“जयगोपाळ शेटजी. कधी आलेत?”

“आताच आलो.”

“आधी कळले नाही.”

“मी येथे फोन केला होता. आज सायंकाळी रामाला आमची पूजा. किती रूपयांची पूजा बांधू?”

“ते मी काय सांगू? शोभेल असे करा. देवासाठी द्याल तितके थोडेच आहे. रामराया तुम्हांला हजारो हातांनी देत आहे.”

“इतर काही खूषखबर?”

“खूषखबर आहे. परंतु जरा अडथळा आहे.”

“सारे अडथळे पैशाने दूर करता येतील.”

“एक सुंदर तरूण स्त्री आली आहे.”

“कधी?”

“दोन-तीन महिने झाले.”

“आणि मला कळवले नाहीत?”

“तुम्ही दसरा-दिवाळीच्या गर्दीत होतेत.”

“ती गर्दी सोडूनही आलो असतो. पहिला वास मी घेतला असता.”

“तिचा वास अद्याप कोणी घेतला नाही.”

“काय सांगता !”

“खरे ते सांगतो.”

“अहो, हे शक्य आहे का? तेथे का कोणी फुकट पोशील? रोज दहा-वीस रुपयांची कमाई करावी तेव्हा खायला मिळते.”

“परंतु हे रत्न अपूर्व आहे. ती म्हणाली, “काही दिवस थांबा. मी व्रतस्थ आहे. चैत्र-वैशाखापर्यंत थांबा. त्याच्या आधी मला कोणी स्पर्श कराल तर मी जीव देईन.” कदाचित ती खरेच जीव द्यायची. कारण, पाणी काही निराळे आहे. म्हणून मी थांबा सांगितले आहे. एकदम घाईने काही होणार नाही. अधीर होऊ तर सारेच गमावू. कोणी बडे लोक आले तर तिचे फक्त दर्शन घेतात. पाहून पागल बनतात. ती डोळे मिटून योगिनीप्रमाणे बसते. परंतु किती दिवस बसेल? कंटाळेल. सभोवतालचे वातावरण तिला आत्मरूप करील. तुम्हांला घ्यायचे आहे दर्शन?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel