*अंतराळवीर कल्पना चावला*
कल्पना चावला हिचा जन्म १जुलै १९६१ रोजी हरियाणा राज्यातील करनाल गावात झाला.ती चार-पाच वर्षांची असताना भातुकलीत रमण्या ऐवजी कागदाची राॅकेट करून उडवण्यात अधिक रमे.
कल्पनाला वयाच्या आठव्या वर्षी 'करनाल फ्लाईंग स्कूल'ला भेट देण्याची संधी मिळाली.तिने वैमानिक होण्याचा दृढ निश्चय केला.१९८२ मध्ये पंजाब इंजिनियरींग काॅलेजमधून तिने एराॅनाॅटिकलची इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली.त्या अभ्यासक्रमात एरोस्पेस इंजिनियरींगचा विशेष अभ्यास केला होता.कल्पना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील विश्वविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज करत होती.आई वडीलांना वाटत होते तिने भारतातच रहावे.
कल्पना अमेरिकेत गेली. १९८४ मध्ये युटीए काॅलेज ऑफ इंजिनियरींगमधून एरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली.अफाट वाचन,ज्ञान,संशोधनवृत्ती यामुळे तिने तेथे अनेक परिक्षा दिल्या.१९९४ मध्ये अंतराळ वीरांच्या प्रशिक्षणासाठी ती निवडली गेली.१९९५ मध्ये अन्य बावीस प्रशिक्षणार्थीं बरोबर तिने ते प्रशिक्षण पूर्ण केले.
१९९७ मध्ये कल्पनाला अंतराळात जायची पहिली संधी मिळाली.ती त्यावेळी ३७६ तास अंतराळ यानात होती.१९९७ मध्ये भारताचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल होते.कल्पनाशी ते बोलले.
तिचे अनेक कलांवर प्रेम होते.भारतिय संगीत व भरतनाट्यम् तिला आवडत होते.ती उत्तम वक्ता होती.
२००३ च्या अंतरीक्ष भ्रमणाच्या प्रवासासाठी तिची फ्लाईट इंजिनियर म्हणून तिची निवड झाली होती.ही सफर सोळा दिवसांची होती.अंतराळ वीरांचे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. नाडीचे ठोके ७२ वरून १०२ वर जातात.साधी हालचालही वेदनामय असते.पोशाखही जड असतो.
१७ जानेवारी २००३ रोजी अमेरिकेच्या अंतराळ केंद्रातून कोलंबिया म्हणजेच STS-१०७ ह्या यानाने अंतराळात झेप घेतली.यात कल्पना चावला व इतर सहा अंतराळवीर होते.१७००० मैल/तास वेगाने यान पुढे जात असते.वातावरण असेपर्यंत त्यांना आकाश निळे दिसते.मग काळोख असतो.
अंतराळात प्रयोगशाळाही होती.त्यात कोळी,माशा,उंदीर होते.गुलाबाची रोपे होती.जेवण,पाणी होते.स्नान न करता अंग पुसावे लागे.कल्पनाला छायाचित्रणाचे महत्वाचे काम होते.ती पृथ्वीची चित्रे नासाला पाठवत होती.
१ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया यान पृथ्वीवर परत येणार होते.सकाळचे ८.१५ वाजले होते.२५५ वी पृथ्वी प्रदक्षिणा चालू झाली.यान पृथ्वीवर खाली येत असताना शेवटच्या सहा मिनिटात त्यातील तापमान एवढे वाढले की कोलंबिया अंतराळातच अदृष्य झाले.फक्त प्रकाशाचा एक कल्लोळ पृथ्वीवर फेकला गेला आणि टेक्सासच्या जमिनीवर काही अवशेष फेकले गेले.
सात हसरे चेहरे तारे बनून आकाशगंगेत विरून गेले...सारे जग दुःखसागरात बुडाले...कल्पना चावलाच्या निधनाची बातमी आली.सारे राष्ट्र दुःखी झाले.भारतीयांनी धाडसी,हुशार कल्पना चावलाला स्मृतीवंदना दिली.
*कल्पना चावला अमर रहे*
- लेखिका-भावना अरविंद प्रधान
एम्.ए.,डिप्लोमा इन जर्नलिझम#285327435
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel