अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः॥४१॥

मग सारासार । राहे ना विचार । कळे ना साचार । योग्यायोग्य ॥३९०॥

कर्तव्याकर्तव्य । ओळखे ना कांहीं । ऐसी दशा होई । पापें येणें ॥३९१॥

मालवोनि दीप । चालतां अंधारीं । उजू मार्ग तरी । लागे ठेंच ॥३९२॥

कुलक्षयीं तैसा । आद्यधर्म सरे । एकलें चि उरे । पाप मात्र ॥३९३॥

मग तेथें मन । राहे ना स्वाधीन । दशेंद्रियगण । स्वैर वागे ॥३९४॥

हीन पुरुषाशीं । घडोनि संगति । तेणें बिघडती । कुलस्त्रिया ॥३९५॥

ऐसे वर्णावर्ण । जातां मिसळोन । लोपती संपूर्ण । ज्ञातिधर्म ॥३९६॥

चव्हाटयावरील । भक्षावया अन्न । कावळे धांवोन । येती जैसे ॥३९७॥

तैसीं महा - पापें । संचरती कुळीं । लोपे जिये वेळीं । कुल - धर्म ॥३९८॥

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्यषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥

तया कुलघ्नांच्या । सर्वें त्या कुळास । सर्वा घडे वास । नरकींच ॥३९९॥

वंशांतील प्रजा । पावे अधोगति । पूर्वज भ्रष्टती । स्वर्गातील ॥४००॥

लोपतां तीं कर्मे । नित्य नैमित्तिक । अर्पी तिळोदक । कोणा कोण ॥४०१॥

कोठोनि तयांसी । मग स्वर्ग - वास । सवें नरकास । ते हि जाती ॥४०२॥

जरी सर्पे केला । नखाग्रातें दंश । वेगें चढें विष । सर्वागातें ॥४०३॥

तैसे सत्यलोका - । पासोनि सत्वर । सर्व हि पितर । भ्रष्ट होती ॥४०४॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्व शाश्वताः ॥४३॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ‍ ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥४५॥

ऐकें देवा आतां । आणिक हि एक । भीषण पातक । घडे येथें ॥४०५॥

कीं ह्या कुलघ्नांची । घडतां संगति । तेणें लोकरीती । नाश पावे ॥४०६॥

गृहीं एकाएकीं । उफाळला अग्नि । टाकितो जाळोनि । आणिकांसी ॥४०७।
तैसा कुलघ्नांचा । जयां सहवास । तयांचा हि नाश । होय तेणें ॥४०८॥

नाना दोषें व्याप्त । होतां चि तें कुळ । दारुण केवळ । नरक भोगी ॥४०९॥

मग कल्पांती हि । सुटे ना त्यांतून । एवढें पतन । कुल - क्षयीं ॥४१०॥

नाना परी आम्हीं । आलों हें ऐकत । उपजे ना खंत । अजूनि हि ॥४११॥

सांगें देवा आतां । येथें कैसें मन । करावें कठिण । वज्राऐसें ॥४१२॥

जयालागीं राज्य - । सुख अपेक्षावें । तें तरी स्वभावें । नाशिवंत ॥४१३॥

देवा जाणतां हि । ऐसे महादोष । आम्हीं कां निःशेष । त्यजावे ना ॥४१४॥

येथें हे सकळ । आपुले वडील । वधाया केवळ । पाहिले जे ॥४१५॥

हें चि काय थोडें । घडलें पातक । आतां निरर्थक । जगावें कां ॥४१६॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्टा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ‍ ॥४६॥

होवोनि निःशस्त्र । सुखें ह्यांचे बाण । करावे सहन । हें चि बरें ॥४१७॥

ऐशा परी मृत्यु । आला तरी चांग । परी नको संग । पापाचा ह्या ॥४१८॥

मग बोले पार्थ । देखोनि स्व - कुळ । राज्य तें केवळ । नरक - भोग ॥४१९॥

संजय उवाच ---

एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ‍ ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ॥४७॥

इति श्रीमद्धगवद्धीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम

प्रथमोऽध्यायः ॥१॥

ऐकें राया रणीं । बोलिला जें पार्थ । तें चि तुज येथ । सांगितलें ॥४२०॥

मग तो अर्जुन । खिन्न झाला फार । आला गहिंवर । आवरे ना ॥४२१॥

रथांतूनि तेव्हां । उतरोनि खालीं । दुःखें अश्रु गाळी । ढळढळां ॥४२२॥

जैसा राजपुत्र । होतां पदच्युत । कोणी ना ठेवित । मान त्याचा ॥४२३॥

नातरी राहूनें । टाकितां ग्रासून । दिसे प्रभाहीन । भानु जैसा ॥४२४॥

किंवा सिद्धीलागीं । भुलोनि तापसी कामनेच्या फांसी । दीन होय ॥४२५॥

तैसा दुःखभारें । जाहला जर्जर । रणांगणीं वीर । धनंजय ॥४२६॥

मग धनुर्बाण । ठेवोनि परते । बैसोनियां तेथें । अश्रु ढाळी ॥४२७॥

ऐशा परी रणीं । घडलें जें काय । रायासी संजय । तें चि सांगे ॥४२८॥

खिन्न अर्जुनासी । आतां कृष्णनाथ । कैसा परमार्थ । निरुपील ॥४२९॥

ती च कथा पुढें । ऐका अभिनव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥४३०॥

इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग - ज्ञानेश्वरी प्रथमोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel