तसे नसेल तर हा उपदेश करण्यास तुम्ही नालायक आहा.' 'तुम्ही राजकारणाचा अभ्यास, मनन, निदिध्यास केला आहे का? जमाबंदीचा विचार केला आहे का? देशातील रेल्वे, पाटबंधारे, दुष्काळाची कामे यांची साग्र माहिती करून घेतली आहे का? जर असेल तर लिहा, तरच बोला' असेच रानडयांचे सांगणे असे. 'उचलली जीभ, लावली टाळयाला' म्हणजे केवळ 'मुखमस्तीति वक्तव्यम्' होय. तोंड आहे तर बडबडा. परंतु या बडबडीच्या पाठीमागे बुध्दी व विचार यांचा जोर नसेल तर ती बडबड म्हणजे बुडबुडा आहे- क्षणिक आहे. लोकांस, सुज्ञांस ते पटणार नाही व रुचणार नाही. याच्या उलट सर्व शस्त्रास्त्रांनी सिध्द होऊन तुम्ही लिहाल, बोलाल तर लोकांस आणि सरकारासही ते निमुटपणे ऐकले पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. लॉर्ड बीकन्सफील्ड म्हणत असे की, 'The only way to acquire mastery of public affairs is to study blue-books.' गोखल्यांस निरनिराळी- ग्रीनबुके, रेडबुके, ब्ल्यूबुके, सर्व सरकारी कामांचे रिपोर्ट, आजपर्यंतच्या सर्व कायद्यांची माहिती, मासिके, वृत्तपत्रे, सभांच्या - बैठकींच्या हकीगती सर्वांचे सार काढण्यात रानडे सांगत आणि गोपाळरावांनी ते लिहून आणले म्हणजे ते जर पसंत पडण्यासारखे असेल तर 'चालेल, बरे आहे' असे म्हणत, नाही तर 'ठेवा तेथे' असे म्हणत. ते फार स्तुति करावयाचे नाहीत, टीकाही करावयाचे नाहीत. मागून स्वत: त्यात ते योग्य तो फेरफार करीत किंवा कधी सर्वच निराळे लिहीत. 'राजनीतीचे परिशीलन खडतर तपश्चर्येप्रमाणे गोखल्यांनी रानडयांच्या सेवेत राहून केले. माधवरावांच्या बुध्दीचे सर्वांगीणत्व, व्यापकत्व, कुशाग्रत्व, गोखल्यांच्या बुध्दीत कदाचित नसेल; पण तिचे सर्वस्व एका प्रवाहात आणिल्यामुळे व तिला अल्प अल्प नाना शाखांत वळू न दिल्यामुळे तिचा लोट अनिवार होऊन तिने गोखल्यांस प्रथम प्रांतिक, मग अखिल भारतीय व अखेर ब्रिटिश साम्राज्यान्तर्गंत धुरीणाच्या पदास पोचविले आणि शिष्य गुरुपेक्षाही कांकणभर सरस ठरला. या दिव्य अशा भावी यशासाठी आज ते मन लावून आपल्या गुरूजवळ सर्व प्रश्नांचा अभ्यास करीत होते. टाकीचे घाव सोसल्याविना देवकळा येत नाही; एकदम शिखर गाठणे शक्य नसते: चढत गेले पाहिजे. आज परिश्रम केले, खस्ता खाल्ल्या तर त्याचा रमणीय परिपाक पुढे दिसेल; परंतु आज काहीच न केले तर पुढे काय मिळणार? रानडयांबरोबर ते आता सर्व देशाच्या भवितव्यतेबद्दल खल करू लागले. १८८५ साली प. वा. ह्यूम साहेब यांच्या पुरस्काराने राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. ह्यूमसाहेबांनी पाहिले की, देशात असंतोष माजत आहे. नवीन सुशिक्षितांमध्ये असमाधान आणि चालू परिस्थितीबद्दल त्वेष उसळत आहे. सरकारविषयी संताप आणि दिवसेंदिवस वाढते दारिद्य या दोहोंच्या दलदलीतून कोणकोणते रोग फैलावतील याचा अंदाज ह्यूम साहेबांनी केला आणि वेळीच सावध होऊन भावी रोगांच्या चिन्हावर आजच आपण उपाय शोधू या, असे देशाची नाडीपरीक्षा करणा-या अन्य भिषग्वर्यांना त्यांनी कळकळीने सांगितले. नवीन तरुणांपुढे देशास सुस्थिती जेणेकरून प्राप्त होईल असा मार्ग आपण ठेवू या असे या उदार मनाच्या पुरुषाचे मत पडले. 'वसुधैव कुटुंबकम' असे महात्मे प्रत्येक देशात असतात. त्यांतलेच ह्यूम, बेडरबर्न वगैरे महात्मे होत. देशातील सुशिक्षितांचे लक्ष एका विवक्षित प्रश्नावर खिळविण्याचे श्रेय यांनाच आहे. हतबल राष्ट्राला हाताशी धरून ते आपलेच आहे असे समजून, त्याच्यासाठी खटपट करणे यास किती थोर मन लागेल बरे? ह्यूमसाहेबांनी प्रथम १८८३ च्या मार्चच्या पहिल्या तारखेस कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांस उद्देशून एक जाहीर पत्रक काढले होते. बंगाली तरुणांना  कर्तव्याची जाणीव करून देणारा तो जळजळीत उपदेश होता. संघटना करा, यत्न करा, ही सूत्रे त्यात ग्रथित केली होती. हा उपदेश, हे आव्हान, स्फूर्तिदायक आहे. पुढे या, मागे जाऊ नका असे त्यात मुक्तकंठाने सांगितले आहे. तो उपदेश खालीलप्रमाणे आहे :
''If you the picked men, the most highly educated of the nation cannot, Scorning personal case and selfish objects, make a resolute struggle to secure greater freedom for yourselves and your country,a more impartial administration, a larger share in the administration of your own affairs,then we your friends are wrong and your adversaries right, then are Lord Ripon's noble aspiration for your good fruitless and visionary, than at present at any rate, all hopes of progress are at an end, and India truly Neither lacks nor deserve any better government than what she enjoys at present. ''

परंतु हा जाहीरनामा बंगालपुरता होता. विवक्षित प्रांतास आता प्रयत्न करावयास सांगण्याऐवजी सार्वराष्ट्रीय प्रयत्न व्हावा  असे ह्यूम यांस वाटू लागले आणि शेवटी १८८५ ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली. रानडे सरकार नोकर असल्यामुळे त्यांस प्रत्यक्ष कार्यात भाग घेता येत नसे. परंतु ते सर्व बैठकींस विषयनियामक मंडळीत नेहमी जातीने हजर असत, आणि जेथे त्यांस काही चुकत आहे असे वाटे तेथे ते सांगत असत. आपला सल्ला ते वारंवार देत, आणि त्यांच्या कोल व गंभीर उपदेशाचा पुष्कळ फायदा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel