''.... अहो छे हो ! तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत ! प्लेगचेच दिवस होते ते ! कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं ! तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें ! असो, जशी ईश्वराची इच्छा ! - यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण ! ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका ! किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून ! पण अगदी नाइलाज होता ! - एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण ! आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग ! या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती ! नाहीं, तुम्हीच सांगा ! - अनंतराव, काय सांगूं तुम्हांला ! ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता ! - अहो पुढें काय ? प्रारब्ध माझें ! दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून ! दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर ! - पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस ! जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों ! - आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला ? माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर ! या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला ! कठीण ! - काळ मोठा कठीण येत चालला आहे ! असो ! पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार ? .... ''

४ नोव्हेंबर १९११

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel