पुष्कळ लोक टिळक क्षुल्लक गोष्टीसाठी भांडले असा त्यांच्यावर आरोप करितात. सामाजिक परिषदेसाठी निराळी तयारी करावयाची म्हणजे पुन: आला नवीन खर्च; काँग्रेसचा मंडप मिळाला तर त्यातल्या त्यात भागून गेले असते. असाही या लोकांचा एक मुद्दा असतो. परंतु जनमतापेक्षा पैशाची जास्त मातब्बरी नाही. आणि ज्यांस सामाजिक सभा भरवावयाची होती त्यांस जर फार उमाळा होता तर त्यांनी निराळी वर्गणी दिली पाहिजे होती. स्वार्थत्यागाशिवाय मत मात्र मिरवावयास पाहिजे हे कसे चालेल? बहुजन समाजास बरोबर घेऊन जाणे हे राष्ट्रीय सभेचे काम. ती राष्ट्रीय आहे, विवक्षित पंथाची नाही. सर्व लोकांस ज्यांची दरक्षणी जरूर भासते अशा हक्कांसाठी राष्ट्रीय सभा आहे. हजारो वर्षे चालत आलेल्या धर्माचा विचार करणे हे लोकांस कसेसेच वाटते. 'आपल्या पायाखाली काही जळत आहे' असे लोकांस खरोखरच वाटत नसे. वाटत असते तर त्यांनी विझविण्याचा प्रयत्न केलाच असता. आपल्या डोक्यावर जे आज सरकारचे छत्र आहे त्याने मात्र छाया होत नसून डोक्यावर आगच पाखडली जात आहे हे या जुन्या लोकांसही पटले होते आणि प्रत्यक्ष अनुभवास आले होते. या लोकांस राष्ट्रीय सभेतच फक्त यावयाचे होते. त्यास वगळून कसे चालणार? ही विचारसरणी रास्त आहे; न्याय्य आहे. सामाजिक सुधारणेचे स्तोम माजविणा-यांस ती दिसणार नाही व दाखविली तरी पटणार नाही हे आम्ही जाणून आहो. टाइम्समध्ये ३ नोव्हेंबर १८९५ रोजी एक पत्र प्रसिध्द झाले होते. हा पत्रलेखक वरील मताचा अनुवाद करितो. तो म्हणतो- “The Congress eventually aims at being a congress of the people and the object cannot be achieved unless every year an effort is made to approach more and more the classes that have not taken hitherto much interest in the movement.  One party wishes to draw to the Congress as large a portion of the public as it possible can irrespective of the question of social  reform; the other does not wish to go much beyond the circle of the friends of reform.” सुधारणावादी लोकांस जनतेस बरोबर घेऊन जावयास नको होते. ते अलग वागत. डेमॉक्रसीचे महत्त्व त्यांस तात्त्वि दृष्टया कळे परंतु ते त्यांस व्यवहारात (पटत नसे) आणता येत नसे. टिळक हे नेहमी लोकांस बरोबर घेऊन जावयाचे. बरोबर नेताना त्यांस शिकवावयाचे व शिकवीत शिकवीत बरोबर न्यावयाचे. यास सवंग लोकप्रियता असे उपहासास्पद नाव कित्येकांनी दिले असले तरी ते वस्तुत: भूषणच आहे. ही गोष्ट २० डिसेंबर रोजी- काँग्रेसच्या आधी ५-६ दिवस - काँग्रेससाठी शहरातर्फे प्रतिनिधी निवडावयासाठी भरलेल्या सभेत दिसून आली. सभेस जागा अगदी लहान योजून आयत्या वेळी सभा जाहीर केली, परंतु ही युक्ती सफळ झाली नाही. तेथे जुन्या मताचे लोकांचा सर्व समाज लोटला व त्यांनी स्वत:स पसंत असा अध्यक्ष निवडला.  हे सर्व पाहून  गोखले व इतर १५ इसम सभा सोडून चालते झाले; हा थोडा कमकुवतपणाच होता. टिळकांवर जो लोकच्छंदानुवतर्त्विाचा आरोप करण्यात येतो, तसाच आरोप प्रख्यात पंडित हक्सले. हा, विख्यात इंग्लिश राजकार्यधुरंधर जो ग्लॅडस्टन, त्याच्यावर करीत असे. तो म्हणे, He is a man with the greatest intellect in Europe and yet he debases it by simply following majorities and the crowd.” परंतु हे लक्षात ठेवणे जरूर आहे की, टिळक, ग्लॅडस्टन यांसारखे पुढारी लोक केवळ जनतेच्या मताप्रमाणे चालत नसतात. ते त्यास शिकवीत तर असतातच परंतु हळूहळू त्यांच्या मनांत भरवीत, त्यांच्याशी मिळते घेऊन, मिळते घेतानाही आपला उद्देश सिध्दीस जातो आहे हे पाहून हे लोक पाऊल टाकतात; फटिंगपणे वागणे म्हणजे लोकप्रिय होणे नव्हे.

या वर्षीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक सभा रानडे पक्षाला सोडावी लागली ही होय. १८८९ पासून सार्वजनिक सभेत रानडयांचे म्हणणे म्हणजे वेदवाक्य असे समजले जात असे. १८९५ साली टिळक हे बहुमताने सार्वजनिक सभेचे पुढारी झाले. या गोष्टीने जुन्या रानडे पक्षाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. गोखले हे नव्या-जुन्यांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु तो दिलजमाईचा प्रयत्न नसून नवीन पक्षाचा अपमान करण्याचाच पर्याय होता. त्यांनी टिळकांना अशा तऱ्हेच्या अटी सांगितल्या की, त्या बहुमतवाल्यांस पसंत पडल्या ना. गोखल्यांस आपण अल्पसंख्यांक आहो हे या वेळी माहीत होते. असे असूनही त्यांनी खालील अटी घालाव्या ही गोष्ट अनुचित वाटते. त्या अटी अशा - (१) सभेच्या कार्यकारी मंडळीत दोन्ही पक्षांचे सभासद असावे. (२) अध्यक्ष आहे तोच म्हणजे जुन्या पक्षाचाच असावा. (३) दोन सेक्रेटरींच्या ठिकाणी या वर्षांपासून तीन असावे, आणि त्यांतील दोन जुन्या पक्षाचे आणि एक नवीन पक्षाचा असावा. टिळकांचे महत्त्व दृष्टीआड व्हावे एतदर्थ हा प्रयत्न होता. हा प्रयत्न अर्थातच निष्फळ झाला. आता टिळकांचे मताधिक्य होणार हे पाहून त्यांच्याजवळ काम करावे लागणार या भीतीने रानडे पक्षाचे लोक  सभा सोडून जाण्यास तयार झाले! आणि टिळकांस आयत्या बिळावर नागोबा असे म्हणू लागले! परंतु आजपर्यंत सार्वजनिक सभेत आपले मताधिक्य नव्हते म्हणून टिळक दुस-या सभा काढण्याच्या भरीस पडले नाहीत. पार्लमेंटमध्ये आपले मताधिक्य होत नाही म्हणून कोणी नवीन पार्लमेंट स्थापीत नाही, आणि नवीन येणा-या मंत्रिमंडळास कोणी आयत्या पिठावर रेघा ओढणारे असे अपमानास्पद दूषणही देत नाही. टिळकांस मिळते घ्यावयास नको असे म्हणणारे व हा कांगावा करणारे जे नेमस्तपक्षीय लोक त्यांसच खरोखर माघार घेणे, आपली मते बहुमतापुढे मागे घेणे, कधी माहीत नव्हते. नबाबशाही त्यांस पाहिजे असे. ती दुसरी नोकरशाहीच होती; लोकशाही नव्हती, ही गोष्ट काँग्रेसच्या वेळी सिध्द झाली आणि या वेळेसही सिध्द झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel