ना. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी लिहिलेल्या गोखले-चरित्रात एका ठिकाणी 'टिळकांना गोखल्यांचा मत्सर वाटत होता,' असे विधान आहे; हे विधान त्यांनी टिळकांच्या ह्यातीत केले होते. शिवाय त्यांचा व गोखल्यांचा निकट स्नेहसंबंध होता. या गोष्टी लक्षात ठेवूनच त्यांच्या विधानाचा साधकबाधक विचार करावयास पाहिजे. सदर विधानावर रा. आठल्ये यांनी आपल्या इंग्रजी टिळक- चरित्रात प्रतिकूल टीका लिहून मत्सराच्या आरोपातून टिळकांना दोषमुक्त केले आहे. त्याचाच अनुवाद रा. साने यांनी केला आहे. परंतु थोडया बारकाईने रा. आठल्ये यांच्या टीकेचा परामर्श घेतल्यास त्यांनी टिळकाच्या तरफदारीसाठी पत्करलेली तर्कपध्दती निर्दोष नसल्याचे दिसून येते. त्यांच्या टीकेचा भावार्थ असा की, १८८६-८७ सालात टिळकांनी गोखल्यांचा मत्सर करण्यासारखे गोखल्यांमध्ये काही विशेष गुण नव्हते. टिळकांनी रानडे- तेलंगांविषयी मत्सर बाळगला असता तर ते शोभणारे होते. गोखल्यांना तेव्हा शाळेत धड शिकविता देखील येत नव्हते; अशा व्यक्तीशी टिळकांची चुरस असणे संभवनीय नाही. ही विचारसरणी ब-याच चुकीच्या कल्पनांवर उभारली आहे. अगोदर गोखल्यांना या दिवसांत शिक्षकाचे काम नीट बजावता येत नव्हते, हीच कल्पना चुकीची आहे. त्यांनी मिळकत वाढविण्याकरिता न्यू इंग्लिश स्कुलात शिक्षकाची नोकरी असताना पब्लिक सर्व्हिसच्या परीक्षेचा वर्ग चालविला होता व त्या वर्गाच्या जोरावर त्यांना मनाजोगी किफायत होत असे, ही गोष्ट सर्वमान्य आहे. या गोष्टीमुळे त्यांनी अध्यापनकौशल्य किती जलद संपादन केले याचा अंदाज करणे अशक्य नाही. याबरोबरच टिळकांनी तेव्हाची स्थिती जमेस धरावी लागते. टिळकांची योग्यता तेव्हा सामान्य शिक्षकाहून जास्त नव्हती. सामान्य योग्यतेची माणसे एकमेकांचा मत्सर करतात हा सिध्दांत खरा असल्यास टिळकांनी गोखल्यांचा मत्सर करण्यासारखी परिस्थिती १८८६-८७ सालात होती, असे वरच्या वृत्तांतावरून दिसून येईल. टिळक मत्सर करीत होते का नव्हते हा या स्थळी वादाचा मुद्दा नाही. कोणताही पक्ष ठामपणाने स्वीकारताना दोन्ही बाजूंचे सूक्ष्म निरीक्षण का अशक्य हे समजण्याकरिता एवढे विवेचन केले आहे.

१८९५ साली पुण्यास काँग्रेसची बैठक भरली, त्यापूर्वी पुण्यास काँग्रेसचा मंडप सामाजिक सुधारणेच्या परिषदेला देण्यात यावा की न यावा या संबंधात सुधारणेच्या विरोधकांनी दंगल सुरू ठेवली होती. सुधारणेच्या शत्रुपक्षाचे प्रथम प्रच्छन्न व पुढे उघड धुरीणत्व टिळकांनी अंगिकारले होते. याविषयी मागल्या टिळक-चरित्रातून नानाविध समर्थन लोकांसमोर येऊन गेले आहे. रा. साने यांनीही त्या समर्थनाच्या धोरणाने आपला मजकूर लिहिला आहे. तसे करताना त्यांनी टिळकांइतकीच गोखल्यांची बाजू पाहावयास हवी होती. गोखल्यांची बाजू त्यावेळी सुधारक, ज्ञानप्रकाश आणि मुंबईची गुजराथी व इंदुप्रकास ही पत्रे यामध्ये प्रसिध्द होत असे. ती नजरेखाली घालून वरील धोरण रा. साने यांनी पत्करल्याचे प्रमाण त्यांच्या लिहिण्यात नाही. त्यामुळे गोखल्यांच्या बाबतीत तर अन्याय झाला आहेच, पण आश्चर्य हे की काही विधानांत, टिळकांनी जे म्हटले नाही, ते म्हटल्याचा आरोप केला आहे. सारांश, रा. साने यांना त्या प्रकरणाचा यथार्थ बोध होऊन त्यांनी टिळकांचे मंडन केले असा निष्कर्ष काढता येत नाही. १९१५ मध्ये गोखल्यांच्या मृत्यूपूर्वी सुमारे पंधरा दिवस जी खडाजंगी काँग्रेसच्या समेटाबाबत चालली होती तिची हकीगत देताना रा. साने यांनी अन्यायदर्शक वाक्ये लिहून टाकली आहेत. त्यांचा झोक टिळकांचा वाद सत्यास धरून होता असे दाखविणारा आहे गोखल्यांवर टीका करताना टिळकांनी जे कित्येक सिध्दांत केवळ अनुमानाच्या जोरावर खरे मानले, तेच रा. साने यांनीही खरे धरले आहेत. उदाहरणार्थ, श्री सुब्बाराव यांनी लिहून काढलेले टिळकांशी झालेल्या संवादाचे टिपण गोखल्यांनी पाहिले होते की नव्हते, हे एकच उदाहरण घ्या. आपणांस ते भूपेंद्रबाबूंना पत्र लिहिण्याच्या वेळी पाहावयास सापडले नव्हते, असे गोखल्यांनी स्पष्ट म्हटले होते. त्यांनी ते वाचले होते, असे छातीठोक सांगणारा विश्वसनीय साक्षीदार या वादात कोणीच पुढे आलेला नसल्याने गोखल्यांनी ते टिपण पाहिले होते का नव्हते याविषयी शक्याशक्यतेच्या आनुमानिक आधाराने शुष्क तर्क काढून गोखल्यांना दोष लावणे केव्हाही उचित ठरणार नाही. परंतु रा. साने यांनी असल्याच तर्कात शिरून गोखल्यांवर शिंतोडे उडविले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel