प्रकाश आणि किरणचा विवाह होऊन जवळपास दोन वर्षे झाली असावीत. विक्षरचा जन्म झाला होता. त्याला सांभाळण्यासाठी किरणने आपली नोकरी सोडली होती. तिच्या घरी राहण्यामुळे आता तिचे प्रकाशवर चांगले लक्ष असे. तिच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून प्रकाशमध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपण होते. पण ते काय आहे? ही गोष्ट आजून तिच्या लक्षात आली नव्हती.

किरण अधून-मधून मोहनरावांच्या ऑफिसमध्ये येत जात असे. त्यामुळे अधून-मधून प्रकाश तिथून गायब असतो ही गोष्ट तिच्या चांगलीच लक्षात आली होती. त्याबद्दल तिने प्रकाश आणि मोहनला विचारले असता, त्या दोघांनीही तिला कामाचे निमित्त सांगितले. सुरुवातीला किरणनेही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. पण ज्यावेळी हा सर्व प्रकार वारंवार तिच्या निदर्शनास येऊ लागला. त्यावेळी मात्र तिने सत्य जाणून घेण्यासाठी प्रकाशवर गुप्तपणे लक्ष ठेवणे सुरु केले. प्रकाशचे किरणवर जीवापाड प्रेम होते. स्वतःपेक्षाही अधिक त्याचा तिच्यावर विश्वास होता. त्यामुळे विवाहपश्चात त्याने आपल्या शक्तींचा उपयोग तिच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी कधीही केला नव्हता. म्हणूनच किरण आपल्यावर लक्ष ठेऊन आहे या गोष्टीपासून तो गाफील राहिला होता. किरणच्या मनातील शंका तिला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून एके दिवशी तिने प्रकाशचा पीछा करून या सर्व रहस्यांचा शोध घ्यायचे ठरवले.

त्या दिवशी प्रकाश आणि मोहन, दोघेही नेहमी प्रमाणेच ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. प्रकाशने मोहनला ऑफिसपर्यंत सोडले आणि तो आपले इच्छित कार्य कार्यासाठी तिथून निघाला. ते दोघेही घराबाहेर पडताच किरणने गुप्तपणे त्यांचा पाठलाग सुरु केला. प्रकाश कुठे जातो हे पाहण्यासाठी ती त्याच्यापासून काही अंतर ठेवून त्याच्या मागे-मागे जात होती.

चालता चालता प्रकाश एका गल्लीत शिरला, त्याच्या आजूबाजूला त्याला कोणी बघत तर नाही ना? या गोष्टीची खात्री करून तो क्षणार्धात तिथून अदृश्य झाला. हा सर्व प्रकार किरणने आपल्या डोळ्यांनी बघितल्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला होता. क्षणार्धात प्रकाश तिच्या डोळ्यांसमोरून अदृश्य झाल्याची घटना तिच्यासाठी असामान्य व अविश्वसनीय होती. आजवर ती ज्याला सर्वसामान्य मनुष्य समजत होती, तो प्रकाश नेमका कोण होता? तो असा अचानक कुठे जात असावा? यासारख्या असंख्य प्रश्नांचा मनात विचार करत ती आपल्या घराच्या दिशेने येत असतानाच रस्त्यावरील एका वाहनाने तिला जोराची टक्कर दिली. असे म्हणण्यापेक्षा आपल्याच विचारांच्या तंद्रीत चाललेली किरण अचानक त्या वेगवान वाहनांच्या समोर आली होती. ऐन वेळेला तिला आपल्या वाहनाच्या समोर पाहून तो वाहनचालकही खूप घाबरला. त्याने आपल्या वाहनाची गती कमी करण्याचा आपल्या परीने खूप प्रयत्न केला. पण, तरीही तो हा अपघात रोखू शकला नाही. क्षणार्धात किरणचा त्या वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला. अशाप्रकारे किरणचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूसाठी प्रकाश आजवर स्वतःलाच दोषी ठरवत होता. किरणने भौतिक जग जरी सोडले असले, तरी प्रकाशच्या मनातील जगात ती आपले अढळ स्थान निर्माण करून गेली होती. ज्याची जागा इतर कोणालाही घेता आली नसती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel