चाल ॥कटाव॥

श्रीमंत सवाई नांव पावले । दिव्य तनू जणुं चित्र बाहुलें । विचित्र पुण्योदरीं समावले । नानातें राज्याचे अवले ।

विधात्यानें नेमून ठेविले । बसल्या जागा कैक छपविले । उन्मत्त झाले तेच खपविले । अति रतिकुल दोरींत ओविले ।

जगावयाचे तेच जगविले । तमाम शत्रू मग नागविले । तपसामर्थ्यें येश लपविलें । दिल्ली अग्र्‍या झेंडे रोविले ।

अटक कर्नाटकांत भोंवले, जिकडे पहावें तिकडे उगवले, माधवराय पुण्याचीं पावले, टिपूसारखे मुठींत घावले, मेणापरिस मृदु वांकविले ।

सवाई तेजापुढें झांकले । पुण्य सबळ उत्कृष्‍ट फांकले । नानापुढें बुद्धिवान चकले । कैक त्यांची तालीम शिकले ।

तरि ते अपक्व नाहीं पिकले, दहा विस वर्षें स्वराज्य हांकिले, श्रीमंताचें तक्त राखिलें , अक्कलवंत कोठेंहि न थकले ।

श्रीमंत गर्भीं असतां एकले, नानांनीं राज्य ठोकुनि हाकिले, माझे करुनि महाभाव केलें, जहाज बुद्धीबळ जवकले,

यावत्काळ पावेतों टिकले, श्रीमंत पाहून धनुवर छकले, छोटेखानी कैक दबकले, जे स्वमींचरणास लुबकले, ते तरले वरकड अंतरले,

जे मीपणांत गर्वें भरले, ते नानांनीं हातिं न धरलें, ते साहेबसेवेंत घसरले, मग त्यांचें पुण्योदय सरलें, न (?) जन्मले माते उदरीं,

घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली ब्रम्हपुरी । सवाई माधवराव सवार भाग्योदय ज्यांचे पदरीं, यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरा ॥१॥
श्रीमंताचें पुण्य सबळ कीं, न्यून पडेना पदार्थ एकहि, महान्न झाले भिन्न मनोदय खिन्न करुनी, शत्रूचीं शकलें मध्यें एक चिन्ह उद्बवलें,

नबाब झाला सिद्ध करु म्हणे, राज्य आपण पृथ्वीचें सारे, गलीमाचे मोडूनि पसारे, वकील धाडुनिया परभारे, हळुच लाविले सारे दोरे,

म्हणे युद्ध करा धरा हत्यारें, त्यामुळें वीरश्रीच्या मारे, शहर पुण्याच्या बाहेर डेरे, गारपिरावर दिधले डेरे, श्रीमंतांना जयजयकारें,

होळकरास धाडिलें बलाउन, छोटे मोठे समग्र येऊन, वडिलपणानें जय संपदा, पाटिल गेले ते विष्णुपदा, जबर त्यांची सबसे ज्यादा,

गादीवर दवलतराव शिंदा, बहुत शिपायांचा पोशिंदा, त्याच्या नांवें करुनि सनदा, लष्करि एकहि नाहिं अजुरदा, त्याचे पदरचे जिवबादादा,

सुद्धां आणविलें, परशरामभाऊ मिरजवाले, नागपुरांकडुन आले भोसले, बाबा फडके, आप्पा बळवंत, बजाबा बापू, शिलोरकर माधवराव रास्ते,

राजे बहादर, गोविंदराव पिंगळे, विठ्‌ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर, गोडबोले, राघोपंत जयवंत पानशे, मालोजी राजे, घोरपडे,

दाजीबा पाटणकर, अष्‍ट प्रधानांतील प्रतिनिधि फाकडे मानाजी मागुन आले, चक्रदेव नारोपंत भले दाभाडे, निंबाळकर हे उभेच ठेले,

रामराव दरेकर चमकले, वकील रामाजी पाटिल सुकले, मग याशिवाय चुकले मुकले । कोण पाह्यला गेले आपले ।

तमाम पागे पतके बेरोजगारी घेउनि कुतुके । अचाट फौजा मिळूनि आले, वळून गेले । जुळून संगम झाला, तीलक्षाचा एकच ठेला,

त्यामधिं नाना ते कुलकल्ला, होणारी शंकर नानाला, बंदुखानी तोफा गरनाळा, वाद्यें रणभेरी कर्णाला, गणित नाहीं शामकर्णाला,

मरणाला नच भीती घोडे, पुढें धकाउनि नानासहवर्तमान पुण्यांत आले, राउत तमाम दुनिया आली, पाह्याला, कन्हया माधवराव फुलाचा झेला,

पेशव्यांनीं कुच केला, सवेंचि मोंगल सावध झाला, याचा त्याचा पाण्यत्वरुनी तंटा झाला, तो तंटा त्यानिंच वाढविला, श्रीमंतांनीं करुनि हल्ला,

घ्या घ्या म्हणून कैक धुडाउन, दिले लुढाउन मोगल गोगलगाय करुनिया, पृथ्वी देईना ठाय, मोकली धाय करित हायहय,

तेव्हां लेंकरा विसरली माय, प्रतापी सवाई माधवराय, मोंगल त्राहे त्राहे करितील माय, करुनि सोडविला गनिमाचा वरपाय,

कैक दरपानें खालीं पाहे, किं सर्पासंनिध उंदिर जाय, असा मृदु मोंगल केला, शरण आला मग मरण कसें चिंतावें त्याला,

उभयतापक्षीं सल्ला झाला, पुढें मग महाल मुलुख कांहीं देतो घेतो श्रीमंताला, ते आपल्याला, कोण सांगतो आतां पुढें जे उडेल

मातु तेव्हां कळेल कीं अमके महाल, अमकी धातु अमकी पांतु, नबाबावर रहस्य राखुनि रंग मारला, पुढें ठेविली अस्ता, रस्ता

धरुनि पुण्याचा थाट दुरस्ता, नबाबावर कंबरबस्ता फिरुत आले वळून एक एक नानापरिच्या वस्ता, स्वतां दाणा पाणी

वाद्यांसहवर्तमान मश्रु मुलुख कैद करुनियां, श्रीमंतानीं कारागृहीं ठेविला, येथुनि पवाडा समाप्त झाला, सब्‌ शहरीं संगमनेरी

फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी, श्रीमंता दरबारी । सवाई माधवराव सवाई भाग्योदय ज्याचे पदरीं । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरी ॥२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel