( सायंकाळची वेळ असते. जवळपास सात वाजलेले असतात घरात शीतलचे आई-वडील आणि शीतल असते शितलचं स्वयंपाक करणं चालू असतं.)

 

शीतल:- (चुलीवरचा धूर डोळ्यात जात असतो) आई मला शाळेच्या नाटकात काम करायचयं.

 

शीतलची आई:- बरी हायंस नव्हं. काहीही काय बोलून राहिली. 

 

शीतल:- आई मला आवडतं नाटक करायला.

 

शीतलची आई:- अगं त्यापरीस अभ्यासात डोकं जास्त लाव जरा. 

 

शीतल:- आई एकदा बाबांना विचारून बघ ना.

 

(इतक्यात शीतलचे बाबा स्वयंपाक घरात प्रवेश करतात)

 

बाबा:- अयं, काय बोलणं चाललंय माय-लेकीचं?

 

आई:- काही नाही तिला म्हटलं जरा भाजीला मीठ निट टाक.

 

बाबा:- तुम्ही सांगायची गरज पडली व्हयं. शीतल तर भाजी छानच बनवती की.

 

शीतल:- बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय.

 

बाबा:- विचार की मंग.

 

शीतल:- बाबा शाळेतल्या नाटक स्पर्धेत मला भाग घ्यायचायं.

 

बाबा:- (दुर्लक्षित करून) ते ताट घ्या इकडं... (आई ताट पुढे करते.)

 

शीतल:- बाबा... (तिचं बोलणं अर्धवट तोडल्या जातं)

 

बाबा:- शीतले हे बघं पोरीन अभ्यास करावा फक्त. नाटकबिटक काय कामाच नाय.

 

शीतल:- पण बाबा ऐका तर.... 

 

बाबा:- हे बघं एकदा सांगितलं ना नाही म्हणून तर विषय इथेच संपला.

 

आई:- शीतले जा पाणी भरुन घे. 

 

(शीतल मनातून पूर्णपणे नाराज होते. चेहर्‍यावर तशीच उदासीनता घेऊन ती नळावर पाणी भरायला जाते.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel