पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुर्‍या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुर्‍यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुर्‍यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुर्‍या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel