेगें धाडिलें वाराणसी ॥ तों अक्रूर जाहला तापसी ॥ कृष्णस्मरणीं रत सदा ॥७५॥

मग उद्धवें वर्तमान सांगोन ॥ आणिला रथावरी बैसवून ॥ भेटले अक्रूर आणि कृष्ण ॥ प्रेमेंकरुन तेधवां ॥७६॥

अक्रूरें हरीपुढें मणि ठेवून ॥ सांगितलें सकळ वर्तमान ॥ हरि म्हणे मणि नव्हे हा अग्न ॥ घेतले प्राण बहुतांचे ॥७७॥

दोन वेळां हा मणि ॥ आंदण आला आम्हांलागूनी ॥ प्रसेनसत्राजितांसी मारुनी ॥ आमुचें सदनीं प्रवेशला ॥७८॥

जेथ वसे थोर वस्त ॥ तेथें न प्रार्थितां येती अनर्थ ॥ यालागीं मुनि उपाधिरहित ॥ अरण्यांत वसती हो ॥७९॥

जवळी असतां उपाधी ॥ नसत्याचि जडती आधिव्याधी ॥ यालागीं विरक्त त्रिशुद्धी ॥ हिंडती उदास होऊनियां ॥१८०॥

असो कृष्णें सत्यभामेसी बोलावूनी ॥ तिचें बहुत समाधान करुनीं ॥ प्रीतीनें हस्तीं दिधला मणि ॥ ठेवीं सदनीं म्हणोनियां ॥८१॥

असो पर्जन्य ते अवसरीं ॥ अद्‌भुत वर्षला द्वारकेवरी ॥ भक्तमहिमा कंसारी ॥ नानापरी वाढवीत ॥८२॥

हे स्यमंतकहरणकथा ॥ गातां अथवा श्रवण करितां ॥ हरे सकळ संकट चिंता ॥ आवडीं धरितां सप्रेम ॥८३॥

हरिविजयग्रंथनृपवर ॥ नाना इतिहास त्यांचा द्ळभार ॥ एक एक प्रचंड वीर ॥ पापसंहार क्षणें करिती ॥८४॥

ऐसा हा हरिविजयभूप सुरेख ॥ श्रवणार्थीं भाविक याचक ॥ ते संतुष्ट होती सकळिक ॥ श्रवण मनन करितां हो ॥८५॥

केलें जें सकळ श्रवण ॥ तें मननेंविण व्यर्थ जाण ॥ जैसें जोडिलें बहु धन ॥ परी तें जतन न केलें ॥८६॥

मननाविण श्रवण करी ॥ जैसी कां पालथी घागरी ॥ पर्जन्यांत ठेविली जन्मवरी ॥ परी अंतरीं बिंदु न जाये ॥८७॥

श्रीधरवरद ब्रह्मानंद ॥ जरी कृपा करी तो वेदवंद्य ॥ तरीच हृदयीं ठसावे बोध ॥ भेदाभेद निरसूनियां ॥८८॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत संतभक्त ॥ पंचविंशतितमाध्याय गोड हा ॥१८९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥२५॥ओंव्या॥१८९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel