श्रीगणेशाय नमः ॥    ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
श्रोते हो ऐका सावधान ॥ तुम्हांसी लाधलें अमृतपान ॥ जे भक्तकथा अद्भुत गहन ॥ प्राकृत होऊनि विकासली ॥१॥
जैसें विप्रांचे घरीं पक्वान्न जाहलें ॥ तें सकळ यातींचे उपयोगीं पडलें ॥ कीं कनकाचे अलंकार केले ॥ सुंदर अंगीं शोभावया ॥२॥
कापुसाचें अंबर विणिलें जाण ॥ तें सकळांसी सीतनिवारण ॥ कीं नवनीत कढवून ठेवितां पूर्ण ॥ न नासेचि सर्वथा ॥३॥
कीं रत्नें कोंदणीं बैसविली ॥ तीं लेणाराचे उपयोगा पडलीं ॥ कीं अमृतबीजें भूमींत पेरिलीं ॥ तीं विस्तारलीं कोटिगुणें ॥४॥
पाषाण फोडून रचिलें देऊळ ॥ त्यांत बैसविला जाश्वनीळ ॥ तैसाचि हा ग्रंथ प्रांजळ ॥ जाहला केवळ सकळिकां ॥५॥
नातरी विकल्प आणूनि चित्तीं ॥ म्हणाल प्रौढी सांगसील किती ॥ तरी मी सलगीनें तुम्हांप्रती ॥ सप्रेममती बोलिलों ॥६॥
मजवरी निमित्त ठेवूनि वायां ॥ नका उपेक्षूं भक्तविजया ॥ दोष टाकूनि गुण घ्यावया ॥ अधिकार तुम्हां आहे कीं ॥७॥
एरवीं महीपति मंदमती ॥ रासनांवें एकचि येती ॥ ग्रंथ वदविता श्रीरुक्मिणीपती ॥ निश्चय चित्तीं असों द्या ॥८॥
सूत्रदोरी तुटलियावरी ॥ बाहुलें नाचेल कैशापरी ॥ वारा निवांत राहिला जरी ॥ तरी वृक्ष सर्वथा डोलेना ॥९॥
गताध्यायीं निरूपण काय ॥ नामदेवें उठविली गाय ॥ राजा येऊनि वंदिले पाय ॥ आनंद जाहला सर्वांसी ॥१०॥
चमत्कार दाखवून वेगेंसीं ॥ निघाले पुसोनि सर्वांसी ॥ मार्गीं चालतां दिवानिशीं ॥ स्मरण मानसीं हरीचें ॥११॥
ज्या ज्या देशीं जाती तीर्था ॥ तेथें तैसीच करिती कविता ॥ भाषापरत्वें अमोलिकता ॥ गुण वर्णिती हरीचे ॥१२॥
नानादेशींची तीर्थें बहुत ॥ विस्तारें सांगतां वाढेल ग्रंथ ॥ नामदेवें विलोकून त्वरित ॥ आनंदवनासी पैं आले ॥१३॥
करूनि भागीरथीचें स्नान ॥ घेतलें विश्वेश्वराचें दर्शन ॥ इतुकेन कृतार्थ होऊन ॥ परम उल्हास मानसीं ॥१४॥
चातुर्मास राहिले तेथ ॥ तों नवल वर्तलें अति अद्भुत ॥ कबीराचें घरीं अकस्मात ॥ साधु संत पातले ॥१५॥
रात्र जाहली दोन प्रहर ॥ निद्रित जाहले नारीनर ॥ तो अकस्मात वैष्णववीर ॥ निजदृष्टीं देखिले ॥१६॥
कबीर कांता दोघें जण ॥ उठोनि केलें साष्टांग नमन ॥ घर मोडकें अति जीर्ण ॥ कूड मोडोनी गेला असे ॥१७॥
घरीं नाहीं तिळभर अन्न ॥ उपवासीं मुलें निजलीं जाण ॥ तयांखालील बोर्‍या काढून ॥ संतां बैसणें घातलें ॥१८॥
कबीर म्हणे निजकांतेसी ॥ कांहीं नैवेद्य करावा यांसी ॥ अवश्य म्हणे भ्रतारासी ॥ परी चिंता मानसीं उद्भवली ॥१९॥
म्हणे धान्य तों नाहीं निजमंदिरीं ॥ उसणें कोणीच न देती नगरीं ॥ मग धैर्य धरूनि निजअंतरीं ॥ चालिली बाजारीं एकटीं ॥२०॥
मार्गीं चालतां अति त्वरेनें ॥ मुखें करीत श्रीरामभजन ॥ म्हणे अन्न मिळे जरी करितां प्रयत्न ॥ तरी सत्वा हानि होईल ॥२१॥
वाणियाचे ओळीस येऊन त्वरित ॥ सभोंवतें जंव विलोकित ॥ तंव एक्या दुकानांत अकस्मात ॥ वाणी जागृत देखिला ॥२२॥
सन्निध जाऊनि ते अवसरीं ॥ तयासी बोले मधुरोत्तरीं । पाहुणे संत आमुचें घरीं । तीर्थें करीत पातले ॥२३॥
शिधासाहित्य पाहिजे त्यांसी ॥ उशीर न करावा द्यावयासी ॥ द्रव्य सांगाल तें तुम्हांपासीं ॥ आणोनियां देईन ॥२४॥
वाणी म्हणे तिजकारण ॥ तूं कोणाची आहेस कवण ॥ येरी बोले प्रतिवचन ॥ मधुरोत्तरें तयासी ॥२५॥
अविंधवंशीं वैष्णव वीर ॥ तो कबीर माझा निजभ्रतार ॥ ऊठ सामग्री दे सत्वर ॥ साधुसंत भुकेले ॥२६॥
ऐसें बोलतांचि सुंदर ॥ वाणी जाहला कामातुर ॥ जेवीं अहल्या देखोनि शचीवर ॥ करी अविचार मानसीं ॥२७॥
कीं पार्वती देखोनि सुंदर ॥ कामें व्यापिला भस्मासुर ॥ कीं विश्वजननीसी दशकंधर ॥ पापदृष्टीं जेवीं पाहे ॥२८॥
नातरी पांडवजाया द्रौपदी सती ॥ तिसीं दुर्योधन धरी कुमती ॥ तैसा वाणी पापमती ॥ कबीरकांतेसी बोलत ॥२९॥
म्हणे माझे मनोरथ करिसी पूर्ण ॥ तरी सामग्री देईन तुजकारण ॥ द्रव्य आणि वस्त्रें भूषण ॥ मागशील तें देईन मी ॥३०॥
कांहीं संकोच धरिसी मनीं ॥ तरी मागुती जाईं परतोनी ॥ ऐकूनि दुर्जनाची वाणी ॥ विचार मनीं करीतसे ॥३१॥
म्हणे नाहीं म्हणतां याजकारण ॥ तरी आणिक कोठें न मिळेचि अन्न ॥ संतांसी पडतां उपोषण ॥ सत्त्वासी हानि होईल ॥३२॥
समय पडेल तैसें वर्तणें ॥ प्रसंगाऐसें उत्तर देणें ॥ सभा पाहूनि कीर्तन करणें ॥ बीज पेरणें भूमीऐसें ॥३३॥
हरिश्चंद्र राजा सत्त्वगुणी ॥ डोंबाघरीं वाहे पाणी ॥ तारामती तयाची राणी ॥ क्लेश भोगूनि राहिली ॥३४॥
वार्‍याऐसें उपणावें भूस ॥ बुडतां धरावी अंत्यजकांस ॥ दुष्काळीं अन्न कृपाणास ॥ मागणें लागे याचकां ॥३५॥
साधावया संसारकाज ॥ अविंधसेवा करित द्विज ॥ प्रसंगीं उदेला कलिराज ॥ तो वर्तवी सहज अघटित ।३६॥
स्वधर्म आणि अधर्म जाण ॥ शास्त्रीं बोलिले मनुष्याकारण ॥ जेणें जोडती श्रीहरीचे चरण ॥ तरी अधर्म अवश्य करावा ॥३७॥
माता पिता तीर्थ जाण ॥ ज्येष्ठबंधु त्याचि समान ॥ कुळगुरु आणि अभ्यागत जाण ॥ आज्ञा प्रमाण तयांची ॥३८॥
जरी ऐकता भरत मातृवचन ॥ तरी कैसे जोडते श्रीरामचरण ॥ प्रल्हादें पित्यासी अव्हेरून ॥ नरहरि प्रसन्न केला कीं ॥३९॥
बळीनें नायकोनि शुक्रवचन ॥ वामनासी अर्पिलें त्रिपाददान ॥ कीं गौळणी भ्रतारांसी टाकून ॥ जाहल्या तल्लीन कृष्णरूपीं ॥४०॥
मोडूनि प्राणनाथांचें वचन ॥ ऋषिपत्यांनीं नेलें अन्न ॥ जरी धरिलें असतें शास्त्रवचन ॥ तरी श्रीहरिचरण अंतरते ॥४१॥
तेवीं शास्त्र विचारितां मानसीं ॥ संत साधु राहतील उपवासी ॥ तरी वचन देऊनि वाणियासी ॥४२॥
मग अयोध्यावासी जानकीजीवन ॥ तो अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ त्याचें करितां नामस्मरण ॥ अरिष्ट निरसेल सर्वही ॥४३॥
मग कबीरपत्नी धैर्य धरून ॥ वाणियासी बोले प्रतिवचन ॥ आधीं सामग्री दे मजकारण ॥ मग मी येईन निश्चयेंसीं ॥४४॥
रात्र बहुत लोटलिया जाण ॥ धरीं उपवासी साधुजन ॥ उशीर लागतां मजकारण ॥ निद्रित होतील वैष्णव ॥४५॥
ऐसें ऐकतां वाणियास ॥ चित्तीं न वाटेचि विश्वास ॥ जेवीं दुर्योधनाचे दृष्टीस ॥ सात्त्विक कोणी दिसेना ॥४६॥
आंधळ्यांसी आंधळें दिसे जाण ॥ तस्करांसी चंद्रमा भासे मलिन ॥ रोगी म्हणे हें मिष्टान्न ॥ कडवट कासया रांधिलें ॥४७॥
कृपणासी नाहीं भूतदया ॥ मांसभक्षकासी कैंची माया ॥ क्षयरोगियासी दिव्यकाया ॥ स्वप्नींही दृष्टीं नये कीं ॥४८॥
खळासी कैंचा प्रेमरस ॥ साधु न भेटें निंदकास ॥ ब्राह्मणआचार अंत्यजास ॥ सत्य न भासे सर्वथा ॥४९॥
तेवीं कबीरकांतेच्या वचनासी ॥ प्रमाण न मानी निश्चयेंसी ॥ म्हणे भाक देसील जरी मजसी ॥ सत्य मानसीं तैं वाटे ॥५०॥
ऐकूनि दुर्बुद्धीचें वचन ॥ धैर्यबळें आंवरिलें मन ॥ म्हणे यासी न देतां वचन ॥ सामग्री पदरीं नये कीं ॥५१॥
मग भाक देऊनि ते अवसरीं ॥ सर्व साहित्य घेतलें पदरीं ॥ सत्वर जाऊनि निजमंदिरीं ॥ साहित्य करी निजप्रेमें ॥५२॥
मग कबीरकांतेसी संत बोलती ॥ आम्हीं स्वहस्तें पाक करूं निश्चितीं ॥ मग पाकपात्रें घेऊनि प्रीतीं ॥ स्वयंपाक करिती वैष्णव ॥५३॥
नानापरींचीं पक्वान्नें ॥ सप्रेमभरीं रांधिलीं जाण ॥ मग नवरस पात्रीं वाढून ॥ पूजाविधान आरंभिलें ॥५४॥
गंधाक्षता सुमनहार ॥ परिमळद्रव्यें उपचार ॥ धूप दीप दाखवूनि सत्वर ॥ भावें नमस्कार घातले ॥५५॥
सप्रेमभावें यथारुचित ॥ साधुसंत जाहले तृप्त ॥ मग कबीरपत्नीनें निजकांत ॥ एकांतमंदिरीं बोलाविला ॥५६॥
कांता म्हणे कबीरासी ॥ तुम्हीं असावें संतांपासीं ॥ म्यां भाक देऊन वाणियासी ॥ सामग्री वेगेंसीं आणिली ॥५७॥
त्याचे मनोरथ करावया पूर्ण ॥ आज्ञा द्यावी मजकारण ॥ उशीर होतां उगवेल दिन ॥ मग सत्वासी हानि होईल ॥५८॥
ऐकूनि म्हणे कबीरभक्त ॥ मीही येतों तुजसांगात ॥ त्या वाणियाचा उपकार बहुत ॥ आम्हांवरी जाहला असे ॥५९॥
आजि संतांसी मिळालें अन्न ॥ हें तंव त्याचेंच होय पुण्य़ ॥ त्याच्या उपकारा उत्तीर्ण ॥ नव्हे आमुचेच सर्वथा ॥६०॥
तुजही उपाय बरा सुचला ॥ संतकारणीं देह लाविला ॥ आता स्कंधीं घेऊन तुजला ॥ नेऊनि घालितों ते ठायीं ॥६१॥
महापर्जन्य पडतां मेदिनीं ॥ तमें दाटली घोर रजनी ॥ एकलें जातां तुजलागुनी ॥ भय निजमनीं वाटेल ॥६२॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ कांतेसी बैसविली स्कंधावरी ॥ कबीर जावया बाजारीं ॥ चाले झडकरीं लगबगें ॥६३॥
मार्गीं चालतां दोघें जण ॥ सप्रेम करिती श्रीरामभजन ॥ म्हणती धन्य आजिचा सुदिन ॥ वैष्णव घरासी पातले ॥६४॥
ऐसें बोलतां एकमेकांसी ॥ सत्वर आली दुकानापासीं ॥ कबीर म्हणे निजकांतेसी ॥ जातों घरासी मी आतां ॥६५॥
घरीं असती साधुसंत ॥ उठोनि जातील अकस्मात ॥ मी त्यांजपासीं जातों त्वरित ॥ चरणसेवा करावया ॥६६॥
तुवां संकोच न धरावा किंचित ॥ पुरवीं वाणियाचे मनोरथ ॥ ऐसें म्हणोनि कबीरभक्त ॥ गेला त्वरित घरासी ॥६७॥
तंव वाणी कामातुर होऊन ॥ वाट पाहत बैसला जाण ॥ म्हणे रात्रीं एकटी येऊन ॥ गेली ठकवून मजलागीं ॥६८॥
ऐसें दुराचारी बोलतां ॥ तों पुढें देखिली कबीरकांता ॥ हर्ष वाटला तयाचें चित्ता ॥ सत्य वचनार्था केलें वो ॥६९॥
स्वस्थानीं बैसतीं जाण ॥ वाणी बोलिला तिजकारण ॥ कर्दमें भरले नाहींत चरण ॥ वर्षतां घन अपार ॥७०॥
हे आशंका माझिये चित्तीं ॥ तरी सत्यचि सांगावें गुणवती ॥ वचन ऐकोनि ते सती ॥ वाणियाप्रती काय बोले ॥७१॥
ऐक गा शेटिया गुणवंता ॥ यथार्थ सांगतें मी आतां ॥ तुजसी देऊनि वचनार्था ॥ साधुसंतां तोषविलें ॥७२॥
वैष्णव पावले समाधान ॥ हें तंव तुझेंचि जाहलें पुण्य ॥ तुझा उपकार आम्हांवरी पूर्ण ॥ न फिटेचि सर्वथा ॥७३॥
मी पतिव्रता म्हणवितें जाण ॥ भ्रतारआज्ञा मज प्रमाण ॥ तुजला दिधलें भाकदान ॥ संकट जाणोनि ते वेळीं ॥७४॥
कबीर माझा प्राणनाथ ॥ तयासी सांगितला वृत्तांत ॥ तेणें स्कंधीं वाहूनि मातें ॥ आणिलें सत्वर तुजपासीं ॥७५॥
आपण परत गेला मागुती ॥ आतां तुवां सोडूनि आपुली भ्रांती ॥ काय कामना असेल चित्तीं ॥ पुरवीं त्वरित ये समयीं ॥७६॥
ऐसें बोलतां सत्त्वराशी ॥ अनुताप जाहला वाणियासी ॥ म्हणे म्यां येऊनियां नरदेहासी ॥ सार्थक कांहींच न केलें ॥७७॥
चौर्‍यायसीं लक्ष हिंडोनि पाहीं ॥ अवचित आलों मनुष्यदेहीं ॥ येथेंही विचार न करूनि कांहीं ॥ विषयावरी लंपट जाहलों कीं ॥७८॥
कबीर विरक्त उदार जाण ॥ त्याचे कांतेचें केलें छळण ॥ जेवीं लोहशस्त्र हातीं घेऊन ॥ तुळसीवनचि कापिलें ॥७९॥
कीं हातीं घेऊनि कुदळी ॥ यज्ञशाळा बळेंचि पाडिली ॥ कीं शिवपूजा लोटोनि दिधली ॥ लत्ताप्रहारेंकरूनियां ॥८०॥
कीं अमृतकुंभ उलंडिला ॥ की शालिग्राम फोडोनि टाकिला ॥ कीं वट पिंपळ देखोनि तोडिला ॥ कुठारशस्त्रेंकरूनियां ॥८१॥
गंगा उतरूनि गेलों अस्नात ॥ कीं वाचें निंदिलें श्रीभागवत ॥ तैसेचि दोषे घडले मातें ॥ कबीरभक्त छळितांचि ॥८२॥
कांतेसी देईल भोगदानीं ॥ ऐसा भ्रतार न दिसे कोणी ॥ धन्य हे माता सद्गुणखाणी ॥ आदिजननी जगदंबा ॥८३॥
ऐसा अनुताप धरूनि मनीं ॥ नमस्कार केला तिजलागुनी ॥ म्हणे मी बाळक तूं जननी ॥ अपराध न गणीं सर्वथा ॥८४॥
अज्ञानपणें मीं नेणतां ॥ छळणा केली तुझी तत्त्वतां ॥ सर्व क्षमा करूनियां आतां ॥ अभयदान मज देईं ॥८५॥
मज बाळकासी धरोनि करीं ॥ घालीं कबीराचे पायांवरी ॥ म्हणूनि मस्तक चरणांवरी ॥ पुनः मागुती ठेविला ॥८६॥
ऐसें ऐकूनि करुणावचन ॥ म्हणे धन्य वाणिया तुझें मन ॥ नवनीताऐसें मृदु जाण ॥ मजकारण भासत ॥८७॥
उदंड केल्या दुष्कर्मराहाटी ॥ शेवटीं अनुताप उपजला पोटीं ॥ तरी दुरितें गेलीं उठाउठी ॥ बोलिलें श्रेष्ठीं शास्त्रमत ॥८८॥
आधीं केलें विषभक्षण ॥ त्यावरी लाधलें अमृतपान ॥ तरी अपाय निश्चित चुकला जाण ॥ ऐसें सर्वज्ञ बोलती ॥८९॥
म्हणूनि ऐक गा धैर्यवंता ॥ अनुताप जाहला तुझिया चित्ता ॥ तेव्हांचि भवरोग तत्वता ॥ गेला परता पळोनी ॥९०॥
आतां तुज आणि कबीरासी ॥ भेटी करीन मी वेगेंसीं ॥ ऐसें ऐकूनि वाणियासी ॥ परम आल्हाद वाटला ॥९१॥
सांडोनि दांभिक अभिमान ॥ टाकूनि रजतमोगुण ॥ टाकोनियां मोहभ्रम ॥ सात्विक लक्षण दृढ धरिलें ॥९२॥
यापरी होऊनि शुद्ध सोज्ज्वळ ॥ दुकान टाकिलें तत्काळ ॥ निघे तिथोनि उतावेळ ॥ मायाजाळ तोडूनी ॥९३॥
कबीरकांतेच्या समागमें जाण ॥ सत्वर आला नलगतां क्षण ॥ मग अनन्यभावें साष्टांग नमन ॥ प्रेमेंकरून घातलें ॥९४॥
म्हणे मी अज्ञान बालक नेणत ॥ अनंत अपराध केले सत्य ॥ ते क्षमा करूनि अभयहस्त ॥ दिधला पाहिजे निजदासा ॥९५॥
अंतरसाक्ष कबीरें पूर्ण ॥ अनुतापयुक्त ॥ ओळखिलें चिन्ह ॥ मग वाणीयासी आलिंगन देऊन ॥ अभय वरदान दिधलें ॥९६॥
भाव विश्वास ज्ञानशीळ ॥ उदास विरक्त सर्वकाळ ॥ ऐसा कबीरभक्त प्रेमळ ॥ दीनदयाळ सर्वांसी ॥९७॥
वाणियासी अनुताप होऊन ॥ करिता जाहला श्रीरामभजन ॥ संतसंगाचें महिमान ॥ न कळे जाण श्रुतिशास्त्रां ॥९८॥
कबीराची कीर्ति अति अद्भुत ॥ नामदेवासी जाहली श्रुत ॥ मग ज्ञानदेवासी सांगोनि मात ॥ आले भेटीस कबीराच्या ॥९९॥
नामा ज्ञानदेव देखोनि नयनीं ॥ नमस्कार घातलास साष्टांग चरणीं ॥ कबीरासी आनंद वाटला मनीं ॥ प्रेमेंकरूनी भेटले ॥१००॥
मग बैसावयाकारण ॥ भूमीवरी घातलें तृणासन ॥ प्रेमामृतें सजलनयन ॥ झाले असती दोघांचे ॥१॥
ज्ञानदेव म्हणे नामयासी ॥ मागील आठव धरीं मानसीं ॥ क्षीरसागरीं आज्ञा कैसी ॥ दिधली तुम्हांसी नारायणें ॥२॥
तूं तरी उद्धव साक्षात ॥ शुकअवतार कबीरभक्त ॥ शुक्तिकेपोटीं अवतार सत्य ॥ तुम्ही घेतला मृत्युलोकीं ॥३॥
भक्तिमार्ग जाहला मलिन ॥ प्रपंचीं बुडाले अवघे जन ॥ त्यांचें करावया उद्धरण ॥ कर्मभूमीसी आलेती ॥४॥
ऐसें बोलतां ज्ञानेश्वर ॥ उभयतां करिती नमस्कार ॥ अंतरींची खूण परस्पर ॥ कळों आली तयासी ॥५॥
ज्ञानदेव म्हणे कबीरासी ॥ पंढरीक्षेत्र दक्षिणदेशीं ॥ तेथें पुंडलीकाचे भेटीसी ॥ वैकुंठवासी पातले ॥६॥
साक्षात् परब्रह्मरूप सगुण ॥ लीलानाटकी जगज्जीवन ॥ जो नामयाचें प्रेमजीवन ॥ उभा ठाकला विटेवरी ॥७॥
तुम्ही येऊनि एके दिनीं ॥ तें आदिक्षेत्र पाहावें नयनीं ॥ ऐकोनि ज्ञानदेवाची वाणी ॥ कबीर चरणीं लागला ॥८॥
कबीर म्हणे ज्ञानदेवासी ॥ एकादशीस कार्तिकमासीं ॥ अगत्य येऊं दर्शनासी ॥ वचन तयासी दिधलें ॥९॥
कबीरासी पुसोनि तयें क्षणीं ॥ सत्वर निघाले तेथूनी ॥ पुढें सुरस कथा सज्जनीं ॥ सादर कर्णीं ऐकावी ॥११०॥
जैअसा तृषाक्रांत सेवी जीवन ॥ कीं भुकेला जेवी मिष्टान्न ॥ तेवीं भक्तकथेसी लावूनि मन ॥ सादर ऐका भाविक हो ॥११॥
एक प्रेमभाव धरिला चित्तीं ॥ तर अनंत लाभ होतां येती ॥ श्रोतयांसी विनवी महीपती ॥ होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥१२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकता तुटेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकादशाध्याय रसाळ हा ॥११३॥
॥ अध्याय ॥११॥    ॥    ओंव्या ॥११३॥    ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel