चार लाख गांधी टोप्या
महाराष्ट्र चरकासंघानें महात्माजींच्या येत्या वाढदिवसाच्या मंगल निमित्तानें चार लाख गांधी टोप्या महाराष्ट्रांत खपविण्याचा संकल्प केला आहे. हा पुण्य संकल्प पुरा करण्यासाठीं सर्व महाराष्ट्रानें उभें राहिलें पाहिजे. चार लाख गांधी टोप्या चुटकीसरशा खपून गेल्या पाहिजेत.

ज्याचा वाढदिवस साजरा करावयाचा त्याच्या आवडीची गोष्ट आपण केली पाहिजे. महात्माजींना सर्वांत प्रिय गोष्ट कोणती ? खादी. ते एकदां म्हणाले, 'मरतांना माझ्या तोंडांतून कदाचित् राम नाम निघणार नाहीं. चरका चरका असेच शब्द कदाचित् बाहेर पडतील.' महात्माजींना चरका हें भगवंताचें नांवच वाटतें. परमेश्वराला भक्त हजारों नांवानीं आळवितो. महात्माजी चरका या नांवानें त्याला आळवितात. चरक्याच्या स्वरूपांत त्यांना ईश्वराचें दर्शन होतें.

गरिबांचा साह्यकारी देवाशिवाय कोण आहे ? चरका गरिबांना साहाय्य करतो म्हणूनच त्याला देव म्हटलें पाहिजे. चरक्यामुळें गरिबांना घरबसल्या सुखाचा घास मिळतो. स्वाभिमानानें श्रम करून त्यांना पोटाला मिळवितां येतें. चरक्यानें लाखों निराश बंधुभगिनींच्या जीवनांत आशा निर्मिली आहे. जो कोणी गांवोगांव जाऊन हें पाहील त्याच्या अनुभवाला ही गोष्ट येईल.

म्हणून महात्माजींना चरक्याचा ध्यास, खादीची अपार प्रीति. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीं म्हणूनच खादीचें सर्वांत अधिक महत्व. महात्माजींचा वाढदिवस साजरा करावयाचा म्हणजे जास्तींत जास्त खादी खपवावयाची, स्वत: घ्यावयाची. हें आपण नाहीं का करणार ?

महात्माजींचे या हतपतित राष्ट्रावर अनंत उपकार ! केवढें त्यांचें कार्य, किती अपार परिश्रम ! या ३५ कोटी लोकांच्या राष्ट्रांत एक प्रकारची निराशा होती. सर्वत्र भीतीचें वातावरण होतें. या महापुरुषानें राष्ट्राला आशावंत केलें. भयभीत राष्ट्राला निर्भयतेचा महामंत्र दिला. सारें राष्ट्रीय जीवन चैतन्यमय केलें. अमुक एक असें कार्यक्षेत्र त्यांनीं ठेवलें नाहीं, ज्यांत आपली दिव्य दृष्टि घेऊन ते गेले नाहींत. त्यांनीं स्वातंत्र्ययुध्दाचे महान् प्रयोग केले. लाखों लोकांना देशार्थ त्याग करावयास उभें केलें. नि:शस्त्र जनतेच्या हातांत तोफांना तोंड देणारें नि:शस्त्राचें शस्त्र दिलें. लहान मुलें हांसत फटके खाऊं लागलीं. बायका अंगावर घोडे दौडत येत आहेत तरी खंबीरपणें उभ्या राहिल्या. सारा राष्ट्राचा आत्मा महात्माजींनीं जागृत केला. राष्ट्रीय शिक्षण असो, दारुबंदी असो, अस्पृश्योध्दार असो, हिंदुमुस्लीम ऐक्य असो, ग्रामोद्योग असोत, ब्रह्मचर्याचे प्रयोग असोत, गोरक्षण असो, स्त्रियांची सुधारणा असो, हिंदी-प्रचार असो, साहित्यसंसार असो-सर्वत्र हा महापुरुष एक दिव्य दृष्टि देत आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण जीवनाला प्रचंड चालना देणारा असा महापुरुष राष्ट्राला भाग्यानें मिळत असतो. मग अशा या महापुरुषाचे कसे उतराई होणार ? परंतु आपण देवाला एक लहान फूल देतो, एक काडवात लावून ओंवाळतों. कृतज्ञता व्यक्त करतों. कृतज्ञता व्यक्त करावयास मानवी आत्मा भुकेलेला असतो. महाराष्ट्राचा आत्मा महात्माजींबद्दल कृतज्ञता दाखवावयास भुकेलेला नाहीं का ?

जर भुकेलेला असेल तर ही शुभ्रस्वच्छ खादी टोपी तरी निदान घेऊन कृतज्ञता प्रकट करा. ही लहानशी तीन आण्यांची टोपी ती घ्या. आपल्या डोक्यावर ती धारण करा. ही तीन आण्यांची टोपी-परंतु तींत पृथ्वीमोलाच्या वस्तू सांठवलेल्या आहेत. श्रीकृष्णाच्या चिमण्या तोंडांत यशोदामाईला सारें ब्रम्हांड दिसलें. परंतु तें यशोदेला दिसलें. तिच्या त्या पवित्र प्रेमळ दृष्टीला दिसलें. त्याप्रमाणें निर्मळ दृष्टीनें, पक्षातीत दृष्टीनें जो या लहानशा गांधी टोपींत पाहील त्याला विश्वब्रम्हांड दिसेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel