हिंदवी स्वराज्य अजिबात कर्जबाजारी नव्हते. इ. १६७० हे वर्ष महाराजांना प्रचंड यशदायी धनदायी ठरले. पण याचे वर्म आणि मर्म काय ? या यशाच्या नौबतींचा आणि शिंगतुताऱ्यांचा आवाज प्रेरणादायी आहे हे खरे. पण या मागे महाराजांनी आणि त्यांच्या प्रत्येक सैनिकानेही योजनाबद्ध केलेली पूर्व आणि पूर्ण तयारी , कडक अनुशासन , तिखट शिस्त आणि आपल्या नेत्यावरती व ध्येयावरती अढळ निष्ठा व विश्वास हे या यशाचे मर्म आहे. महाराज शिवाजीराजे हे पाच वर्षात शिवनेरी गड घेण्यात अपयशी ठरले. नंतर लगेच माहुलीगड घेण्यातही प्रथम त्यांना पराभव पत्करावा लागला. बाकी सर्वत्र सर्व मावळ्यांना व सरदारांना अचूक यश मिळत गेले.

महाराजांनाच दोन ठिकाणी अपयश आले. कोणाही सरदाराच्या वा सैनिकाच्या मनांत अविश्वासाचा ठराव लिहिला गेला नाही. कारण नितांत , विश्वास आपल्या नेत्याच्या ईश्वरी महत्त्वाकांक्षेची प्रत्येकाला पुरेपूर खात्री होती. माहुलीचा किल्ला ही महाराजांनी लगेच जिंकलाच की , शिवनेरी जिंकण्याकरिता महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना आज्ञा केली. प्रधानपंतांनीही शिवनेरीवर कडवा हल्ला चढवला. पराक्रमाची साऱ्या सैन्याने शिकस्त केली पण शिवनेरी पुढे मोरोपंतांनी हार खाल्ली. मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. पण माघारी फिरलेले पराभूत मोरोपंत त्र्यंबकच्या किल्ल्यावर चालून गेले. (दि. २५ ऑक्टोबर १६७० ) या दिवशी मोरोपंतांनी किल्ले त्र्यंबकगड काबीज केला. म्हणजेच इ. १६७० च्या प्रचंड विजयमालिकेत फक्त शिवनेरीचा अपवाद सोडला तर ही मालिका अपरंपार यशदायीच ठरली.

एका मागोमाग एक मोहिमा सतत चालू आहेत बघा! स्वराज्याचा अंतर्गत राज्यकारभार चोख ठेवला जात आहे. बघा. कोकण पट्टा आणि समुद फिरंग्यांना , जंजिरेकर श्यामलांना आणि मोमईकर इंग्रजांना बिनतोड जबाब देत अखंड सावधान , सारेचजण आगरी , कोळी , भंडारी , कोकणी कुणबी सारेचजण दर्यावदीर् बनले आहेत बघा. त्यामुळे महाराजांना कोकणची चिंताच वाटत नव्हती. अनुशासन ठिकेठीक होते. एक विचार मनात येतो. बोलू काय ? भारताच्या पंतप्रधान इंदिराजी यांनी (इ. १९७६ ) मध्ये एक भयंकर अवघड प्रयत्न करून पाहिला. त्यांनी वीस कलमी कार्यक्रम शासनाच्या हाती घेतला. जनतेच्या पुढे ठेवला. ती वीस कलमे खरोखरच राष्ट्राच्या हिताची नव्हती काय ? क्वचित थोडाफार कोणाचा यात मतभेद होऊ शकेल. पण उत्कृष्ट अनुशासन असावे आणि कष्टास पर्याय नाही , या दोन कलमांशी कशाकरिता कोणाचा विरोध असेल ? इंदिराजींच्या राजकीय मतांशी व धोरणांशी मतभेद असावयास हरकतच नाही. पण जे निविर्वाद राष्ट्राच्या कल्याणाचे आहे त्याच्याशीही आमचा मतभेद असावा का ? अनुशासन , कष्ट , भ्रष्टाचाररहित राज्ययंत्रणा आणि कडवे स्वराज्यप्रेम या गोष्टी शिवशाहीतही निर्धाराने पाळल्या जात होत्या. म्हणूनच हिंदवी स्वराज्य छत्रचामरांकित सार्वभौम सुवर्ण सिंहासनावर अधिष्ठित होऊ शकले ना ? आम्ही त्याचा विचार कधी करतो का ?

सुरत , नगर , हुबळी , कारंजा , नंदुरबार , औसा , इत्यादी अनेक मोगली ठाण्यांची महाराजांनी लूट केली असे आपण पाहतो. ते खरेही आहे. पण त्यातही महाराजांचे विचार , खंडणी गोळा करण्याचे नियम , त्यातील कडक अनुशासन , त्यातील नीती आणि शिस्त महाराजांनी किती दक्षतेने पाळली होती. याचाही अभ्यास झाला पाहिजे. कोणाही गरीब कुटुंबाला झळ लागू नये याची दक्षता ते घेत होते. ज्यांना ‘ श्रीमंत ‘ म्हणता येईल अशा लक्षाधिशांना आणि ज्यांना ‘ नबकोट नारायण ‘ म्हणता येईल अशा अतिश्रीमंतांना महाराज पैसे मागत होते. त्याच्या पावत्याही दिल्या जात. पुन्हा त्या पावतीधारकांना कोणीही त्रास देत नसे. तत्कालीन उद्योगधंद्यांचे कारखाने उभे करावेत आणि परदेशांशीही आयात-निर्यातीचा व्यापार करावा असे विचार महाराजांच्या मनात येत नव्हते असे नाही. थोडाफार प्रयत्न त्यांनी केलेला दिसूनही येतो. पण पारतंत्र्यातलाच स्वदेश स्वतंत्र करण्याकरिता युद्धाचाच प्रचंड खचिर्क उद्योग महाराजांना करावा लागल्यामुळे शांततेतच करण्यासारखे बाकीचे उद्योगधंदे करण्यास त्यांना वेळ , स्वास्थ्य आणि पैसाही पुरेसा नव्हता. या साऱ्या लुटींच्या मागे एक कठोर पण निश्चित उदात्त हेतू होता. स्वराज्य श्रीमंत पैसेवाले नव्हते. खाऊनपिऊन सुखी होते. स्वराज्याला एक पैशाचेही कर्ज नव्हते. पुढे पेशवाईत प्रत्येकाला कर्जच होते.

स्वराज्य स्वावलंबी असावे असा प्रयत्न महाराजांचा होता. गलबते बांधण्याचे कारखाने (गोद्या) त्यांनी कोकणात काढले होते. पुरंदर किल्ल्यावर तोफा ओतण्याचाही कारखाना त्यांनी काढला होता. गावोगावच्या गावकामगारांना चांगल्या प्रमाणात उद्योगधंदे मिळत होते. सुतार , लोहार , चांभार , मातंग इत्यादी छोट्या पण पारंपरिक व्यावसायिकांना हाताला काम अन् पोटाला दाम मिळत होता. मिठागरांना कोकणात पूर्ण संरक्षण होते. वतनदारांपासून इतकेच नव्हे तर धामिर्क देवदेवस्थानांपासूनही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये , त्यांना भुर्दंड बसू नये याबाबतीत ते दक्ष होते. याबद्दलची अनेक पत्रे उपलब्ध आहेत.

या कालखंडात मराठी बंदरांतून आखाती देशांशी विशेषत: मस्कतसारख्या शहरी बंदरांशी व्यापार चालत होता. याबाबतीत डॉ. बी. के. आपटे यांचा मराठी व्यापारी आरमाराच्या संबंधीचा इतिहास ग्रंथ वाचनीय आहे.

अरबी व्यापारीही घोड्यांचा व हत्यारांचा व्यापार स्वराज्याच्या बंदरांशी निर्धास्तपणे करू शकत होते. त्यांच्यावर आथिर्क , धामिर्क किंवा शारीरिक जुलुम जबरदस्ती कधीही होत नसे. पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. अरबस्थानातून काही सौदागर बरेचसे (नक्की आकडा माहीत नाही) अरबी जातिवंत घोडे विकावयास भारतात आणीत होते. असा व्यापार नेहमीच चालायचा. घोड्यांना निरनिराळ्या भारतातील सत्ताधाऱ्यांची , सरदारांची , श्रीमंतांची आणि व्यापाऱ्यांचीही मागणी असायची. हे घोडे मराठी राज्यातल्या बंदरातही उतरायचे. एकदा असेच बहुदा मोठ्या संख्येने अरबी सौदागरांनी गिऱ्हाईकांची मागणी पुरविण्यासाठी घोडे राजापूर बंदरात आणले.

ही घोड्यांची गलबते येत असल्याची बातमी महाराजांना रायगडावर समजली. महाराजांनी राजापुरच्या आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा पाठविली की , ‘ हे अरबी घोडे ताब्यात घ्या आणि त्याची जी काही किंमत असेल ती ताबडतोब द्या. ‘ त्याप्रमाणे राजापुरच्या सुभेदाराने हे घोडे जागीच ताब्यात घेतले आणि त्यांनी अरबी सौदागरांना सांगितले की , ‘ तुमच्या अन्य कोणा गिऱ्हाईकांना हे घोडे यावेळी विकत न देता आम्हालाच विकत द्या. महाराजसाहेब याची पूर्ण किंमत आपणास देतील. ‘ अरबांना हे मान्य करणे भागच होते. त्यात त्यांचे नुकसानही नव्हते. थोडीशी सक्ती होती पण जुलुम अजिबात नव्हता. अशा व्यवहाराला म्हणत असत ‘ खूशखरेदी. ‘

-बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel