प्रिय मैत्रीण
तू माझ्यावर ठेवलेला विश्वास पूर्णपणे सार्थ करेन मी. आयुष्यात भरपूर घडामोडी घडतील काही वेळ परिस्थिती खूप बिकट असेल पण अशावेळी अश्रुंचे थेंब ढळू न देता स्वतःला खंबीर कर. तुझ्या आईचं उदाहरण डोळ्यांसमोर नेहमी ठेव. तसा तुझा तलावाचा किनारा तुला समाधानाची व्याख्या शिकवतच असेल ना. आयुष्यात कधी कधी मला ना प्रश्न पडतो की, नक्की हा मीच आहे जो पत्रातून तुला व्यक्त होतोय; त्याचंच हे अस्तित्व आहे का? पण का मी तुलाच सतत माझी प्रत्येक गोष्ट सांगतोय? माझ उदास रहाणं, आनंदी असणं, मला राग येणं, माझं असणं... न जाणो हे कित्येक भाव मी तुला पत्रातून व्यक्त करतोय. किंचितसा म्हण अथवा कवडसा पण किती छोट्या धाग्याच्या विश्वासातून आपली घट्ट मैत्री सुरू झाली. योगायोगाने स्वप्नातला विश्व सत्यात उतरल्याचं सार्थक झालं असं मला वाटू लागलयं. माझ मन आसुसलयं आता तुला प्रत्यक्षात पहायला. वाटतं तू समोर यायला हवीस. तुझा आवाज आता स्पष्ट या कानांवर पडावा अन् मी अचंबित होऊन तुला ऐकतच रहावं.... तुझी हरकत नसेल तर भेटतेस का मला? वाट पाहतोय तुझ्या उत्तराची......
तुझा मित्र
किरण पवार