धार्मिक संस्कार फार चांगले असतात , कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते . प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच . ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही ; मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो . खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते ; पण त्यातल्या त्यात , संस्कारकर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे . त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे , कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतु आहे . संस्कार करीत असताना जरुर असलेला धार्मिक विधी तर करावाच , पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे , आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत , त्यांना जेवायला बोलवावे . लौकिक मात्र वाढवू नये . वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू . संस्कार हे भगवंताचे स्मरण करुन देतात . समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही . ‘ आम्हांला बंधने नकोत ’ असे म्हणणारे लोक वेडे आहेत . बंधनांमुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे . म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे . धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात . सध्या बंधने बुडत चालली आहेत . पूर्वी धर्मावर श्रद्धा होती , म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते . पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही . अलीकडे काही लोक असे म्हणतात की , समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत . पण अध्यात्मविद्या असे सांगते की , नीतीचे नियम कायमच आहेत . ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे . एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल ; पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल . धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय . धर्म वस्तुजानाला संस्काराच्या रुपाने नीट धरुन ठेवतो .

व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय ; आणि जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय . भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले , तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते . जग आडवे का येते , तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून . जगाशी वागताना आम्हाला निःस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही . हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निःस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे . त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे , आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे . जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी , म्हणजे झाले .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel