ज्याला म्हणावें मी ‘ माझें ’ । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥ स्वतःचा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दुःख अनिवार होई ॥ तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार । सर्व सत्ता रामरायाचे हातीं । तेथें आपल्या मानवाची काय गति? ॥ विचारानें दुःख सारावें । सर्वांचें समाधान राखावें । सर्व केलें रामर्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण । अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥ परमात्म्याचे रक्षण । कोणतेही स्थळीं, कोणतेही काळीं, असतें हा भरंवसा । याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥ ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥ उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढें एक पाऊल टाकून । उपासनेंत राहावें आपण । तेथें आहे निर्धास्तपण । उपासापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥ उपासनेंत राहावें आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥ शेजार असतां रामाचा ॥ दुःखाची, काळजीची काय वार्ता? । जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वता ॥ एवढें आता ऐकावें माझें । राम उतरील सर्व ओझें ॥ स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥ देवाकडे करावी विनंति । देहदुःख अति फार । होई रामाचा विसर । आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥ परमात्मा दयाळू फार । आपले हिताचें करील हा ठेवावा निर्धार ॥ मी आहे तुमच्यापाशीं हा ठेवावा विश्वास । न सोडावा आतां धीर । सदा घ्या भगवंताचें नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥ राम कृपाळू, दीनांचा नाथ । तो सर्व कांहीं पाहात ॥ आपले प्रारब्धानें आलेलें कर्म । ते त्यास न विसरतां करावें अर्पण ॥ सुखानें घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥
मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचें चिंतन । हेंच दुःखाला खरें कारण ॥ स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दुःखाला कारण ॥ आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दुःख, चिंता, शोक यांचे मालक व्हावें लागलें ॥ सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥ सुखदुःख परिस्थितीवर नसतें । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहतें ॥ दुःखाचें मूळ कारण । जगत सत्य मानलें आपण ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel