१८८२ चे अखेरीस गोपाळाची परीक्षा झाली आणि तो तीमध्ये यशस्वी झाला. कोल्हापुरास त्यावेळी बी.ए.चा वर्ग नव्हता म्हणून गोपाळ डेक्कन कॉलेजमध्ये शिकण्यास गेला. परंतु लवकरच खुद्द कोल्हापुरास हा वर्ग निघाल्यामुळे दुस-या टर्मला गोपाळ पुन: कोल्हापुरास आला. या वेळेस गोपाळच्या अभ्यासक्रमात विख्यात एडमंड बर्कचे जगप्रसिध्द 'फ्रेंच क्रांतीवरील विचार' हे पुस्तक नेमलेले होते. बर्कची गंभीर आणि भारदस्त विचारसरणी व तदनुरूप सुंदर भाषा या रमणीय योगाने हे पुस्तक लोकोत्तर झाले आहे. या पुस्तकावर 'पेन'ने टीकाही केली आहे. राजकीय तत्त्वज्ञानावरचे हे ग्रंथ गोपाळास नीट अभ्यासावे लागले हे फार चांगले झाले. ज्याचा पुढील जन्म राजकीय झगडयात जावयाचा होता  त्याला प्रथमत:च ही पुस्तके शिकावी लागली हा एक योगायोगच म्हणावयाचा. नेहमीच्या पध्दतीप्रमाणे गोपाळाने यातील उत्तमोत्तम उतारे पाठ केले, आणि आपल्या स्मृतिपटलावर कायमचे खोदून ठेविले. १८८३ मध्ये गोपाळ पहिली बी.ची परीक्षा पास झाला. दुस-या बी. ए.मध्ये तो ऐच्छिक विषय गणित घेणार होता, आणि त्यासाठी त्यास मुंबईस जाणे इष्ट वाटले. १८८४ च्या जानेवारीमध्ये तो मुंबईस दाखल झाला. या वर्षी त्याची शेवटची परीक्षा होती. हॅथॉर्न्वेट हे एक नामांकित शिक्षक होते. येथे धोंडोपंत कर्वे हे त्यांचे सहाध्यायी होते. गोपाळ हा हॅथॉर्न्वेट साहेबांचा एक आवडता शिष्य होता. येवढेच कळते. बी. ए.ची परीक्षा गोपाळराव दुस-या वर्गास पास झाले. त्यांस आनंद झाला. संकल्प केल्याप्रमाणे आतापर्यंतचा पल्ला निर्वेधपणे गाठला. यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्षांचे होते. अजूनही आपण शिकावे असे त्यांस वाटण्याचे दिवस होते व त्यांस तसे वाटतही होते. देशभक्तीचा उमाळा अद्याप आला नव्हता. व्यापक विचार हृदयाकाशात डोकावू लागले नव्हते. त्यांस क्वचित वाटे की, विलायतेस जावे व आय. सी. एस. होऊन यावे, कारण त्यांचे अद्याप शिकण्याचे वय होते. परंतुू या गोष्टीस पैशाची जोड अवश्य पाहिजे. एंजिनिअर झाले तर? का वकीलच व्हावे? असे अनेक विचार त्यांच्या मनात घोळत होते, पण निश्चय होत नव्हता. अखेर ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ लागले. परंतु इतक्यात पुण्यास ज्यूरिस्प्रूडन्सचा वर्ग उघडण्यात आला. तेव्हा कॉलेज सोडून देऊन ते या क्लासात जाऊ लागले आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी दरमहा ३५ रुपयांची नौकरी धरिली. याशिवाय त्यांचे दुसरे एक मित्र आणि ते दोघांनी मिळून पब्लिक सर्व्हिसचा एक क्लास काढिला. या क्लासामुळे त्यांस ३०-३५ रुपये प्राप्ति होत असे. स्वत:साठी पंधरा वीस रुपये खर्च करून बाकी उरलेले सर्व पैसे ते आपल्या भावाकडे पाठवीत. गोविंदरावांनी किती कष्ट करून आपली विद्या शेवटास नेली हे गोपाळराव जाणून असत. शिवाय वहिनीची प्रेमळ मूर्तिही त्यांच्या डोळयांसमोर उभी राहत असे. 'पुरे झाले तुझे शिकणे; आता कोठे तरी नौकरी करून संसारास मदत करू लाग' असे जर कधी गोविंदराव बोलले तर ती माउली म्हणावयाची, 'शिका हो भाऊजी तुम्ही: माझे किडुक मिडुक मोडून देईन, तुम्ही आपली शिकण्याची हौस पुरी करून घ्या.' आपल्या वहिनीला पुन्हा तिचे अलंकर मिळावे ही त्यांची इच्छा होती. या सदिच्छेने जेवढे म्हणून पैसे उरत तेवढे ते वहिनीला पाठवून देत.

गोपाळराव शाळेत इंग्रजी शिकवीत. पाचव्या इयत्तेला ग्रे कवीचे जगन्मान्य श्मशानगीत शिकविताना 'किती सुंदर विचार, किती गंभीर भाषा' असे उद्गार ते काढावयाचे. पाचव्या इयत्तेतील मुलांना ते समजत नसे. ते मनापासून शिकवीत परंतु मुलांना ते कठीण वाटे. ते घरीही इंग्रजीचा जोराने अभ्यास करीत. इंग्रजी भाषा आपलीशी करावी ही त्यांची महत्त्वाकांक्षा. कोठे उत्म विचार,उत्तम वाक्य दिसले की गोपाळरावांनी ते आत्मसात केलेच. वर्तमानपत्रांचाही त्यांस नाद लागला. त्यांतील इंग्लिश उतारे ते पाठ करीत आणि पुढे पुढे त्यांनी एकदा वाचले की, त्यांच्या लक्षात राही. टिळक- आगरकरांच्या सहवासाने ते केसरीत वर्तमानसार देत. पुढे १८८६-८७ साली मराठयाच्या अंकात ते लिहू लागले. त्यांचा स्वभावात:च इंग्रजीकडे ओढा असे. ते इंग्रजी उत्तम लिहीत. प्रथम प्रथम त्यात शब्दावडंबर असे. 'General war in Europe' ही त्यांची लेखमाला लोकप्रिय झाली होती असे सांगतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel