परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत . आपल्या गुरुंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे . मध्येच दुसरा मार्ग घेतला , तर पल्ला कधीच गाठायचा नाही . एका वैद्याचे औषध सोडून दुसर्‍याचे घेतले , तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली . तरीही ती माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी . ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले , त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला ; गुरुआज्ञापालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही . पण तुम्हाला असे वाटते कुठे ?

विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय , दोन्ही त्याज्यच ; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय , दोन्ही त्याज्यच . मी कोण हे आधी जाणले पाहिजे ; परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते . दोघांचेही स्वरुप एकच आहे , म्हणजे दोघेही एकच आहेत . परमात्मा निर्गुण आहे , आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे . म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे . कोणतीही गोष्ट आपण ‘ जाणतो ’ म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते ; त्याखेरीज जाणणेच होत नाही . म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरुप व्हायला ? यालाच ‘ साधू होऊन साधूस ओळखणे , ’ किंवा ‘ शिवो भूत्वा शिवं यजेत ’ असे म्हणतात . आता , कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत . ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरुपाने उदभूत होतात ; नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते . म्हणून परमात्मस्वरुपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून , आपण आपले अंत :करण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे . जर आपण साधन करुन निष्पाप होऊ शकलो , तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही .

देवाच्या गुणाने आणि रुपाने त्याचे गुण आणि रुप मिळेल , पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो . म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे . आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे ; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे . याहून दुसरे काय मिळवायचे ? मी सुखाचा शोध केला , आणि ते मला सापडले . म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन . तो मार्ग म्हणजे , भगवंताचे अनुसंधान होय . मी अत्यंत समाधानी आहे , तसे तुम्ही समाधानी राहा . जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा , पण भगवंताच्या नामाला सोडू नका . अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे . नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे . याहून दुसरे काय मिळवायचे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel