फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते ; हे चांगले नाही . काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे . नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा , म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर , जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल . प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे . प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे , आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते . खरोखर , परमार्थाला दुसर्‍याची गरजच नाही ; मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे , आपणच तेवढे बरे नाही . दरवाजे , खिडक्या , हे जसे घराचे साधन आहे , किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे , त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी , किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी , प्रपंच हे साधन आहे . नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही . प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच . गरिबाचा असो की अडाण्याचा असो , अधिकार्‍याचा असो की कारकुनाचा असो , या देशातला असो की त्या देशातला असो , प्रपंचाचा धर्म जो उणेपणा , अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा , तो कधीही कुठेही बदलत नाही . म्हणून , जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये . आहे त्यात समाधान ठेवावे . परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो ; आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो . परमार्थाची जाणीव जेवढी दु : खात होते , तेवढी सुखात असताना होत नाही . ते सुख शेवटी दु : खांतच लोटते . ज्या जाणिवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो , ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही . वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात . अशा वेळी , मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात . मी विकारवश होत असेन , तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरुर आहे . विकारांना वश न होता , प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही .

थर्मामीटर ताप दाखवितो , घालवीत नाही , तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवितात , काय करावे ते दाखवितात ; पण करणे आपल्याकडेच आहे . समर्थांना राम दिसला , आम्हांला का दिसू नये ? तर आम्ही समर्थाप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून . कसेही करा , पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा . नाम जाणून , अजाणून , श्रद्धेने , अश्रद्धेने , कसेही घ्या , राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास ! नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ . म्हणून , अखंड नामात रंगून आनंदात राहू या .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel