आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी . आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे . किंबहुना , लहान मुलाला जशी आई , मोठ्या मुलाला जसा बाप , बाईला जसा प्रेमळ नवरा , मुनीमाला जसा सज्जन मालक , नोकराला जसा त्याचा स्वामी , एखाद्याला जसा विश्वासू मित्र , तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे . म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे . भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन , त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा , हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री - पुरुषाला समजणे अशक्य आहे . जगात घडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे . इतकेच नव्हे , तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले - वाईट फळ मिळेल , ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी . अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते , त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही . सर्व काही राम करतो , खरे कर्तेपण रामाचे , हे नीट लक्षात आणून , भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे . खरोखर , आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल . जे देईल त्यांत समाधान मानावे . दुसर्‍या कोणाच्याहीजवळ आपण कधी मागू नये . त्यामध्ये उपासनेला कमीपणा आहे . मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये .

माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही . माझ्या गुरुंनी मला नामच दिले , तेच नाम मी सर्वांना देत आहे . तुम्ही ते नाम घ्या , तुम्हाला राम खात्रीने भेटेल . तोंडाने नेहमी ‘ राम राम ’ म्हणत जा . भगवंताच्या नामामध्ये जिवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे . म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री - पुरुषांनी घ्यावे . कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा . गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी , फक्त भगवंतासाठी असावी . आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो , ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे . ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात , त्या वेळी कलियुग सुरु झाले असे समजावे . सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात . विषयांची प्राप्ती करुन घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते . अशा वेळी , भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच ; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील , तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही . म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे . जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel