मोहन प्रकाशला हिमालयातील त्या गुप्त ठिकाणी सोडून पुन्हा आपल्या विश्वात परतला. त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य केल्यानंतर प्रकाशला आपल्या शक्ती नियंत्रित करता येऊ लागल्या होत्या. तो जेव्हा पृथ्वीवर परतला तेव्हा तिथली चार वर्षे उलटून गेली होती. प्रकाशला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले आहे असे चार वर्षांपूर्वी मोहनने वसंतला संमोहनावस्थेत नेऊन सांगितले होते. त्यामुळे तो आत्तापर्यंत त्याच्यापासून सत्य लपवून ठेवू शकला होता. परंतु इतकी वर्षे प्रकाशशी काहीही संपर्क नसल्याने त्याच्या मनात या गोष्टीविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण प्रत्येक वेळी मोहन काही न काही कारण सांगून वसंतपासून सत्य लपवित असे. त्यानंतर चार वर्षांनी जेव्हा प्रकाश आपल्या घरी परतला तेव्हा मोहन आणि वसंत या दोघांच्याही आनंदाला काही सीमा उरली नव्हती. या चार वर्षात त्या दोघांच्याही जीवनात बराच फरक पडला होता. मोहन आता खासदार राहिला नव्हता. त्याच्या पदाचा कालावधी संपताच त्याने राजकारणातून संन्यास घेतला होता. वर्षभरापूर्वी वसंतची मुलगी 'रिया' चे एका जीवघेण्या आजाराने निधन झाले होते. त्यानंतर एकट्या पडलेल्या वसंतला मोहननेच आधार दिला होता. ते दोघेही आता मोहनच्याच घरी एकत्र राहू लागले होते.

चार वर्षांमध्ये नागलोकातही बऱ्याचशा घटना घडल्या होत्या. नागमणी प्राप्त करण्याच्या लालसेने नागराज, नागऋषी आणि इतर शक्तिशाली, सामर्थ्यवान नागांची बरीचशी शक्ती क्षीण झाली होती. याच संधीचा फायदा घेऊन अनंताने त्याच्या जुन्या नाग मित्रांच्या मदतीने, आणि नागराजच्या जुलुमांना कंटाळलेल्या इतर नागांना संघटीत करून, नागराजचा आणि त्याच्या बाजूने लढणाऱ्या तेथील इतर नागांचा वध केला होता. त्यानंतर अनंताने त्याच्या साथीदार नागांच्या आणि त्याच्या बाजुने असणाऱ्या नाग प्रजेच्या इच्छेनुसार नागराजपदाचा स्वीकार केला. त्यानंतर तो तिथेच वास्तव्य करणार असल्याचे त्याने एका गुप्त संदेशाद्वारे मोहनला कळविले होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel