आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे . परमात्मा साधायचा आहे , आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत , हे पक्के समजावे . आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो , म्हणून आपले चुकते . एका गृहस्थाला मुलाबाळांसह जायचे होते . आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली , पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला . गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले , त्या गृहस्थाला नाही तसे वाटले .

वसिष्ठांनी रामाला सांगितले की , " रामा , तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा . " ‘ मी देह नसून आनंदरुप आत्मा आहे , निःसंग आहे , ’ ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा . जमीन सोडून कुणाला राहाता येत नाही , त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही . पण त्यात ‘ राम कर्ता ’ मानून वागणारा तो पारमार्थिक , ‘ मी कर्ता ’ असे मानून वागणारा तो प्रापंचिक . ‘ मी कर्ता ’ असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरुप राहतो , सुखरुप होत नाही , तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्धच झाले ! प्रपंच हा अर्धवटच आहे , पूर्ण फक्त राम आहे . मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही , तसे प्रपंचाचे आहे . म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण , ते अखंड करावे . प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही , तरीही कष्ट करतो . परमार्थात तसे नाही . परमार्थ जितकाजितका करावा तितकेतितके समाधान अधिकाधिक असते . आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युसमयीही प्रपंचच आठवेल . म्हणून प्रपंचाचा हव्यास धरु नये . प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून , त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे . ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी . प्रपंचात , प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा , गेल्याचा शोक न करावा . देह प्रारब्धावर टाकावा . हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे : आपण रामाचे व्हावे . राम ठेवील तसे समाधानाने राहावे . हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे ; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे .

सर्व ईश्वराचे आहे , माझे काही नाही , असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे . आपण भगवंताचे झालो तरी सुखी होऊ , नाहीतर दुःखी होतो . धान्यातले दगड , माती , पाकड , निवडून बाजूला काढून , धान्य जे सार , ते घ्यावे ; त्याचप्रमाणे , अहंकाराचे खडे , ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड , आत्मस्वरुप परमार्थात मिसळल्याने दुःखरुप प्रपंच होतो . ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel