लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय ; वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय ; आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय . अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत . त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे . ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे . कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग , तो करणारावर अवलंबून असतो . ज्ञान हे मुळात पवित्र आहे . जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते . सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे . श्रीमंत - गरीब , विद्वान - अशिक्षित , लहान - थोर , स्त्री - पुरुष या सर्वांना एकेमेकांबद्दल प्रेम , आदर आणि आपुलकी वाढेल , असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे . द्वेष - मत्सर वाढवील , नीतिधर्माला फाटा देईल , असे ज्ञान पुस्तकात नसावे . विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात , आणि त्यामुळे सर्वनाश होतो . जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे . जगाचे खरे स्वरुप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय .

देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान ; जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान . मी देहाला ‘ माझा ’ ’ म्हणतो , अर्थात मी देह नव्हे . ‘ माझे घर ’ म्हणणारा ‘ मी ’, घराहून वेगळा ठरलो ! जडत्व म्हणजे काय ? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व . पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा . व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची ; जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी . सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे . आत्मा हा समुद्र आहे , तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे . त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे . ‘ ब्रह्म सत्यं , जगन्मिथ्या ’ अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या , तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील ; पण नामाचे महत्त्व कळणार नाही ; ते एक संतकृपेनेच कळते . नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे . आपण बुद्धिभेदापासून सावध , दूर राहिले पाहिजे . संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे ; त्यानेच समाधान लाभेल .

ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते , ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते , अनीतीचे वर्तन टाकून नीतिमार्ग , धर्ममार्ग , याचा अवलंब करावासा वाटतो , ते सदग्रंथ ; उदाहरणार्थ , ज्ञानेश्वरी , दासबोध , नाथभागवत . हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे , हेच फार जरुरीचे आहे ; त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel