प्रिय मैत्रीण
तुला शब्द सुचेनासे झाले की, तू तलावाच्या किनारी जाऊन बसतेस. खरंच खूप मस्त. तू त्या तलावाला आजवर मला लिहिल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार बनवून ठेवलंस ते फार उत्तम केलस. तो तलाव मग जणू एक मधला रस्ता असावा, ज्याच्या एका टोकाला "तू" तर दुसर्या टोकाला "मी" असेन. माझ्या मनात आपसुकच तुझ्याबद्दल निर्माण होणाऱ्या भावनांना तू तलावाच्या तरंगलहरीत पाहत राहतेस. हे जाणून मी खरच निश्चल झालो. वाट पाहताना एकटे पडणं किंवा एकट असणं; मारूनच टाकतं आपल्याला. ना चेहऱ्यावर कसले भाव उमटू शकतात ना कधी चेहऱ्याला तेज येते. पण तू ज्या पद्धतीने या तुझ्या आजवरच्या प्रवासात एकटेपणावर मात केलीस; ती खरच वाखाणण्याजोगी आहे. आता खरंच वाटायला लागलयं की, एकदा प्रत्यक्ष तुला भेटावंच. पहायचयं प्रत्यक्ष कशी दिसते ती? जिने एक एक दिवस म्हणतं म्हणतं सहा वर्षे खर्च केली माझी वाट पाहण्यात. वाट पाहतोय तुझ्या पुढच्या पत्राची....
तुझा मित्र
किरण पवार