Abhay:
प्रकरण १३.

 

कनक ओजस पाणिनी च्या ऑफिस मधे दुपारी आला आणि पाणिनीच्या टेबलावर ताज्या वर्तमान पत्राची चवड टाकली. पाणिनी ने त्या पेपर कडे लक्ष न देता विचारले,” कितपत वाईट आहे हे ?”

“ ते यात पार शेवट पर्यंत गेले.खांडेकर ने कोणतेही विधान करायला तात्विक विरोध केला.पण आपल्या दुर्दैवाने इन्स्पेक्टर होळकर तिथे होता त्याने पेपर वाल्यांसमोर विधान केले.”

“ खांडेकर यांच्या ऑफिस मधेच?”

“ हो आणि ते सुध्दा त्यांच्या समोर. अगदी मान डोलवत होते ते तेव्हा.” “होळकर म्हणाला पाणिनी पटवर्धन विरोधी वकील असताना अनेक प्रकरणात त्याला अगदी सहज बाजुला केलंय. तळ्यातून काढलेल्या साध्या गोळ्यांच्या बाटलीने पोलिसांच्या डोळ्यात  अजिबात धूळ फेक झालेली नाही.”

“ पाणिनी , त्यांच्या लक्षात आले की जयकर च्या लॅब मधूनच अनन्याने सायनाईड आणले.म्हणूनच जयकर जेव्हा त्याच्या घरी आलाच नाही तेव्हा त्यांनी कसून तपास चालू केला.त्यांना जयकर त्याच्या नेहेमीच्या रेस्टॉरंट मधे एका माणसाला भेटलेला दिसला  आणि त्याच वर्णन पाणिनी पटवर्धन शी जुळतंय.”

“ ते दोघे लग्नासाठी एकत्र जातील या अंदाजाने त्यांनी बाहेरगावी  जाणारे रस्ते तपासले तेव्हा अलगद पणे त्याच्या हातात ते सापडले , सगळी पोलीस मंडळी अगदी चमकताहेत पेपर मधे. तत्व न सोडणारे खांडेकर,, मोठा सिगार ओढताना  होळकर, अश्रू ढाळताना ते जोडपे “

“ सार्जंट ला, नम्रता नावाचा गुण असतो हे कधीच कळले नाही.”

“मिलिंद बुद्धीसागर चे काय? नव्याने काही कळले?”

“ नव्याने काही नाही, पूर्ण शांतता आहे.तुला हा पेपरचा गठ्ठा वाचायचाय ?”

“ अत्ता नाही “ पाणिनी म्हणाला. आपल्याला कबूल करायलाच पाहिजे की आपल्याला मोठा दणका बसलाय. एक ते नऊ आकडे मोजून झालेत पंचांकडून, आपल्याला पुन्हा उठून लढायला लागेल.पण त्याने वेदना होतील. अनन्याच्या भूतकाळाबद्दल काय? तुला काहीतरी समजलं होत ना?”

“ ही घटना पंचवीस वर्षापूर्वीची आहे जेव्हा तिच्या आईला मिरगल ने त्याची खाजगी सेक्रेटरी म्हणून ठेवले होते.” ओजस म्हणाला.

“ अरे बापरे ! म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा तर नाही की ती मिरगल ची मुलगी असेल?”

“ असा एकदम घाई घाईत अर्थ नको काढू. “

“ पाणिनी हसला,” तू तुझ्या पद्धतीनेच सांगत रहा कनक “

“ मिरगल आणि विशाल जबडे नावाचा एक माणूस भागीदारीत बांधकाम व्यवसायात होते.अनन्याची आई रीमा गुळवणी त्यांची सेक्रेटरी होती. हिशोब तिच्या डोक्यात इतके पक्के असत की हिशोबनिसाला तेच काम करायला अर्धा तास लागे. फोन घेणे,निर्णय घेणे, अशा अनेक गोष्टीत ती तरबेज होती.”

“ मिरगल आणि विशाल जबडे दोघेही तिच्यावर प्रेम करायचे. विशाल विवाहित होता, रीमा ला तो आवडायचा. पण कुणीतरी विशाल च्या पत्नी चे कान भरले. त्याचे निमित्त करून तिने विशाल  ला भागीदारीतील हिस्सा काढून घ्यायला लावला.त्याची मिळकत हडप करायचा प्रयत्न केला. जेव्हा लग्न मोडकळीस येत तेव्हा हे सर्व कसं घडत माहित्ये तुला. पुरुष बारिक सारिक गोष्टी लक्षात ठेवून सांगू शकत नाही आणि बाई मात्र जेव्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहते तेव्हा सर्व बारकावे लक्षात ठेऊन सांगते ! ‘

“ ती पैशाची भुकेलेली होती आणि विशाल कडे तगादा लावायची. शेवटी नाईलाजाने विशाल आणि रीमा यांनी योजनाबद्ध रीतीने धंद्यातील थोडी थोडी रक्कम बाजुला काढून एका फंडात ठेवली जेणे करून विशाल ला त्याच्या पत्नीशी तडजोड करण्यासाठी रोख रक्कम उपलब्ध होईल. विशाल ला पत्नीकडून घटस्फोट मिळाल्यावर रीमा आणि विशाल लग्न करणार होते.”

“ अस असताना ज्या अर्थी अनन्याविशाल च आडनाव लावत नाही आणि गुळवणी हे आईच आडनाव लावते त्या अर्थी ....” पाणिनी ने शंका म्हणून विचारले.

“ विशाल ने गोळी घालून आत्महत्या केली. त्या नंतर साडेसात महिन्यांनी अनन्याचा जन्म झाला.”

“ रीमा अडचणीत येईल अस कृत्य का केलं त्याने?” सौम्या ने विचारले.”

“ असे असेल की, जेव्हा रीमा ला कळल की तिला बाळ होणार आहे, तेव्हा विशाल ला लक्षात आलं की आपण संपलो. त्याच्या बायकोला त्याच्यावर व्यभिचाराचे आरोप करायला निमित्तच मिळाले, ती अशाच काही संधीची वाट पाहत असणार. त्या नंतर रीमा ने नोकरी सोडली, तिच काय झालं कोणालाच माहीत नाही. तिने मुलीला जन्म दिला, त्या नंतर काही महिन्यातच ती गेली.”

“ आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो, तिने एक पत्र सीलबंद करून तिच्या बँकेत दिले आणि सूचना देऊन ठेवली की तिची मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला ते द्यावे. त्यात काय लिहिले होते सांगणे अवघड आहे पण एक अंदाज आहे की अनन्या अनौरस होती हे त्यात असावे.पण तिने आणखीन ही काही लिहिले होते त्यात ज्यामुळे अनन्याला बराच विचार करायला भाग पाडले.”

“ त्या पत्र नंतर तीस दिवसात ती मिरगल ला भेटली. त्याने तिला आपल्या बरोबर घरात रहायला आणले.आणि तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली.पण त्यांच्यात काहीही मायेचा ओलावा नव्हता, उलट तो तिला घाबरवायचा. “

“ थोडक्यात “ पाणिनी म्हणाला, “ त्या पत्रात अस काहीतरी होते क

ी त्यामुळे सर्व चित्र च बदलले. कदाचित भागीदारी संपुष्टात आणताना मिरगल ने त्याच्या भागीदाराला फसवले असणे, विशाल च्या मृत्यूत काही गूढ असणे, आत्महत्या नसणे, मिरगल ने च गोळी घालून आत्महत्या भासवली असणे,असं काहीतरी उल्लेख पत्रात असावा.”

“ मला त्यात काय लिहिले होते ते हवंय.”

“ सरकारी वकिलांना पण ते हवंय.” ओजस म्हणाला.

“ आपल्याला अजून यात हवा तसा ब्रेक मिळत नाहीये. आपल्याला काही गोष्टी सिध्द करण्या साठी जे शोधून काढायच् आहे, त्या करता हे पत्र पुरावा म्हणून वापरता येणार नाही पण सरकारी वकीलाला मात्र हे पत्र खुनाचा हेतू सिध्द करण्यासाठी वापरता येईल.” पाणिनी म्हणाला., “सरकारी वकीलांच्या दृष्टीने पहा. मिरगल आणि तिला परस्परांबद्दल प्रेम नव्हत पण पत्रातल्या मजकुराच्या आधारे तिने त्याला घरी आणायला भाग पाडलं, शिक्षण द्यायला भाग पाडलं, ती अनौरस असल्याने आपल्या कौटुंबिक मित्र असलेल्या जयकर शी लग्न करायला मिरगलचा विरोध होता, कालांतराने मिरगल मेला आणि अनन्याने डॉक्टरांसमोर खुनाची कबुली दिली.”

कनक ओजस ने आपले खालचे ओठ अंगठा आणि तर्जनी च्या चिमटीत धरले. “ या सगळ्याला तू कसं खोडून काढणार आहे पाणिनी ? “

“ मला याची उत्तरं माहीत व्हायला हवी असतील तर मला वकीलापेक्षा जादूगार व्हायला लागेल.”

‘’ पोलीस याची माहिती घेऊ शकतात का ? “ ओजस ने विचारले.

“ तुला नाही का मिळाली ? तशीच त्यांना ही मिळेल.”

“ पण तुला एक फायदा आहे पाणिनी, तू थेट अनन्याला विचारू शकतोस की पत्रात काय होते?”

“पोलीस पण विचारून माहिती घेऊ शकतात “

“ असे काय?” ओजस ने विचारले.

हाताने कपडे पिळायची खूण करून पाणिनी ने ओजस ला काय ते सुचवले.

 

 

प्रकरण 13 समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel