प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.

रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली.
रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं-
"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"
रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं-
"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?"
रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-
"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"
समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली.

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि  एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती.

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले.
रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -
१) १९ जणांचा मृत्यू झालेला होता.
२) ७ मुली विधवा झालेल्या होत्या.
३) १३ जण घटस्फोटीत होते.
४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती.
५) ५ मुले विधूर झाली होती.
६) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.
७) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.
८) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.
९) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.
१०) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.
११) २ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.
१२) १ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
१३) ३ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.
१४) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.
१६) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.
१७) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.
१८) २ जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ते जेलमध्येच होते.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-
"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel