एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.''

तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel