मोहना वस्तीत येताच गुलबानं जिव तोडून हलगीला ' ढण ढण, ढणढा ढण ढण!ढण ढण, ढणढा ढणढण!' या चालीवर तुडवली. तो ही जाणून होता की जाणाऱ्या जिवांचे या जिवाखेरीज जीव तोडून रडणारं आता दुसरं कुणीच येणार नाही.मोहनाला पाहताच घरात धर्मू व जसोदाच्या कुडीजवळ बसलेल्या गज्जनराव व त्यांची पत्नी राधाक्का यांनी एकच गलका केला.कारण मोहनाचा उरफोड हंबरच तसा होता. मोहनाच्या लहान्या मुलीस वस्ती येताच मथानं आपल्याकडं घेतलं होतं ,त्या नातीसोबत ती पण बाजुला बसली.

संपतरावही धुळ्याहून दोन वाजेपर्यंत तिकडनंच फूल टू होऊन आले.

गलका ऐकून आता उचलतीलच म्हणून वस्तीतली लोकं एकेक करत येऊ लागले. ढोलू येताच संपतरावा जवळ जात सलगी करू लागला.

सकाळी दहाला सुरू झालेला पाऊस न थांबता पडतच होता.म्हणून तशाच पडत्या पावसात बाहेर काढत स्नान घालत आरती झाली.मोहना तर कधी आईला तर कधी बाबास बिलगत आकांत करतच होती. सरपंचानं आधीच माणसं पाठवत सुकी फुलं,(लाकडं) राॅकेल, मीठ, टायर नदीकाठी पाठवले होते.कारण पावसाळा व दोन प्रेतं म्हणून कमी पडायला नको.

संपतरावास मध्यंतरी ढोलूनं अड्डयावरून राऊंड मारून आणलं.मग संपतराव येताच गुलब्याला खिशातून नोटा काढून जोरजोरात हलगी बडवायला लावू लागले." हे हलगीवाल्या माझा सासरा गेलाय, सासू गेलीय, जोरात वाज.कसं धूममध्ये पाठवतो त्यांना हा त्यांचा जावई! साऱ्यांनी नाव काढलं पाहिजे!"

लोकं कोपऱ्यात खुसुरफुसुर करत तोंड लपवत हसू लागली.

होणारा तमाशा पाहून गाजरे गुरुजी उठले व संपतरावास समजावत खाली बसवू लागले.

" मला मना करणारे तुम्ही कोण? मी नाचणार! माझे सासु सासरे गेलेत,मला दु:ख झालंय.म्हणून मी नाचनारच! हे हलगीवाल्या, बजाव!" म्हणत संपतराव तोल सांभाळत ताल धरू लागले.

सरपंच गज्जनला बाजुला बोलवत " पाणी कोण देणार म्हणून विचारू लागले.पण कुणीच पुढे येईना.धर्मूचं जवळचं भाऊ बंदकीचं कुणीच नव्हतं.

जावई तर फूल टू! गज्जनराव रडतच गरजला " माझ्या धर्मूस मीच पाणी देतो!"

गज्जननं रूमाल पांघरत मडकं उचललं.गुलब्यानं हलगीची घाई वाढवली. मोहना व मोहन खांदेकरी झाले नी धर्मू व जसोदा अंतिम यात्रेस निघाले. मोहना झिट्या तोडत आक्रोस करू लागली.

गज्जननं बोंब ठोकत मागे न पाहता पाणी देत मडकं सोडलं नी चिता धडाडल्या.सारे परतले. संपतरावास ढोलूनं परस्पर त्याच्याच घरी नेलं. व लगेच मथा बाईंनाही बोलवून आणलं.लहान्या मुलीस मांडीवर घेत मोहना सुन्या घरात आक्रोश करू लागली. गाजरे गुरूजी, तुळतुळीत टक्कल केलेला गज्जन काका , राधाक्का तिला धीर देऊ लागले.मोहन एक कोपरा पकडत शून्यात पाहत बसला.

रात्रभर संपतराव, मथा ढोलूकडेच राहिली इकडं ढुंकायला ही आली नाहीत.गज्जन, मोहन, राधाक्का मोहनाजवळच बसत रात्र घालवू लागले.सकाळीच संपतराव व मथा दसव्याला येतो म्हणून सांगत निघून गेली.पण पण सासु- सासऱ्याच्या बोळवणीचा खर्च वा पुढे कार्यास लागणारा खर्चाचं काय?कोण करतंय? लागतील का? एका शब्दानंही बोलले नाहीत वा साधा धीर ही दिला नाही.

दहा दिवस गज्जन व राधाक्कानीच सारं पाहिलं.खर्चाचा सारा भार मोहननंच उचलला. दसवं झालं .दसव्यास गज्जनसोबत मोहन गुरुजीनं ही आपले बाल देत गोटा केला.ते पाहून मोहनास अधिकच भडभडून आलं.मुक्कामास आलेल्या संपतराव रात्री ढोलूकडं दारू ढोसत कोंबडं खात, दसवं करून निघाले.जातांना 'तेरावं करून लगेच टवकीस लवकर परत ये' असं मोहनास सांगण्यास ते विसरले नाहीत.

तेराव्याचे पितर घातले. गज्जनरावास संपतरावाजवळ ढोलू ओळख नसतांना का सलगी करत होता याचं कोडं मात्र उलगडेना .त्यानं मोहनासही ढोलू व संपतरावाची ओळख कशी याबाबत विचारलं .पण तिला फक्त ढोलूचं कुणी नात्यातलं संपतरावाचा मित्र एवढंच माहित असल्याचं तिनं सांगितलं.

मोहना परतण्या आधी मोहनला शाळेत भेटली.गज्जनरावही सोबत होते व ते तिच्या मुलीस धरत पटांगणात फिरत होते.पावसाला उघडीप असल्यानं घडीचा चंद्र नुकताच निघत होता. ढगांच्या लपंडावात त्याचंही तेज लोप पावल्यासारखंच वाटत होतं. आवारातल्या मोहननं लावलेल्या वेलीवरची फुलं गंधाळली असुनही वातावरणात प्रसन्नता जाणवत नव्हती.

व्हराड्यावरील खांब्यास पाट लावत मोहननं खाली पाय सोडलेले होते. मोहना जवळच बसलेली.

" मोहन!"

आकाशातल्या चांदण्या एरवी या एकाच शब्दानं उमलायला हव्या होत्या.पण त्या खिन्न उदास रडत असल्याचा भास होत होता.

" मोहन कसा आहेस!"मोहनाचा खोल आर्त काफरा स्वर त्या घनगंभीर वातावरतात घुमला.

".........." निशब्द कालवाकालव.

" तुझं काय चालंलय?"मोहननं उत्तर न देताच प्रतिप्रश्न केला.

त्याकडं दुर्लक्ष करत मोहना आसवं गाळत विनवत म्हणाली.

" मोहन एक ऐकशील?"

"सांगून पहा!ऐकण्यासारखं व ज्यातून कुणाचं भलं होणारं असेल तर हा मोहन विन्मुख करणार नाही."

" मोहन हात जोडते......"

फुटू पाहणारा हुंदका दाबत ती ओट्यावरील फिकट अंधारातही त्याच्याकडं आशेनं पाहू लागली.

" माणसानं काळजात आलं ते भराभर सांगून मोकळं व्हावं मोहना!" तिला स्तब्ध झालेलं पाहून व बराच वेळपर्यंत असं रात्री एकत्र बसणं संयुक्तीक न वाटल्यानं घाई करत मोहन म्हणाला.

" मोहन ,एखादी मुलगी पाहून लग्न कर! हवं तर मी गाजरे गुरुजींना व गज्जनकाकांना मुलगी पहावयास लावते!

मोहनला बऱ्याच दिवसाची ठसठसणारी जखम एखाद्यानं जोरात दाबल्यानं मधलं बरबट निघाल्यानं सणक निघाल्यागतच दुखरी सणक निघाली.

" लग्न......! मोहना अनाथ गं मी! आता कुणाच्या कुंकवाचा नाथ व्हावं ही लिप्साच मेली गं.....!"

'अनाथ' हा शब्द कानावर पडताच तिचा रोखून धरलेला बांध फुटला व ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून गज्जन काकास त्यांना एकांत द्यावा, मनातल्या कढाचा निचरा होऊ द्यावा म्हणून मुद्दाम दूर असुनही न राहिलं गेल्याने ते जवळ आलेच. मोहना रडतेय व मोहन गुरुजीच्या कडा ही बहुतेक पाणावल्या असाव्यात ,कारण त्यांचा काफरा, घोगऱ्या आवाजावरून ओळखू येत होतं.

" काका समजवा हो याला!, हे असलं जिवन जाळणं? त्यानं काय हासील होणार!"

गज्जनरावास तडफडणाऱ्या जिवांची काहिली, व ह्रदय पिळवटणारी तळमळ जाणवत असुनही काय करावं सुधरेना.

" मोहन! बोलणारा पश्चात्ताप करत गेला.जिच्यासाठी जळतोय तीच सांगतेय .कृपा कर नी लग्नाचा विचार कर! निदान तिच्यासाठी तरी!"

" विचार पक्का झालाय मोहना! ज्या दुनियेनं अनाथ केलंय ,त्या दुनियेला दाखवायचंय की नाही कुणाचा नाथ होता येत असेल तरी तिच्या आठवांचा नाथ बनुनही जिवन जगता येतंय!"

आता मात्र मोहना गज्जन काकास बिलगली नी जोरजोरात आक्रोश करत " काका तुम्ही तरी समजवा हो याला! नाही तर यापुढे मला तोंड दाखवायला ही लाज वाटेल!"

गज्जनकाका लहान्या मुलीस मांडीवर सांभाळत रडणाऱ्या मोहनास मायेनं थोपटत खोटा दिलासा देऊ लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहना गज्जनकाकास घेत निघाली. जातांना मोहनला "काळजी घे!" एवढंच डबडबलेल्या डोळ्यांनी मूकपणे बोलली. मोहनला ' मी येतो स्टेशनपर्यंत सोडायला' सांगावंसं वाटलं.पण त्यानं तो मोह टाळला.त्याचवेळी तिला ही मनात ' निदान स्टेशनापर्यंत तरी साथीनं मोहननं यावं ' वाटलं .ती गलबलली व पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत निघाली. वाटेत तिला मोहननं पहिल्या भेटीच्या वेळी मोळी चढवली ते वळण लागलं.त्या नवथर वयात गावातलं कुणी असं वागलं असतं तर तिनं कुऱ्हाडीनंच दणकवला असता.पण मोहन कडं पाहतांना ती सुधच विसरली होती व तेवढ्यात मोळी चढवत मोहन चालताही झाला होता.

पुढे चालता चालता कसायाला घेतलेला सावंत गुरूजीचा मळा लागला. तिनं मळ्याकडं पाहताच आताही त्या शेतात मकाच पेरला होता.मक्याचे कोंब मातीचा पापुद्रा वर उचकवत मातीतून अंकुरत होते.त्यांना पाहुन 'आपणास का या कोवळ्या कोंबासारखं विरोधाला झुगारून प्रेमांकुर वाढवता आला नाही?'असा स्वत:शीच प्रश्न पडला. तिला अंगावर चालून आलेलं अस्वल आठवलं.तिला त्या अस्वलात आपले आई वडिल दिसले.अस्वलागत आपल्या प्रेमाचा लचका तोडणारे! फरक इतकाच की शरीराच्या ताकदीवर आपण त्या अस्वलाला परतवलं पण मनाच्या ताकदीनं आई-वडिलांच्या विरोधरूपी हल्ल्यास आपण नाही परतवू शकलो व मोहनला गमावून बसलो.

नदी लागली. दोन्ही काठ असल्यानं उतरणं शक्य नसल्यानं काका काठाकाठानं रेल्वेपुलाकडं नेऊ लागले.

तिला जखमी पडलेली नवथर मोहना आठवली. मोहननं आपणास उचलून खांद्यावर घेतलं तो परपुरूषाचा पहिला स्पर्श जखमी अवस्थेत ही शहारा उठवून गेला होता. ती झपझप चालतांना ठेचकाळली.

" मोहना सांभाळ पोरी" काका तिचा तोल सांभाळत उठवू लागले.

मोहना गाडीत बसली. गज्जन काका फलाटावर ओल्या पापणकडा पुसत होते.ती मांडीवर मुलीला घेत खिडकीजवळ बसली होती. गाडीला अवकाश होता.तिला अचानक आठवलं.

" काका घराच्या उताऱ्यात पंचायतीत मला वारस लावा व नंतर सर्व तुमच्या नावाचं कागदपत्र तयार करून पाठवा.मी सही देईन .ते घर आता तुमचंच समजा.तिला माहित होतं मोहनला खर्च देऊ केला तरी तो घेणार नाही .पण घर मात्र काकानीच घ्यावं. मात्र गज्जनला त्या घरात रसच राहिला नव्हता कारण त्यांचा धर्म्या मित्रा गेल्यावर त्यांना ही आता जगावं ही आसच तुटली.पण तरी मोहनाचं मन राखण्यासाठी त्यांनी होकार भरला.

गाडी सुटली व मोहनास जोरांचा हुंदका दाटला.आता पुन्हा न येणे या विचारानं तीनं काकास डोळ्यात साठवता येईल तेवढं साठवलं. गाडी मोहनास घेऊन निघाली न परतणाऱ्या प्रवासास.

धर्मूबाबा व जसोदाकाकीच्या नंतर मोहनाचं जाणं मोहनला झंझाळून सोडू लागलं.त्याला वस्तीत आता राम राहिला नसल्याची तीव्र जाणीव होऊ लागली. तो वस्तीत आल्यानंतर या मोजक्या काळात त्यानं शाळा सातवीपर्यंत केली.वीस बावीस पटाची शाळा दोनशेच्या वर पटाची केली.नविन वर्गखोल्या बांधकाम आणत सात शिक्षकांचा शिक्षकवृंद झाला.त्यानं लावलेल्या वेली , झाडं बहरली.जिल्ह्यात शाळा नावारूपाला आली पण इतकं करूनही त्याच्या मनाची शांती मात्र ढळली.

गाजरे गुरुजीची निवृत्तीची तारीख जवळ आली. त्यानं सरपंचाला सांगत मोठा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. जिल्ह्यावरून सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं.

सरपंचानं मोहन गुरुजीच्या सांगण्यावरून गाजरे गुरुजींची सजवलेल्या गाडीवरून साऱ्या वस्तीतून मिरवणूक काढली. एका शिक्षकास इतक्या प्रेमानं सारा गाव निरोप देतं यानं सर्व अधिकाऱ्यांना आनंद झाला. हिरवीगार शाळा पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी खूश झाले.त्यांनी चांगल्या बदलाचं तोंड भरुन कौतुक केलं.गाजरे गुरूजीनं सारं श्रेय मोहन गुरूजीला दिलं.

जातांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाव विचारत जि. प. ला भेटावयास बोलावलं.

दुसऱ्या दिवशी सरपंच व मोहन गुरुजी जिल्हा परिषदेत जात साहेबांना भेटले.साहेबांनी शिपायाला चहा सांगितला.

" अनोरकर गुरुजी शिक्षक दिनी आदर्श पुरस्कारासाठी मी तुमची निवड करतोय.त्यासाठी तुम्ही फाईल तयार करा.त्याबाबत बाहेर कासरकर आहेत ते तुम्हास मार्गदर्शन करतीलच.

तुमच्या सारख्या तळागाळात राबणाऱ्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे .म्हणून मी सेवेबाबतची अट शिथिल करत स्पेशल केस करावयास लावतो.

मोहन गुरूजी एकदम शांत.मात्र सरपंचांना तर आनंद गगनात मावेना.

" साहेब आपण मला लायक समजलं यात मी माझं भाग्य समजतो.पण एक विनंती कराविशी वाटते!"

" बोला, हक्कानं सांगा.आम्ही तुमच्या कामावर खुश आहोत."

" साहेब हा पुरस्कार गाजरे गुरुजी सारख्या जेष्ठास दिला तर मला अधिक आनंद होईल."

" गुरूजी गाजरे सरांबाबत माझं काही म्हणणं नाही पण साऱ्यांना त्या शाळेवर तुमचंच काम दिसतंय !"

" कृपा करून साहेब या शाळेसाठी त्यांना मिळावा अन आणखी विनंती की मला बदली हवीय.ही शाळा जशी‌ देखणी व समृद्ध झाली तशीच दुसरी एखादी शाळा मला द्या तिचा दर्जा या शाळेसारखा केला की मग मी स्वत: आपणाकडुन पुरस्कार स्विकारेन! पण आता गाजरे गुरूजीच्या श्रेयात मला वाटा नकोय!"

साहेब एकटक गुरुजी कडं पाहतच राहिले. पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत रांगा लावणारे शिक्षक कुठं!,नी हा कुठं! आपला पुरस्कार दुसऱ्यास द्यायला लावणारा!"

शिपायानं चहा आणला.चहा घेता घेता साहेबांनी मोहन गुरूजीस विचारलं

" बरं ठिक,पण मग बदली का हवीय तुम्हास?त्या शाळेवरच राहत पुढच्या वर्षी..."

"माफ करा साहेब पण ती शाळा आता आदर्श झाल्यावर पुन्हा त्याच कामावर का पुन्हा मी आदर्शपणा दाखवावा.आणि असं ही तिथलं माझं काम संपलं.त्या शाळेला आता माझी गरज नाही. त्यापेक्षा दुसरी शाळा मला खुणावतेय."

" ठिक आहे मी विचार करतो.पण तुम्हास कोणती शाळा हवी ती चारपाच नावं देऊन जा!"

"साहेब दुर्गम भागातली ओसाड असेल असली कोणतीही शाळा चालेल मला!"

"साहेबाच्या विविध पदावरील संपूर्ण सेवेत असा माणूस पहिल्यांदाच दिसत होता.जो स्वत:हून दुर्गम भागात जायला तयार होता.

" गुरूजी तुमच्या सारख्या माणसास दुर्गम भागात पाठवणं मला पटत तर नाही पण तरी इतरांना आदर्श घालण्यासाठी तुम्हास हवी ती शाळा मी देतो."

गुरूजीनं मध्यप्रदेश सिमेलगतची सातपुड्यालगतची शाळा मागत साहेबांची रजा घेतली.

साहेबांनी शिक्षणाधिकाऱ्याकडून रिक्त स्थिती मागत पहाडातली मोठी‌ शाळा पण जिच्याबाबत सतत तक्रारी होत्या अशी शाळा निश्चीत केली.काही झालंच तर लगेच या माणसाची आपण सोय करू हवं तर पण अशा माणसामुळं त्या शाळेचं रूप बदलून पहायचा तरी प्रयत्न करू.

पुढच्या पंधरा दिवसात मोहन गुरूजींचा बदली आदेश आला.पण त्याच दिवशी ढोलूनं मशिन आणत माणसाकरवी धर्मूचं घर पाडलं.गज्जननं त्याला आडकाठी केली तर मोहनानच हे घर मला विकलंय सांगत त्यानं सारा इमला उचलत मळ्यात जाणारी सरळ वाट तयार केली.शाळेच्या कंपाऊंड जवळ उभं राहत तो मोहनं गुरुजीस मोठ्यानं हसत म्हणाला,

" मोहन गुरुजी तुम्ही माझ्या मळ्यातल्या वाटेवर कंपाऊंड बांधत वाट बंद केली होती पण मी वर सरकत वाट मोकळी केलीच!"

मोहननं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.कारण सातबाऱ्यात काय होतं हे त्यांनाही माहित नव्हतं.व ढोलूची अडवणूक करावी असा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता.

गज्जनला विश्वास होता.मोहना घर विकणारच नाही.नी विकलं तरी निदान ढोलूला तरी नाही.त्यांना काही तरी काळंबेरं वाटू लागलं.

रात्री त्यानं ढोलूलाच पाजली व ढोलू सारं खरंखरं ओकला.

.

.

ढोलू मळ्यात जाणारी वाट गेली म्हणून चवताळला होता.त्यात मोहनानंही त्याची डाळ शिजू दिली नव्हती .या दोन्ही गोष्टींचा वचपा काढण्यासाठी त्यानं धर्मूस गज्जनमार्फतच चिथवलंही होतं.पण मोहनानं त्याच्याच छातीवर धाऱ्या लावत त्याला कुत्र्यागत हाकललं होतं.मोहना मला नाही तर मोहनलाही नाही मिळू देणार म्हणून तो डाव आखू लागला. त्यातच तो त्याच्या चुलत साडूकडं टवकीला गेला होता.त्याचा साडू पक्का बेवडा व संपतच्या टोळक्यातला फुकट पिणारा.संपतबरोबर पिण्यासाठी ढोलूला तो घेऊन गेला.ढोलुचं गाव संपतनं विचारलं.चक्करबर्डी सांगताच 'माझा जन्म तिथलाच' सांगत संपतनं आईला बोलवलं.थोरात बाईनं पती सुरवातीला तिथेच आश्रमशाळेत होते ते सांगितलं. व जुनं एकच नाव त्यांना आठवत होतं धर्मूचं ते सांगितलं.त्याचवेळी संपतच्या लग्नासाठी मुलगी पहायचं ही ढोलूस सांगितलं.ढोलूची विचारचक्र फिरली.त्यानं एकांतात संपतबाबत विचारताच साडून " एकदम वाया गेलेली केस!बापाची इस्टेट विकत मजा करतंय!व आमचं काय ,मजा होतेय म्हणून फिरतो मागं मागं."

ढोलुनं बदला घ्यायचं ठरवलं.

तो मुक्कामाला राहिला.दुसऱ्या दिवशी मावशीस त्यानं विश्वासात घेतलं.

" मावशी संपतचं लग्न पक्कं समज.धर्मूचीच मुलगी लग्नासारखी आहे व सुंदर पण आहे.तुम्ही या!पण माझं नाव सांगू नका.कारण माझं त्यांच्याशी जमत नसल्यानं माझं नाव सांगितलं तर तुमचं होणार काम बिघडेल.त्याऐवजी कसलं ही निमीत्त करत जुनी ओळख म्हणून या!"

थोरात बाईला मुलांचे अवगुण दिसत होते म्हणून जवळची मुलगी‌ मिळणं शक्यच नव्हतं.म्हणून त्या एका पायावर तयार झाल्या.

नंतर नवऱ्याचं कागद पत्र काढण्या निमीत्त चक्करबर्डीत येत त्यांनी धर्मूची भेट घेत आपला संपत, आपली जमीन, गाडी , त्याला अनुकंपावर मिळणारी नोकरी, त्याचं लग्न सारं पढवून गेली.त्याच वेळी धर्मु अकोल्याहून परत आलेला होता.त्यात मोहनाच्या लग्नावरून वाद झालेले.मग त्यात एकांतात धर्मूस पाजत ढोलूनं नंतर टवकीत नेलं. व मोहनाचं पक्क केलं. हे मोहनास माहितच नव्हतं.ढोलूनं नाही आपली तर मोहनची पण नाही होऊ देणार असा गेम केला.धर्मू मेला तेव्हा म्हणूनच ढोलू, संपत व थोरातबाईंशी सलगी करत होता.नंतर ढोलूनं ग्रामपंचायतीत मोहनाला वारस लावलं.व संपतरावांनी मोहनास कळू न देता मोहनाच्या सह्या घेत परस्पर ढोलूस घर विकलं. गज्जनजवळ नशेत ढोलू सारं पोपटागत ओकला.

गज्जननं दारू पिऊन फुल्ल टू झालेल्या ढोलूस एक लाथ घातली.

'कुत्र्या ,तू घर पाडलंस याचं मला काहीच वाटत नाही.मला मोहनानं देऊ केलं पण मी घेतलंच नाही.पण साध्या एका वाटेसाठी तू एवढं थराचं राजकारण करत दोन प्रेमातूर जिवांना वाटेला लावलं याचंच मोठं दु:ख होतंय." गज्जन काकानं ढोलूचं छाताडं धरत त्यास शाळेत मोहन गुरुजीकडं नेलं.

" मोहन, माझा धर्म्या बेवडा होता, गरीब होता पण नालायक नव्हता रे! या हरामखोरानं शाळेत वाट गेलीय म्हणून त्याला भरवत भ्रमीत केलं नी मोहना व तुझ्या प्रेमात वाट (फूट)पाडली!खरा गुन्हेगार तर हाच आहे!"

मोहनला सारा प्रकार गज्जन काकानं सांगितला.पण सर्वस्व गेल्यावर माणसातल्या लोभ, राग, द्वेष या भावनाही आपोआप जातात ; तसंच मोहनचं झालं होतं. व तो या साऱ्या गोष्टींपासून दूर जाऊ पाहत होता.त्यानं गज्जन काकाच्या तावडीतून ढोलूस सोडत मोकळं केलं.ढोलू लांब डिगा टाकत हेलकावत पळाला. उशीर झाल्यानं मोहननं गज्जन काकास शाळेतच झोपवलं.

सकाळी मोहननं उठत अंघोळ केली.उठून घरी जाणाऱ्या गज्जन काकास दहा वाजताच यायला सांगितलं."मला गावाला जायचंय रेल्वेस्टेशन पर्यंत या सोबत!" एवढंच तुटकपणे सांगितलं.

मोहनने‌ वस्तीत कुणालाच काहीच कळू दिलं नाही.आताच कळलं तर वस्तीवाले उगाच मोह निर्माण करत विनवतील.त्यापेक्षा नकोच.

त्यानं सर्व सामान तिथंच ठेवलं.नविन आलेले दोन गुरुजी त्याच्याच वयाचे. शाळेतच राहणार होते म्हणून त्यांच्यासाठीच त्यानं ते ठेवलं.सारं गेल्यावर हे घेऊन काय करायचं! त्यानं फक्त सुरूवातीला सोबत आणलेली शबनम घेतली. व त्यात शाल ठेवली.शालीला पाहताच त्याच्या ह्रदयात सयीचं मोठं आभाळ दाटून आलं.शालीची घडी करून ती मांडीवर घेत तो तसाच बसला. सारं सारं त्याला जसंच्या तसं आठवू लागलं.

.

.

अकोल्याहून जसोदा काकी व धर्मू बाबास दवाखान्यात ठेवून तो व मोहना परतत होते.रेल्वेत रात्री त्याला थकव्यानं झोप लागली.तोच बाहेर पडणारा पाऊस व सोबत थंडगार वारा खिडकीतून आत येत त्याची झोप चाळवली.त्यानं अंग आकसून घेतलं. समोर बसलेल्या मोहनानं उठत पिशवीतून शाल काढत त्याच्या अंगावर टाकली.

मायेसाठी आसुसलेल्या त्याच्या अंगावर मायेनं पडलेली ती पहिलीच शाल.सकाळी स्टेशनात उतरल्यावर तिनं ती परत मागितली.

" राहू दे मोहना! कुणी मायेनं टाकलेल्या शालीत एवढी ऊब होती हे आजवर मला माहितच नव्हतं गं खूप मस्त वाटतंय शालीत!" ती हसून लाजली.पण त्याच्या उरातलं दु:खं तिला तो पावेतो माहित नसल्यानं कळालं नसावं.वस्ती येताच त्यानं शाल दिली पण जेव्हा धर्मूबाबानं अनाथ म्हटलं नी अनाथ मोहन मोहनाचा नाथ कसा बनू‌ शकतो? सांगितलं .त्याच रात्रीच्या पहाटे ती धावत शाळेत तीच शाल घेऊन आली .

"मोहन! मी असो नसो! पण आजपासून हीच शाल पांघर! मायेच्या माणसाची ही भेट समज! " तिनं अंगावर स्वत:च्या हातानं टाकत रडतच करकरचून मिठी मारली.

" मोहन मी किती स्वार्थी आहे रे !त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर तू शाल मांगितली तरी नाही समजू शकले. नी आता सारं समजलं तरी ऊब मिळेल पण मायेचं माणूस नाही बनू शकत!" ती एकसारखी रडत होती.मिठी सुटता सुटेना.

मोहनच्या डोळ्यातील आसवांनी मांडीवरील शाल ओली होऊ लागली.ती तशीच त्यानं शबनम मध्ये घातली.

तो व्हरांड्यावर आला.वस्ती सोडण्याआधी सारी वस्ती एकवेळा नजरेनं प्यावी असं त्याला वाटत होतं. समोरचे डांगचे डोंगर हिरवेगच्च निथंबलेले होते.पण त्याला ते रडत असावेत असंच भासू लागलं.एरवी वस्तीकडं पाहिल्यावर त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न होत बोलायला करत. पण मोहना लग्न‌ होऊन गेली नी सारंच बदललं. पाहता पाहता त्याला ढोलूनं पाडलेलं घर दिसलं नी त्याला अधिकच भकास वाटू लागलं.

गज्जन काका तितक्यात घरून न्याहरी घेऊन आले. त्याला खावंस वाटेचना.पण या वस्तीतला हा शेवटचा शेर! व गज्जन काकानं एवढ्या प्रेमानं आणलं म्हणून काकास सोबत बसवत त्यानं न्याहरी केली.

तोच नव्याने बदलून आलेले गुरूजी आले. ते एकदम प्रसन्न वाटत होते.नवलाईनं हिरवी शाळा, वस्ती, डोंगर पाहत होते.आपणही नविन आलो तेव्हा असंच पाहून भुललो होतो तीच वस्ती ,तोच डोंगर मग आता का आपणास आकर्षित करत नाही.फक्त मोहनाचं कुटुंब कमी झालंय! की फक्त मोहना मुळंच? खरच एकाच व्यक्तीच्या जाण्यानं‌तर पूर्वीचं वैभव का फिकं फिकं वाटावं. कवी तर म्हणतात' रामकृष्ण ही आले गेले, त्यांच्याविण जग का ओसीच पडले!' पण येथे तर मोहनानंच एवढी खळबळ माजवलीय एका वर्षात.

मोहन गज्जनकाकांना घेत निघाला. रस्त्यानं गज्जन काकानं विचारलंच

" गुरूजी ,अकोल्याला चाललात का? परत केव्हा येणार?"

या सवालातीनं मोहन बिचकला.काय सांगावं? त्यानं " पाहू ,लवकर परतू" त्रोटकपणे उत्तर दिलं.काका ज्यावेळी 'गुरुजी' बोलत त्यावेळेस मोहनला दुरावा वाटे.पण ज्यावेळेस थेट 'मोहन' बोलत त्यावेळेस आपलं आतड्याच्या नात्याचं माणूस साद घालतंय असंच वाटे.रात्री ढोलूचं छाताडं धरून आपल्या पुढ्यात उभं करतांना थेट मोहन म्हणून बोलतांना किती ओलावा वाटला होता.त्याच ओलाव्याचा परिणाम की काय आपण ढोलूस मोकळं सोडलं. त्याला मोहनाचं थेट 'मोहन' या नावानं हाक मारणं ही असंच आवडे .ते आता आठवलंही.

जखमी अवस्थेतल्या मोहनास काकाच्या सांगण्यावरून त्यानं खांद्यावर उचलंल.नी अर्धवट ग्लानीतली मोहना, ' मोहन!' ,

' मोहन!' पहिल्यांदाच एकेरी बोलली.ती साद ऐकताच आपण सर्वांगानं शहारत थरथरलो.व त्यावेळेस तिला गच्च धरत ही वाट युगा युगाची अशीच चालावी असंच वाटत होतं.

" मोहन ,स्टेशन या वाटेला आहे पोरा ! तू त्या मास्तराच्या मळ्याच्या वाटेनं कुठं चाललाय!" गज्जन काका आपणास मागून सांगत होते.मोहनच्या डोळ्यात अश्रू तरळले व त्याला मळा, वाट काहीच दिसेना.

" मोहन ,पंधरा दिवसापूर्वी मोहना गेली तेव्हा ही ती अशीच ठेचकाळली.नी आता ही तू वेड लागल्यागत...! पोरांनो वेडे व्हाल अशानं!" काकाच्या डोळ्यातही आषाढ श्रावण बरसू लागला.

त्यांच्या 'मोहन ' या सादेनं मोहन खालीच बसला.नेमकी ती जागा तीच होती,जेथून मोहननं जखमी मोहनास उचललं होतं.

गज्जन काकानं मोहनला उठवत विनवलं.

" मोहन गेलेला काळ परत येणार नाही.पुढे बघ व चाल.अन्यथा मोहनाच्या आठवांनी मरणार तू पोरा!"

" काका म्हणूनच ही वस्ती मी कायमची सोडून जातोय आज!"

मोहन तोंड फिरवून गंभीर होत म्हणाला नी गज्जन काका त्याच्या कडं एकदम भकास पाहत रडतच मटकन खाली बसला.

" मोहन,!" काका लहान पोरासारखा हमसून हमसून रडू लागला.पण मोहनला काकास धीर देण्याचा धीर झालाच नाही.

बराच‌वेळ गेल्यावर दोघे उठले.

स्टेशनावर मोहननं काकास चहा पाजला.काका सुन्न होत चहा घोटू लागले. तोच पुन्हा अचानक त्यांना हुंदका दाटून आला.

" पोरा बिदाईच्या वेळी मोहना धर्म्यास बोलली होती रे, ' तुटलेल्या काळजाची हाय.....' आज वस्तीतल्या देव माणसानं वस्तीकडं पाठ फिरवली..ही हायच आहे!"

गाडी आली मोहन बसला व काकांना साठवत निघून गेला.

पण गज्जन?....गज्जन.....

फलाटावर संध्याकाळ पर्यंत तसाच सुन्न बसुन राहिला.रात्रीची आठची गाडी येण्याआधी तो पटरी धरुन बराच पुढे चालत गेला. गाडीनं थांबा घेत शिटी देत माघावून येऊ लागली.त्याच येणाऱ्या गाडीत गज्जननं...........रक्ता मासांचा चिखल.......आवाज न करता .....मोहन मोहनाच्या वियोगापेक्षा ही हा वियोग खूप मोठा होता.तो गज्जन काका सहन करू शकले नाही.

वासुदेव पाटील

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel