ज्याचे ‘ हवेपण ’ जास्त असते तो गरीब जाणावा , आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा . परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते , त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही . ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत . आमचा आधार पैशाचा ; तो आज आहे अन उद्या नाही . पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल ? श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये , याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी . खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा , हीच खरी श्रीमंती , हेच खरे भाग्य , आणि हेच खरे ऐश्वर्य होय . ज्याला समाधान जास्त , तो जास्त भाग्यवान समजावा . समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते , दुसरा कुणी ते आपल्याला देऊ शकत नाही . खरोखर , समाधानासारखे औषधच नाही . ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात . काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान , शांती आणि आनंद मिळतो . पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता , त्याला विचारले तर तो म्हणाला , " अहो , मला मधुमेह झाला आहे ; मी आतून पोखरला गेलो आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे . " खरोखर , त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्‍या ऐश्वर्याची अवस्था आहे . फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे . ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही , पण ते झोपडीमध्येही नसेल . असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे ! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत . पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही . जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली ? व्यक्ती काय किंवा समाज काय , यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे . चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही . हल्लीचे तत्त्वज्ञान नुसते अभ्यासी आहे , अनुभवाचे नाही ; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही .

खरोखर , प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे . भगवंताशिवाय जो राहतो त्याला सूखदुःख येते ; आणि सुख म्हणजे तरी काय , दुःखाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते ; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे . पण कुणी असा विचार करीत नाही की , जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का ? याचे उत्तर ‘ नाही ’ असेच मिळते . ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे . बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे , भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे . हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel