जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'

मी जातां राहिल कार्य काय ? ध्रु०

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;

तारे अपुला क्रम आचरतिल,

असेच वारे पुढे वाहतिल,

होईल कांहिं का अंतराय ? १

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,

गर्वानें या नद्या वाहतिल,

कुणा काळजी कीं न उमटतिल

पुन्हा तटावर हेच पाय ? २

सखेसोयरे डोळे पुसतिल,

पुन्हा आपल्या कामिं लागतिल,

उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल,

मी जातां त्यांचें काय जाय ? ३

रामकृष्णही आले; गेले !

त्याविण जग का ओसचि पडलें ?

कुणीं सदोदित सूतक धरिलें ?

मग काय अटकलें मजशिवाय ? ४

अशा जगास्तव काय कुढावें ?

मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?

हरिदूता कां विन्मुख व्हावें ?

कां जिरवुं नये शांतींत काय ? ५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel