आता ऐका माझे वचन । मनाने व्हावे रामर्पण ॥ माझे नातेगोते एक राम । हा भाव ठेवून जावे रामास शरण ॥ अनन्य व्हावे भगवंती । जो कृपेची साक्षात मूर्ति ॥ रामा आता करणे नाही उरले जाण । तुला आलो मी अनन्य शरण ॥ सुखदु :खाचा दाता । सत्य नाही दुजा आता ॥ जाणिवेने जैसे घ्यावे । तैसे मनाने सुखदु :ख भोगावे ॥ मी -माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण । तोपर्यंत नाही समाधान ॥ सर्वस्वी राहावे रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥ रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥ प्रयत्नेविण राहो नये । फळाची आशा ठेवू नये । भगवंताला विसरु नये । कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे ॥ प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम ॥ अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥

वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेच संताचे मुख्य लक्षण जाण ॥ जे जे घडेल काही । ते ते रामइच्छेने पाही ॥ असा करावा संसार । परि असावे खबरदार ॥ त्राता राम जाणुनी चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ति ॥ थोर भाग्य उदया आले । रामराय घरी आले । आता व्हावे रामाचे आपण । व्यवहार प्रपंच करावा जतन ॥ न दुज्याचा दोष पाहावा । त्याचा आपणापाशीच ठेवा ॥ देह आहे परतंत्र । मन राखावे भगवंताशी स्वतंत्र ॥ मनाने जो बांधला । परतंत्र वाटेल त्याला ॥ शरण गेला रामचरणी । त्याला नाही दुजी हानि ॥ अखंड करावे नामस्मरण । नीतिधर्माचे असावे आचरण ॥ बायकोमुले , लहान थोर । यांनी न सोडावा रघुवीर ॥ काळ फार कठीण आला । बुध्दिभेद त्वरित झाला ॥ आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण न जाऊ द्यावा क्षण ॥ चालले तसेच चालावे । राम ठेवील तसे असावे ॥ माझा राम जोडला हे जाणले ज्याने । त्याला न उरले करणे ॥ राम ठेवील ज्या स्थितीत । त्यात समाधान मानावे ॥ रामास जे करणे असेल । ते तो करील ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जो करी रामपदांबुजचिंतन । तयास नाही यमाचे बंधन ॥ संताची सेवा केली । महदभाग्य घरी आले ॥ एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण ॥ तोच खरा धन्य धन्य ॥ संताचे मर्जीने वागल्यास । कल्याण होईल खास ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel