चौक १

जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।

स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥

स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।

आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥

चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।

प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥

तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।

निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥

जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।

दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥

स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।

या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥

चाल

घनदाट सभा थाटली । गर्जना उठली ।

घोर त्या कालीं । जय छत्रपतींचा बोला ।

जय स्वतंत्रतेचा बोला । जय भवानी की जय बोला ।

तुम्ही मावळे बोल हर हर महादेव बोला ।

चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१॥

चौक २

हर हर गर्जुनि वीर मावळे सर्व सज्ज असती ।

परंतु कोठें चुकले बाजी यांत कां न दिसती ॥१॥

हाय हाय तो म्लेंछासंगें घडित बसे साची ।

स्वदेशभूच्या पायासाठीं बेडी दास्याची ॥२॥

ऐकुनियां शिवहृदय हळहळे म्हणे दूत हो जा ।

बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा ॥३॥

चाल

शिवदूत तेधवां जाती । बाजिला वदती ।

सोड रे कुमती । कां म्लेंच्छ कसाई भजसी ।

कां दास्य-नरकिं तूं पचसी । कां जिणें तुच्छ हें नेसी ।

स्वदेश नाहीं, स्वराज्य नाहीं, धिक या देहाला ।

चला घालुं स्वातत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥२॥

चौक ३

बाजीराया म्लेंछ सबळ हा दोष न काळाचा ।

ना देवाचा ना धर्माचा किंवा नशिबाचा ॥१॥

देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।

गुलमगिरी जे देती त्यांसी निष्ठा विकणार ॥२॥

तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं ।

तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधलें कंठीं ॥३॥

चाल

हो सावध बाजीराया । दास्यिं कां काया ।

झिजविशी वाया । तुज भगवान्‌ श्री शिवराजा ।

स्वातंत्र्य प्राप्तिच्या काजा । बोलावी तिकडे जा जा ।

देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥३॥

चौक ४

शिवदूताचे बोल ऐकतां बाजी मनिं वदला ।

काळसर्प मीं कसा उराशी मित्र म्हणुनि धरिला ॥१॥

घरांत शिरला चोर तया मी मानुनिया राजा ।

बंड बोलिलों शिवरायाच्या परमपूत काजा ॥२॥

माता माझी कष्टविली मीं राजनिष्ठ त्यासी ।

या पाप्यानें युद्ध मांडिलें देशरक्षकांशीं ॥३॥

चाल

जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला ।

राजनिष्ठाला । त्वां आधीं शतधा चिरणें ।

तुज करवीं घडतां मरणें । पावेन शुद्धि मग मानें ।

तुझ्या करींच्या तरवारीच्या घेइन जन्माला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥

चौक ५

देशभूमिच्या कसायासि कां इमान मी देऊ ।

भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं ॥१॥

कवणाची भाकरी बंधु हो चाकरि कवणाची ।

भाकर दे भूमाता चाकरि तिच्या घातकांची ॥२॥

राज्य हिसकलें देश जिंकला त्या पर अधमाशीं ।

राजनिष्ठ मी राहुनि कवण्या साधित नरकासी ॥३॥

चाल

ही गुलामगिरिची गीता । राजनिष्ठता ।

ह्यापुढें आतां । मद्देशचि माझा राजा ।

तो प्राण देव तो माझा । मी शरण शिवा सांग जा ।

राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानल ठेला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥

चौक ६

लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।

लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥१॥

लक्ष्मीचे मृदु कमल शारदा सुंदरिचा वीणा ।

स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥२॥

अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।

करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥३॥

चाल

बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे ।

जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा ।

जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।

खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥६॥

चौक ७

बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।

हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥१॥

शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।

दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥२॥

शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।

उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥३॥

चाल

ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला ।

परस्पर वदला । अजि खान, खानखानाजी ।

हुए शिकस्त मराठे हैं जी । फिर लढना क्यौं कर आजी ।

चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी ।

आप गाजि आप तो रणगाजी । झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥७॥

चौक ८

गुगवोनि अरि सर्प शिवा गारोडि गडावरि तो ।

प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥१॥

कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।

गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥२॥

अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।

बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥३॥

भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।

भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥४॥

चाल

वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला ।

हटविणें त्याला । रिपु तुडवित व्हा व्हा पार ।

चौक्यासि तुम्हा दावील । काजवा चोर कंदील ।

गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥८॥

चौक ९

तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।

अब्रह्मण्यम् कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥१॥

अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।

आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥२॥

साप विखारी देश जननिला ये घ्याया चावा ।

अवचित गांठुनि फसवुनि भुलवुनि असाच ठेचावा ॥३॥

चाल

ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् ।

तथैव; धीमान् । भारतीं कृष्ण वदला हें ।

अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।

राष्ट्ररक्षका सावध हो रिपु हुडकित तुज आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥९॥

चौक १०

हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।

गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥१॥

राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।

अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥२॥

जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला ॥

कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥३॥

चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।

तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥

चाल

वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या ।

करुनियां वाया । स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती ।

जा घेउनि अपुल्या हातीं । गड गोकुळांत नांदो ती ।

गडीं चालला शिव तो खिंडित दीन शब्द उठला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१०॥

चौक ११

आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।

झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥

संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।

हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥

खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।

मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥

चाल

तो हर हर एकचि झाला । वदति रे चला ।

म्लेंछ हा हटला । चला चढवा नेटाचा हल्ला ।

वीरश्रीचा करा रे हल्ला । निकराचा चालु द्या हल्ला ।

मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥११॥

चौक १२

म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।

श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥१॥

गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।

तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥२॥

त्या वाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।

पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥३॥

चाल

रघुराया रावणहरणा । कंसमर्दना ।

भो जनार्दना । लाडक्या देश जननीचे ।

स्वातंत्र्य रक्षणीं साचे । हे प्राण दान जरि अमुचे ।

पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१२॥

चौक १३

आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।

झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥१॥

दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।

भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥२॥

हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।

नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥३॥

चाल

कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।

तोलुनी धरिला । रणिं रंग पुन्हा ये साचा ।

गर्जती मराठे रिपुचा । घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।

उगवावा सूड देशाचा । आणि सूड स्वातंत्र्याचा ।

भोसका कटयारी बरच्या । करा माळा रिपुच्या आंतडयाच्या ।

लावा उटया त्यांच्या रक्ताच्या । त्याचा मस्तक चेंडू साचा ।

समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१३॥

चौक १४

डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।

जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥१॥

तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।

वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥२॥

तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।

धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥३॥

खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।

रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥४॥

चाल

तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काळीं ।

मर्मिं ती घुसली । श्री बाजी विव्हळ पडला ।

मागुती कांहिंसा उठला । बेहोष वीर परि वदला ।

तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१४॥

चौक १५

थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।

हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥१॥

जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।

रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥२॥

खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।

ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥३॥

भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।

प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥४॥

चाल

होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची ।

तोवरी साची । खिंड लढवाची ।

फेडाया ऋण या भूचें । अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।

द्या मुद्दल मोजुनि साचें । व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१५॥

चौक १६

काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।

शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥१॥

लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।

रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥२॥

शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।

मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥३॥

देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।

वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥४॥

चाल

तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।

हास्य मुख केलें । हा पहिला बार शिवाचा ।

हा दुसरा स्वतंत्र्याचा । हा तिसरा चवथा साचा ।

बार पांचवा धडाडला जय गर्जुनि प्राण दिला ।

चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥१६॥

चौक १७

दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।

रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥१॥

ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।

प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥२॥

भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।

असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥३॥

स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।

उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥४॥

चाल

श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती ।

आपुल्या रथीं । गंधर्व तनन तैं करिती ।

दुंदुभी नभीं दुमदुमती । श्री बाजी स्वर्गा जाती ।

करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।

चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१७॥

चौक १८

चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।

पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथें ॥१॥

श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।

म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥२॥

अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।

स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी ॥३॥

विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।

चरण घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥

स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel