" माळ्यानं केला मळा, बंधुनीं केल्या केळीं ।लिंबुणीला आळी करी, पलाणीला सीताफळी । उंच गेलीया नारळी ॥"" सावळ्या सुरतीकडं नार बघती भरभरा । माझा बंधुराया कवळा राजीगरा ॥""संगत कर नारी शिण पाहुनी कवळी ।माझा बंधुराया लिंबं झाडाला पिवळीं ॥""चालली गिरणबाई चाल तुझी अवखळ ।माझ्या बंधवाची बाजुवाल्याची ताराबंळ ॥"" आली आगीनगाडी दिसती काळीनिळी ।बंधुनं ढासळली शिगनळा तुझी फळी ॥"" चंचाळ नारीची हिची नजर चळली ।बंधूला देखून डाळ दुधांत येळीली ॥"" जातीची कळवातीण भल्याभल्याला होईना राजी ।बंधूनं माझ्या जातां जातां कुठं केली ठकबाजी ?॥"शेजीपाशीं गुज बोलून गेलं वाया ।नाहीं माझी बया हुरदी साटवाया ॥जातीयाची शीगा मोडूं नये ती बोटानं ।तुझ्या पाठचा पठाण ॥भावाच्या बहिणीनं काय आकरीत केलं ।सोमवारीं नहाली पाणी बेलाच्या खालीं गेलं ॥भावाच्या बहिणीनं वाकडी वाट केली ।आपट्याखाली गेली गळाभरुन सोनं ल्याली ॥माळ्याच्या मळ्यांत सर्प लोळे सावलीला । नको मारुं दादा गर्भ तुझ्या मावलीला ।झाली तुला दॄष्ट, मीठमोहर्‍या रांधाच्या ।आतां माझ्या बाळा माझ्या आखूड बांध्याच्या ।माळ्याच्या मळ्यात ईसबंधाच्या आळशा ।अशी झाली दॄष्ट तान्ह्या बाळाच्या बाळशा ॥सकाळीं उठूनी मला लक्षा लाभ झाला ।तुळशीच्या ओटयावरी करंडा कुंकवाचा सांपडला ॥नाक तुझ डोळं न्याहाळीतें वजवज ।माझ्या चंद्रभागे डोल्यावरलीं सारज ॥मोठ मोठ डोळ तुझं बघणं टपाटपा । माझ्या बंधवा हरणीमागल्या काळवीटा ॥"चैताच्या महिन्यांत चैती पालव फुटली ।मावलीवांचून दुसर्‍या गोताला इतकी माया कोठली?""मावलीची माया सर्व्या बाळांवरी ।चिमणी कोट करी जाईच्या कळ्यांवरी ॥"" पिता माझा वड बया माझी करवंद । काशीला जाते वाट दोन्ही झाडांच्या मधून ॥""चंदन मौलागिरी नांव माझ्या पित्याईचं ।असं गोड दुधु बया माझ्या नारळीचं ॥"उगवला दिन जसा आगीचा भडका ।सुवर्णाच्या तेजीं त्याला मोत्याच्या सडका ॥उगवला दिन जशी शेंदराची पुडी ।माझ्या बाळाला औक्ष मागतें वाढीदिडी ॥उगवला दिन गगनी लावी ध्वजा ।देव भगवान सार्‍या पॄथिमीचा राजा ॥माझी अंगलट जशी कवाडाची फळी । माझी बयाबाई चोळी बेतून लाव कळी । माझ्या दंडभुजा जशा हिरीच्या बाजवा ।बयाच्या दुधाला नाहीं लागला ताजवा ॥मोठ मोठ डोळ बघण्याची रीत न्यारी ।माझ्या बंधूराया चांद ढगांत गिरकी मारी ।वाटॆनी कोण येतो निचाळ चालणीचा । माझा बंधुराया नवा जोंधळा पलाणीचा ।गांवाला गेला कुण्या तिकडे माझा डोळामाझा बंधुराया माझा नवतीचा पानमळा ।गोरीचं गोरपण उसाच्या वाड्यावाणी ।खेडचा राहणेवाला काय बघतो वेडयावाणी ॥गोरीचं गोरपण जशी हरभर्‍याची डाळ । जीवीची मायाबहीण माझी पुतळ्याची माळ ॥आम्ही तिघी बहिणी तीन गांवच्या तीन पेठा ।माझा बंधुराया मला सातारा दिस मोठा ॥तुझ्या जीवासाठीं होईन रानांतील हरण ।माझ्या बंधुराया तुझ्या भोंवतालीं चरेन ॥राम राम म्हणूं राम माझी साडी चोळी ।उलटतें घडी सकाळीच्या प्रात: काळीं ॥पुतळ्याची माळ माझ्या लोळती पाठीं पोटी ।माझ्या बंधवाला चंद्रहाराला झाली दाटी ॥गुज बोलायला मायलेकीचं गुज गोड ।मावळाया गेली चांदणी सोप्या आड ॥धनसंपत्तीला कुणी पुसना मालाला ।किती महिने झाले तुझ्या कडच्या लालाला ? सीतेला वधिली साक्ष आणिला तिचा हात ।केगई सासू जेविली दूधभात ॥सीतेला वधिली साक्ष आणिल तिच डोळ । राम धरणीला लोळ ॥सीता चालली वनवासा    कुकू कपाळ भरुनी ॥तिचा अळींकार राम    हेरीतो दूरुनी ॥सीतेला घालवाया    आयाबायांचा घोळका ।संभाळा बायांनो    राम भुकेचा आळका ॥लक्षूमण दीरा    सांग मनींचं कपट ।नव्हं माहेराची वाट    रान दिसतं अचाट ।भयाण वनामधीं    सीता रडते आईका ॥तिला समजावया    बोरीबाभळी बाईका ॥सीता वनवासी    दगडाची केली उशी ।येवढया वनामधीं    बाई झोप आली कशी ?सीता नार बांळतीण    तिला सुईण नाहीं कोणी ।नेत्र झाकुयानी    तातोबा घाली पाणी ॥राई रुकमीण दोघी    भांडती परसदारीं ।विठ्ठलदेवाची तुळशी    धाकलीनें पिर्त नेली सारी ।रुकमीण बोल "माझ्या    विठ्ठला पितींच्या ।वाडयाला नका जाऊं    तुळशी गरतीच्या " ॥रुकमीण बोल " देवा    पिरतीची कोण ?""काय सांगू रुकमीणी    माझ्या तुळशीचं गुण ?"रुकमीण बोल " जळो    तुळशीचं जिणं ।वर्षाच्या वर्षीं लावी    देवाशीं लगीन "॥सकाळीच्या पारी    रुकमीण घालती रांगुळ ।देव करीतो अंघोळ ॥पंढरीच्या माळावरी    उडती पिवळी माती ॥रुकमीण सारवी    रंगमहालाच्या आठ भिती ॥पंढरीच्या वाट    सांडला चुनाकात ।विठ्ठल रुकमीण    गेलीं जोडयानीं पान खात ॥पंढरीची वाट    कशानं झाली वली ?रुकमीण न्हाली    केस वाळवीत गेली ॥
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel