दुसरा एक दोषारोप टिळकांवर करण्यात येतो तो हा की, ते नवीन कल्पनांचे प्रवर्तक नव्हते. दुस-यांच्या कल्पना घेऊन मग त्यांवर ते आपली तहान भागवीत. होमरूलची चळवळ बेझंट बाईंनी सुरू केली; स्वदेशी, बहिष्कार  या चळवळी बंगाल्यात निघाल्या; परंतु त्या चळवळी सर्व देशभर कोणी पसरविल्या? टिळकांनी. केवळ कल्पना काढणारा मनुष्य आणि ती कल्पना आपलीशी करून ती सर्वांच्या हृदयात ओतणे, त्या कल्पनेचा लोकांस ध्यास लावणे , ही करामत करून दाखविणारा पुरुष यात महत्त्वाच्या व तादृश फायद्याच्या दृष्टीने दुस-याचेच गौरव केले पाहिजे. एकादी गोष्ट टिळकांनी उचलली की तिचा चारी दिशांत दुमदुमाट व्हावयाचाच. तिच्यासाठी ते पैशाकडे, प्रकृतीकडे पाहावयाचे नाहीत, की कोणाशी झगडावयास डगमगावयाचे नाहीत. पिकेटिंग घेतले तरी त्यात सुध्दा त्यांनी एक प्रकारचे तेज आणले. तेव्हा टिळक केवळ कल्पनाप्रसू नसले तरी त्या कल्पनांस बाळसे आणून ते त्या वाढीस लावीत. 'स्वराज्य' हा दादाभाईंनी उच्चारलेला शब्द प्रत्येकाच्या जिव्हाग्री टिळकांनीच नाचावयास लावला. हा जो त्यांनी स्वराज्याचा विचार सर्वत्र फैलावला त्याचेच सर्वांत महत्त्व आहे. नवीन विचारांच्या साम्राज्यालाच सरकार जास्त भिते. रसेल हा तत्त्वज्ञ म्हणतो - 'Men fear thought as they fear nothing else on earth-more than ruin, more even than death.' नवीन विचारांची लोकांस प्रथम फार भीती वाटते. स्वराज्य हा शब्द उच्चारावयास आपण पूर्वी भीत होतो, लोकांची ही भीती टिळकांनी घालविली. परंतु जो जो लोकांची भीती नाहीशी होईल तो तो सरकारची वाढत जाईल. त्याला या नवीन कल्पना आत्महानिकारकच वाटतात. नवीन विचारांचे साम्राज्य सर्वत्र करण्यात टिळकांनी अत्यंत धडाडी दाखविली यात शंका नाही. गोडीगुलाबीचे काम टिळकांस व्हावयाचे नाही. यामुळे ते साम्राज्याचे मुत्सद्दी झाले नसते. शांततेच्या काळात गोखले होममेंबर झाले असते; परंतु टिळक आपल्या तत्त्वज्ञानाच्या किंवा गणिताच्या प्रश्नातच गढून गेले असते. आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ आपल्या देशासाठी लढला; परंतु लढाई संपल्यावर समुद्रकिनारी भूमितीचे सिध्दांत सोडवीत बसला. 'टिळकांनी गेल्या शतकात राज्य कमाविले असते' असे गोखले म्हणत त्याचप्रमाणे आम्ही म्हणतो, टिळक हे शंकराचार्यांच्या वेळेस जन्मते तर जगद्विख्यात आचार्य झाले असते. कोणत्याही शतकात ते चमकलेच असते. कारण त्यांची बुध्दिमत्ता सर्वंकष होती. हिंदुधर्माचा अभिमानी, तत्त्वज्ञानात रंगलेला कर्मयोगी, संकटांस न डगमगणारा अतुल पराक्रमी वीर, लोकांस सर्व लोकांस- केवळ सुशिक्षितांसच नव्हे- बरोबर घेऊन त्यांस राजकारणातील मर्मे समजावून देत देत पुढे मोहीम करणारा हा सेनानायक, स्वार्थत्यागात पहिला, खासगी आचरणात धुतल्या तांदळासारखा हा पुरुष लोकांच्या गळ्यांतील ताईत झाला तर त्याबद्दल 'ते केवळ लोकच्छंदानुवर्ती' म्हणून असे झाले, असे म्हणणे आमच्या जिवावर येते. 'लोकांस कवाईत येईपर्यंत क्लाइव्ह थांबता तर अर्काटचा वेढा इतिहासात लिहिलाच गेला नसता. दरमजल कूच करीत करीत तो त्यांस वाटेत कवाईत शिकवीत होता. आणि आपल्या अगाध धैर्याने त्याने त्यांच्यात वीरवृत्ती व मरणाची बेपर्वाई निर्माण केली. तसेच टिळकांनी केले. ते लोकांची सर्वत: सुधारणा होण्याची वाट पाहत बसले नाहीत. मजबरोबर चला, वाटेत तत्त्वज्ञान, राजकारण सर्व मी तुम्हांस सांगतो असे ते म्हणावयाचे.

गोखले मनमिळाऊ म्हणूनच त्यांस साम्राज्यातील मुत्सद्दी होता आले. आपल्या म्हणण्याचा दुस-याने विचार केलाच पाहिजे, अशा त-हेने ते बोलत. राजकारणकला त्यांना पूर्ण अवगत होती. कलेमध्ये कोणते घ्यावयाचे यापेक्षा कोणते वगळावयाचे हे समजण्यास जास्त कौशल्य लागते. (An artist is known by what he omits). एकाद्याचे सुंदर चित्र काढावयाचे असल्यास त्याच्यातील कोणता भाग गाळून कोणता उठावदार दाखवावा, यातच चित्रकाराचे कौशल्य असते. गोखल्यांविषयी 'He was a political artist in the best and highest sense of the term ' असे जे म्हणतात ते अगदी खरे आहे. दक्षिण आफ्रिकेत असता हा गुण त्यांनी उत्तमपणे दाखविला. आपल्या राष्ट्राचा पंगूपणा दाखविण्याऐवजी परक्यापुढे ते हिंदुस्थानातील जागृती, नवीन राष्ट्रीय भावना, वगैरेचा उच्चार करून त्यास नवीन गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करीत. याप्रमाणेच ते योग्य संधी फुकट दवडीत नसत. त्यास सर्वांनी 'Opportunist' हे विशेषण लाविले आहे. जेवढे मिळेल तेवढे घ्यावयाचे हा त्यांचा बाणा असे. जरी १९०९ च्या सुधारणा अगदी अपु-या होत्या, तरी ते म्हणत होते :- ''Just now it is the duty of all to make the best of what they have got. There is no alternative to British Rule.'' ब्रिटिश सत्तेशिवाय गत्यंतर नसल्यामुळे जी जी परिस्थिती येईल तिचा चांगला उपयोग करून घ्यावयाचा हा त्यांचा बाणा असे. त्यांच्या या गुणामुळे पुष्कळ जण त्यांच्यावर सरकारची हांजी हांजी करण्याचाही आरोप करतील. परंतु मोर्ले साहेबांनी वॉलपोल याच्या चरित्रात म्हटल्याप्रमाणे ''It is not always safe to suppose the lowest motives to be the truest, even in politics.'' गोखल्यांचा नेहमी देशहिताशिवाय अन्य कोणताही उद्देश नव्हता. गोखले हे सरकारचीही जबाबदारी ओळखावयाचे. यामुळे सरकारी अधिकारीही त्यांच्यावर रोष करीत नसत. जरी त्यांच्याही पाठीमागे गुप्त पोलीस असले आणि नं. ६२ म्हणून त्यांची गाडी सुटल्यावर तारा होत, तरी एकंदरीत सरकारचा ग्रह त्यांच्याविषयी चांगला होता. यामुळे पुष्कळ लोक त्यांस सरकारचे हस्तक म्हणण्यासही कचरत नसत. परंतु असे थोडे अविचारी सोडून दिले म्हणजे गोखले हे एक थोर निरपेक्ष राजकारणी होते, राष्ट्राचे वकील होते हे कबूल केले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel