एकंदर सर्व श्रीमंत भटब्राह्यणांचे घरीं, दररोज भिक्षा वाटतांना आवडनिवड करून ब्राह्यण भिकार्‍यांस तांदूळ व शूद्र, मुसलमान वगैरे भिकार्‍यांस चिमूटचिमूट जोंधळे दिले तर दिले, नाहीं तर, पुढे हो, म्हणून सांगतात. यावरून आर्य भटब्राह्यणांपेक्षां परदेशी टक्कर जज्जसाहेबांसारखे परधर्मी युरोपियन खासे म्लेंच्छ, लाख वाटयानें दयाळू म्हणावें कां नाहीं वरे ? कारण ज्यांनीं आपल्या स्वतःच्या कमाईतून ब्राह्यणांस, शूद्रांपैकीं कित्येक अनाथांचे मुलांस तुकडे घालून त्यांस इंग्रजी शिकविल्यामुळे हे आतां गोर्‍या कामगारांच्या पायावर पाय देऊन त्यांच्याबरोबर सरकारी हुद्यावर डुरक्या फोडीत आहेत. अहो, याचेच नांव समज ! नाहीं तर आर्य भटब्राह्यणांची कामापुरती एकी आणि काम सरल्यावर तूं तिकडे आणि मी इकडे. कारण " ये गे कोयी तुझी डोय़ी भाजून खाई आणि माझी डोय़ी ब्याला ठेवी " या जगप्रसिद्ध म्हणीप्रमाणें भटब्राह्यणांचें अघळपघळ कल्याण होणार आहे. परंतु आर्य विद्वज्जनांस, जर खरोखर या देशांतील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणें आहे, तर प्रथम त्यांनीं आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दुष्ट धर्मास जलसमाधी देऊन, त्या जुलमी धर्मानेम नीच केलेल्या शूद्रदि अतिशूद्र लोकांसमक्ष उघड रीतीने, आपल्या बेदांत मतासह-जातीभेदाचे उरावर थयथया नाचून कोणाशीं भेदभाव न ठेवितां, त्यांच्याशीं कृत्नीम करण्याचें सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वांची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाहीं. कदाचित्‌ आर्यभटांनीं आपल्या वडिलोपार्जित धूर्ताईनें शुद्रांतील शेंपन्नास अर्धकच्च्या विद्वानांस हातीं धरून या देशांतील एकंदर सर्व लोकांत कामापुरती एकी करून देशाची क्षणिक उन्नति केल्यास, ती त्यांची उन्नति फार दिवस रहाणार नाहीं. जसे भट ब्राह्यणांनीं , जर शूद्रांतील पोटबाबू यस, फेस करूं लागणार्‍या चोंबडया साडेसातीस सामील करून हे हिरव्या बागोंतील बंदछोड आंब्यांच्या कैर्‍या तोडून आढी लावितील, तर पुढें मोल्यावान होणार्‍या आंब्यासह वाळल्या गवताचा नाश करतील आणि तेणेंकरून एकंदर सर्व वाकबगार शेतकर्‍यांस खालीं माना घालाव्या लागतील, हें माझें भाकीत त्यांनीं आपल्या देवघरांत गोमुखींत घालून सांभाळून ठेवावें, असे माझें त्यांस निक्षून सांगणें आहे.
आतां मी गारशा थंडहवाशीर रमणीय सिमला पर्वतावर जाऊन कांहीं विश्रांति घेऊन आपल्या परम दयाळू गव्हरनसाहेबांसमक्ष आपल्या समुद्राचे पलीकडील सरकारच्या नावानें हाका मारून त्यांस शूद्र शेतकर्‍यांची सुधारणा करण्याविषयीं उपाय सुचवितोः--
आता आमच्या नीतिमान धार्मिक सरकारनें केवळ द्रव्यलोभ एकीकडे ठेऊन शेतकर्‍यांचें आचरणावर डोळा ठेवण्याकरितां डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणुका करून शेतकर्‍यांनीं आपल्या गैरशिस्त आचरणावरून प्रकृति बिघडल्यास व चोर्‍या, छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांस योग्य शिक्षा करण्याविषयीं चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिमान होणें नाहींत. शूद्र शेतकर्‍यांनीं एकीपेक्षां जास्त बायका करूं नयेत व यांनीं आपल्या मुलीमुलांची लग्ने लहानपणी करूं नयेत म्हणून कायदा केल्याविना संतती बळकट होणें नाहीं. सरकारी गोर्‍या कामगारांस एकंदर सर्व प्रकरणांत गैरमाहिती असल्यामुळें, भटब्राह्यणाच्या संख्याप्रमाणापेक्षां कामगारांच्या जास्ती नेमणुका नेमणुका होऊ लागल्यामुळें, यांच्यावर शेतीं खपून गावांत चिखलमातीचीं कामें करून, यांच्या स्त्नियांवर भर बाजारांत हेलपाटया करून पोटें भरण्याचा प्रसंग गुदरत नाहीं, शिवाय शेतकरी अज्ञानी असल्यामुळें भटब्राह्यणांस जातीभेदापासून अनंत फायदे होतात. यावरून ब्राह्यणांतील सरकारी कामगारासहित पुराणिक, कथाडे, शाळेंतील शिक्षक वगैरे ब्राह्यण जातीभेद मोडूं नये म्हणून आपला सर्व धूर्तपणा खर्ची घालून रात्नंदिवस. खटपट करीत आहेत. यास्तव शूद्र शेतकर्‍यांचीं मुलें सरकारी हुद्दे चालविण्यालायक होईतोपावेतों ब्राह्यणांस यांच्या जातीच्या संख्येच्या मानापेक्षां सरकारी हुद्याच्या जागा जास्ती देऊं नयेत व बाकी उरलेल्या सरकारी हुद्यांच्या जागा मुसलमान अथवा हिंदू ब्रिटन लोकांस देऊं लागल्याशिवाय ते ( ब्राह्यण ) शूद्र शेतकर्‍यांचे विद्येचे आड येण्याचें सोडणार नाहींत, हें त्यांचें कृत्निम एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं त्यांचांच भरणा असल्यामुळें, परदेशी गोर्‍या कामगारांच्या नजरेस येण्याचे मार्ग बंद जाहले आहेत. यामुळें, ब्राह्यणांची जात मात्न विद्वान व श्रीमान्‌ व शूद्र शेतकरी हे अन्नवस्त्नासही मोताद होऊन कधीं कधीं ब्राह्यणांचे अंकित होऊन यांच्या बंडांत सामील होऊन आपल्या जिवास मुकतात. शिवाय भटब्राह्यणांनीं आपल्या कृत्निमी धर्माची शूद्र शेतकर्‍यांवर इतकी छाप बसविली आहे कीं, ब्राह्यणांच्या सांगण्यावरून त्यांनीं केलेले खून अथवा गुन्हे इनसाफ होतेवेळीं ते ब्राह्यणास पुढें न करतां आपल्या माथ्यावर घेऊन त्याबद्दल शिक्षा भोगण्यामध्यें पुण्य मानितात. यामुळें पोलीस व न्यायखात्याचे श्रम वायां जातात. यास्तव शूद्र शेतकर्‍यांचे मुलांस विद्वान करण्याकरितां त्यांच्या जातींतील, स्वतः पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेंत शेतकर्‍यांनीं आपलीं मुलें पाठविण्याविषयीं कायदा करून, प्रथम कांही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरितां हलक्या इयत्ता करून त्यांस ब्राह्यणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच दाखवून त्यांच्या मुलीमुलांचा लग्नांत लग्नविधी करण्याविषयी परजातीने जूलूम करूं नये, म्हणून बंदोबस्त केल्याशिवाय शूद्र शेतकर्‍यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणें नाहीं. व पुढे शूद्र गांवकर्‍यांची मुले, जी मराठी सहावे इयत्तेसह नांगर, पाभर व कोळपी हाकण्याची परीक्षा देऊन सद्‌गुणी निवडतील, त्यांस मात्न पाटिलक्या द्याव्यात, म्हणून आमचे दयाळू सरकारनें कायदा केल्याबरोबर हजारों शेतकरी पाटिलक्या मिळविण्य़ाचे चुरशीनें आपली मुलें विद्वान करण्याकरतां मोठया आनंदानें शाळेंत पाठवितील व असे शिकलेले सद्‌गुणी गांवोगांव पाटील असल्यापासून, एकंदर सर्व खेडयांपाडयांतील धुर्त भटकुळकर्ण्याम्स अज्ञानी शेतकर्‍यांस आपआपासांत कज्जे करितां येणार नाहींत व तेणेंकरून शेतकर्‍यांसह आमचे सरकारचे मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोडयाच काळांत हल्लीपेक्षां शूद्र शेतकर्‍यांस जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन निरर्थक येथील पोलीस व न्यायखातीं फुगली आहेत, त्याचें मान सहज कमी करतां येईल. याशिवाय आमचे सरकारनें हिंदुस्थानांत सरकारी कामे करण्यालायक मुळींच भटब्राह्यण नाहींत, असें आपल्या मनांत समजून, जसजसे शूद्र शेतकरी सरकारी शाळेंत विद्वान तयार होत जातील, तसतशा त्यांस मामलेदार वगैरे सरकारी कचेंर्‍यांत लहानमोठया जागा देऊन, त्यांस तीं कामें करावयास शिकविल्याशिवाय शेतकर्‍यांचे पाय थारीं लागून सरकारचा वसूल वाढणेंच नाहीं. हल्ली आमच्या सरकारनें गुजरमारवाडयांच्या देवघेवीच्या दगलबाज्यांवर डोळा ठेविला आहे, त्यापेक्षां त्यांच्या दुकानांतील कुजक्या जिनसा व खोटया मापांसह दारूबाज पाटलावर चांगली नजर ठेविली पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel