या गुणामुळे टिळक हे सर्वसाधारण जनतेचे नेते झाले. आपणांस देशाच्या या उच्च दर्जाच्या पुढा-यांमध्ये खालीवर असे क्रम लावण्याची जरुरी नाही. दोघेही आपआपल्या परीने श्रेष्ठ आहेत; पूज्यतम आहेत, इटलीचे उध्दारक व ललामभूत झालेले गॅरिबाल्डी, मॅझिनी, काव्हूर या त्रिवर्गास उद्देशून एका ग्रंथकाराने जे उद्गार काढले आहेत ते उद्गार येथेही लागू पडतील. ते असे- 'Possessed of widely diverse gifts, dissimilar in tem[er and generally opposed in policy, but equal in abenegation of all selfish aims, equal in devotion to a noble cause, equal will have his proper niche in the temple of Italian unity : for each contributed most precious and invaluable gifts to the building of that imperishable fame.'

सामाजिक व धार्मिक मते

सामाजिक बाबतीत गोखले रानड्यांचे व आगरकरांचे अनुयायी होते, आगरकरांच्या सुधारकात ते इंग्रजी मजकूर लिहीत असत. जातिभेद नसावा. पुनर्विवाह व्हावे, अस्फृश्यता नाहीशी करावी असे त्यांचे म्हणणे असे. भारतसेवक समाजीतील सभासदाने 'मी अस्पृश्यता नाहीशी करीन, पंथ व जात मानणार नाही', अशी घ्यावी लागते. हा भारतसेवक समाज राजकीय कार्याकरिता तर आहेच. कारण त्यायोगे परंपरा राखली जाते. परंतु सामाजिक बाबतीतच सामाज जास्त कार्य करतो. दुष्काळपीडितांस मदत करणे, रोगाच्या साथी आल्या तर स्वयंसेवक-पथके उभारणे, आरोग्याची व्यवस्था करण्यास झटणे, शिक्षण व धंदेशिक्षण या बाबी समाजाच्या कार्यक्षेत्रात येतात. गोखल्यांस स्वत: या बाबतीत काम करावयास फावले नाही, परंतु त्यांच्या अनुयायांनी या गोष्टी केल्या पाहिजेत व ते करीतही आहेत.

स्त्रियांस शिक्षण देण्यासाठी त्यांची अनुकूलता होती. स्त्रियांनी राजकारणातही पडावे असे त्यांचे मत असावे, असे त्यांनी सरोजिनीबाईस जे सांगितले त्यावरून दिसते.

समाजातील तंटेबखेडे नाहीसे व्हावे म्हणून मुसलमानबंधू व हिंदू यात एकोपा पाहिजे. सय्यद अहंमद, मीरअल्ली यांसारख्या संकुचित दृष्टीच्या पुढा-यांच्या उपदेशामुळे मुसलमान सरकारच्या तोंडाकडे पाहात आणि हिंदूकडे क्षुद्र बुध्दीने व वाकड्या नजरेने पाहात. हा दृष्टिकोन बदलण्याचे काम गोखल्यांनी १९०७ च्या दो-यात बरेच केले. पुढे ना. आगाखान यांनी मॉस्लेम लीग स्थापली. ते व गोखले मित्र होते. यामुळे आगाखान, सरोजिनी, गोखले वगैरेंनी ऐक्य होण्यासएकमेकांस सवलती देऊ करून योग्य ती परिस्थिती उत्पन्न केली. गोखल्यांच्या मृत्युसमयी दु:खप्रदर्शन करणा-या एका सभेत ना. आगाखान म्हणाले, 'हिंदुस्तानला एकराष्ट्रीयत्व येणे शक्य नाही असे कित्येक म्हणतात; पण ना. गोखले हे एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचे मृर्तस्वरूप होते व त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने देशकार्य करीत राहणे हेच त्यांचे उत्कृष्ट स्मारक होय.' मॉर्डन रिव्ह्यू मृत्युलेखात म्हणतो:- `India is a land of particularisms. Mr. Gokhale was one of the few Indians who rose entirely and altogether above them' गोखल्यांस हिंदु-मुसलमानांच्या ऐक्यासाठी किती कळवळ वाटे, आणि त्यांचे मन त्याकरिता कसे तिळतिळ तुटे हे मागे दिलेच आहे. टिळकांनी शिवाजी- उत्सव व श्रीगजाननोत्सव सुरू करून हिंदु-मुसलमानांत वितुष्ट आणले असे कित्येक म्हणातात, त्यासंबंधी विवेचन आम्ही मागे केलेच आहे. जर हे दोन्ही समाज तुल्यबळ झाले तर भांडणे होणार नाहीत, असे टिळकांचे म्हणणे असे व ते अक्षरश: आणि तत्त्वत: ही खरे आहे. अस्पृश्यतेचाही व्यवहारात अंमल नाहीसा करावयास ते तयारच होते. मात्र केवळ भोजनपान एकत्र करणं म्हणजे अस्पृश्यता दूर करणे नव्हे असे त्यांचे मत होते. भोजनपानाचे दुलरे पुष्कळ अज्ञात असे परिणाम होत असतात. 'आहारशुध्द:' असे तत्त्व आहे. परंतु कार्य करताना मात्र अस्पृश्यता आड येऊ देता कामा नये. गणपत्युत्सवात अस्पृश्यांचाही गजानन यावा. त्यांनीही मेळे काढावे; मिरवणुकीत, उत्सवात भाग घ्यावा, यास टिळकांची संमती असे. फक्त कायदे करून ही सामाजिक शिथिलता दूर करणे त्यांस नको होते. राजकीय बाबतीत सरकारच्या जड शृंखलांनी बध्द आहो तेवढे पुरे; परंतु सामाजिक बाबतीत तरी सरकारचा  हात नको, सरकारच्या कायद्यांनी निगडित होणे नको. ती कामे लोकांनीच समंजसपणे केली पाहिजेत, असे टिळक म्हणत व आम्हांसही तेच इष्ट वाटते. जो देशभक्त आहे, तो राजकीय, सामाजिक सर्व सुधारणेस अनुकूल असणारच. आगाखान म्हणतात- `To be an Indian patriot and not to be a social reformer is a contradiction in terms.'  रानडेही असेच म्हणत, आणि ते यथार्थच आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel