असे सुंदर उपदेश चालत. एकदां एका शिष्यानें विचारलें. 'पैगंबर माझी आई मेली. तिच्या आत्म्याच्या शांत्यर्थ मी कोणतें दान देऊं ? कोणतें दान उत्कृष्ट ?'

"पाणी. वाळवंटांत पाण्याची टंचाई. पाण्याचा दुष्काळ. तिच्या नांवानें विहीर खण व तहानलेल्यास पाणी मिळेल असें कर.' मुहंमद म्हणाले.

त्या शिष्यानें त्याप्रमाणें केलें. त्यानें विहीर खणली व म्हणाला, 'ही आईच्या स्मृतीसाठीं. तिच्या आत्म्यास शांति मिळो !'
आणि वाणीची भूतदया मुहंमद पुन:पुन्हां सांगत. 'गोड, मृदु वाणी बोला. फुकाचें गोड बोलायला काय जातें ? गोड, न खुपणारी वाणी म्हणजे मोठी अहिंसा आहे. वाणी गोड असण्याकडे कोणी फारसें लक्ष देत नाहीं. परंतु किती तरी दु:ख यामुळें कमी होईल.'

बस-याचा एक रहिवासी अबुरियान एकदां पैगंबरांच्या दर्शनास आला. त्यानें विचारलें, 'मुहंमद वागण्याचा एखादा मोठा नियम सांग.'

"कोणाविषयीं वाईट बोलूं नकोस.' पैगंबर म्हणाले.

अबुरियान लिहितो, 'त्या दिवसापासून मी कोणालाहि, मग तो स्वतंत्र असो वा गुलाम असो-टाकून बोललों नाहीं.'
इस्लामची शिकवण जीवन सुसंस्कृत, स्निग्ध, सौम्य व प्रेमळ करायला सांगत आहे. 'घरांत येतांना सर्वांना नमस्कार करा. बाहेर जातांनाहि करा. मित्र व परिचित यांनीं केलेला प्रणाम सप्रेम परत करावा. रस्त्यांत कोणी जाणारे त्यांनींहि सलाम केला तर त्यांना परत आपणहि करावा. घोडयावर बसणारानें पायीं चालणारास आधीं सलाम करावा. चालणा-यानें बसणारास करावा. लहान समुदायानें मोठया समुदायास, लहानानें मोठयास.'

असा सुंदर धर्मप्रसार होत होता. जीवनाला नवीन वळणें मुहंमद देत होते. नवीन अचार विचार, सभ्य चालरीत, स्वच्छता, सारें देत होते. या वेळेस मदिनेंत तीन पक्ष होते.

१ मुहाजिरीन व अन्सार यांचा
२ मुनाफिकिनांचा
३ ज्यूंचा

मुहाजिरीन व अन्सार यांची एकजूट होऊन त्यांची दिलजमाई झाली होती. मक्केहून आलेले व त्यांचे ज्यांनीं मदिनेंत स्वागत केलें त्यांचा हा पक्ष होता. या दोहोंत भ्रातृभाव निर्माण झाला होता. ईश्वरासाठीं व त्याच्या पैगंबरासाठीं जास्तींत जास्त करण्याची त्यांची सात्त्वि स्पर्धा चाले. श्रध्दावान् व त्यागी लोकांचा हा जथा होता. बलिदानार्थ सिध्द झालेल्या वीरांचा हा संघ होता.

मुनाफिकीन म्हणजे असंतुष्ट. दुसरा पक्ष असंतुष्टांचा होता. अर्धवट सहानुभूति दाखविणा-यांचा, संधिसाधूंचा हा पक्ष. त्यांचा नेता अब्दुल्ला इब्न-उबय हा होता. मदिनेचें आपण राजा व्हावें, अशी त्याची महत्वाकांक्षा होती. मुहंमदांच्या येण्यामुळें त्याचे सारे बेत फिसकटले. इस्लामचा स्वीकार करायलाही त्याला लोकांनीं भाग पाडलें. त्याने वरपांगी नवधर्माचा स्वीकार केला. परंतु तो व त्याचे लोक केव्हां उलटतील त्याचा नेम नव्हता. धोकेबाज व दगलबाज ते होते. त्यांच्यावर सदैव जागरुकपणें पाळत ठेवण्याची जरुर असे. परंतु मुहंमद आशेनें होते. पुढें हा अब्दुल्ला मरण पावला. त्यामुळें हा मुनाफिकीन पक्ष जरा हतबल झाला.

तिसरा पक्ष ज्यूंचा. हा सर्वांत मोठा धोका होता. या ज्यूंचे कुरेशांजवळ व्यापारधंद्याचे संबंध असत. तसेंच नवीन धर्म जो इस्लाम त्याला विरोध करणा-या अनेक गटांशीं व भागांशीं त्यांचे संबंध होते. मुहंमदांच्या शिकवणीकडे प्रथम ते सहानुभूतीनें बघत. परंतु त्यांचा जो अवतारी पुरुष पुन्हा येणार होता तोच हा, असें मानायला ते तयार नव्हते. मुहंमद एक सामान्य धर्मोपदेशक आहेत. पैगंबर असलेच तरी खालच्या दर्जाचे आहेत, असें ते म्हणत. ज्या औस व खजरज या अरबी जमातींच्या आतिथ्यांमुळें मुहंमदाचें आसन स्थिर होत होतें त्या दोन्ही जमाती ज्यूंना प्रिय नव्हत्या. त्या पूर्वीच्या शत्रु होत्या. त्या वैरस्मृति नष्ट नव्हत्या झाल्या. मुहंमदांस आपल्या बाजूस घेऊन अरबांस जिंकावें, नवराज्य स्थापावें, असें ज्यूंच्या मनांत होतें. म्हणून प्रथम पैगंबराच्या स्वागतसत्कार समारंभांत तेहि अर्धवट उत्साहानें सामील झाले होते. कांही दिवस जरा सबुरीनें, शांतीनें ते राहिले. परंतु महिना झाला असेल नसेल तोंच त्यांनी बंड सुरु केलें ! ज्यूंची उपजतच बंडखोर वृत्ति. त्या वृत्तीमुळेंच त्यांनी स्वत:चे पैगंबर क्रॉसवर चढविले !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel