वर्धन वंशातील भारतातील शेवटचे थोर हिंदू सम्राट म्हणजे सम्राट हर्षवर्धन होत. वर्धन घराण्यास  वर्धन अशी संज्ञा आहे कारण , त्यांतील  राजांची नावे 'वर्धन'पदान्त आहेत.   वंशात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. हर्षवर्धन हे त्यातीलच एक .... भारतातील प्राचीन काळातील राजांमध्ये हर्षवर्धन यांचे  नाव आदराने घेतले जाते.
     राजे प्रभाकरवर्धन व राज्ञी यशोमती यांना दुसरे राज्यवर्धन व हर्षवर्धन हे दोन मुलगे आणि राज्यश्री ही कन्या अशी तीन संताने होती. राजे प्रभाकरवर्धनांनी अनेक विजय मिळविले होते. त्यांनी हूण, सिंधूदेशाचे प्रमुख,  गुर्जराधिपती, गांधार देशाचा राजा व मालव देशाचे अधिपती यांवर विजय मिळवले.त्यांनीच या पराक्रमामुळे स्वत: ‘महाराजाधिराज’ ही सम्राटपददर्शक पदवी धारण केली होती.
      प्रभाकर्वर्धन यांच्या पश्चात रज्यावर्धन गादीवर आला. त्याने काही काळ राज्यकारभार केला. त्याला दुसऱ्या राजाने कपटाने मारले. राज्यवर्धननंतर इ.स. ६०६ मध्ये हर्षवर्धन थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या "हर्षचरित" ग्रंथमधून व्यापक माहिती मिळते. पुढे हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्षे राज्य केले. त्यात अनेक पराक्रम गाजवले. शशांक नावाच्या बंगालच्या राजाशी आणि माळवा प्रांताच्या देवगुप्ताशी लढाई करून शशांकने बळकावलेला कनौज प्रांत हर्षवर्धनाने सोडवून राज्यात समाविष्ट करून घेतला. त्याने एक एक करत  साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मीरपर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्ताला सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणले. हर्षवर्धनाने अवघ्या सहाच वर्षांत भारतातील पाच प्रांत जिंकले आणि नंतर तीस वर्षे शांततेने राज्य केले. एका युद्धात मात्र हर्षवर्धनाचा पराभव झाला. महाराष्ट्राने त्याच्यापुढे मान वाकविली नाही.दक्षिणेतील चालुक्य घराण्यातील दुसरा पुलकेशी याने नर्मदातीरीच्या युद्धात हर्षवर्धनाच्या सैन्याचा धुव्वा उडविला .  
     हर्षवर्धनाचे सैन्यदळ फार मोठे होते. हुएनत्संग नावाचा चीनचा वकील हर्षवर्धनाच्या दरबारात होता. त्याच्या लिखाणानुसार हर्षवर्धनाच्या सैन्यात एक लाख घोडदळ आणि साठ हजार हत्ती होते.
     हर्षवर्धनाने आपला स्वतःचा संवत्सर स्थापला. त्याचा आरंभ त्याच्या इ. स. ६०६ मधील त्याच्या राज्यारोहणापासून होतो. तो संवत् सुमारे ३०० वर्षे उत्तर भारतात प्रचलित होता.
हर्षवर्धन स्वतः राज्यकारभारात लक्ष घालत असे.तो आपल्या राज्यात सर्वत्र फिरून शासनव्यवस्था कशी चालली आहे, हे स्वत:  पाहत असे.
   हर्षवर्धनानांच्या काळात संस्कृत व्याकरणाची विस्तृत निर्मिती झाली. हर्षवर्धनाच्या काळात चातुर्वर्ण्यप्रणाली आणखीनच प्रगत झाली.
हर्षवर्धन हा शिवोपासक होता . पण हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना सोडून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
      सम्राट हर्षवर्धन दर पाच वर्षांनी प्रयाग येथे धर्मसंमेलन भरवून त्यात पाच वर्षांत साठवलेली सर्व संपत्तीचा  दानधर्म करत असे. इ. स. ६४३ मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सहावे धर्मसंमेलन प्रयाग येथे भरविले.  तीन महिने चाललेल्या या उत्सवात हजारो बौद्ध, ब्राह्मण व जैन  तसेच अनाथ व अपंग लोकांस मोठा दानधर्म करण्यात आला. हर्षवर्धनाने प्रयागमध्ये आयोजित केलेल्या सभेला "मोक्षपरिषद" असे म्हटले जाते.
    सम्राट हर्षवर्धन स्वत: एक  नाटककार आणि कवी होते. त्यांनी 'नागानंद', 'रत्नावली' आणि 'प्रियदर्शिका' नावांच्या नाटकांची रचना केली. आपल्या दरबारात ते बाणभट्ट, हरिदत्त आणि जयसेन यांसारखे प्रसिद्ध कवी गौरवाने बाळगून होते.
    हर्षवर्धनांनाला पुत्र नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर राज्यात कलह उत्पन्न होऊन त्याची गादी मंत्र्याने बळकाविली. त्याचे साम्राज्य त्याच्याबरोबरच लयाला गेले. हर्षवर्धनास प्राचीन भारतातील शेवटच्या सामर्थ्यवान राजाचा सन्मान दिला जातो. त्यानंतर भारतामधील मध्ययुगीन काळाचा आरंभ झाला.
    उत्तम नाटककार, शूर व न्यायी शासक, धर्मविद्या व कला यांचा उदार आश्रयदाता व इतर गुणांमुळे हर्षवर्धनांची कीर्ती सर्वदूर पसरली.भारतीय इतिहासात सम्राट हर्षवर्धन अजरामर आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel