येत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट खोटी नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू झाला होता. शेकडो अस्पृश्य स्वयंसेवक येणार. सत्याग्रह करणार.

कशासाठी सत्याग्रह? राममंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. रामरायाच्या रथाला हात लावता यावा म्हणून. अस्पृश्य म्हणजे का माणसे नाहीत? त्यांना देवाजवळ जाण्याचा हक्क नसावा? त्यांना सार्वजनिक ठिकाणी इतरांप्रमाणे का जाता येऊ नये? त्यांना स्पृश्यांच्या घरी का जाता येऊ नये? का बैठकीवर बसता येऊ नये? का पानसुपारी इतरांबरोबर खाता येऊ नये?

हा सारा चावटपणा आहे. हा धर्माला कलंक आहे. परंतु आमच्या लोकांच्या अद्याप ध्यानात येत नाही. जोपर्यंत आपण ही गुलामगिरी नष्ट करीत नाही, तोपर्यंत आपले पारतंत्र्य तरी कसे नष्ट होणार? अस्पृश्यांना स्पृश्यांविषयी का आपलेपणा वाटेल? हे अस्पृश्य परकी सत्तेला मिळतील. आणि स्पृश्यांनी केलेल्या जुलमाचा सूड उगवतील.

अस्पृश्य जनतेत सत्याग्रहाचा प्रचार होत होता, तर इकडे सनातनी मंडळींत हा सत्याग्रह हाणून पाडलाच पाहिजे म्हणून प्रचार होऊ लागला. हे धर्मावर संकट आहे. सरकारने धर्मरक्षण केले पाहिजे, आम्ही मरू परंतु अस्पृश्यांना रथाला हात लावू देणार नाही, मंदिरात येऊ देणार नाही अशा घोषणा सनातन्यांच्या सभांतून होऊ लागल्या.

वर्णाश्रम-स्वराज्य-संघाने मोठीच चळवळ सुरू केली. महाराष्ट्र प्रांतिक वर्णाश्रम-स्वराज्य-संघाची मोठी परिषद भरण्याचे ठरू लागले, आणि नाशिकलाच ती परिषद व्हावी असे सारे म्हणू लागले. विचारविनिमय झाला आणि नाशिकच ठरले. परंतु अध्यक्ष कोणाला करायचे? गब्बूशेटांचे नाव अनेकांनी सुचविले. रामभटजींनी त्या नावाचा फार जोराने पुरस्कार केला. ते म्हणाले,

“गब्बूशेटांसारखा मनुष्य मिळणे कठीण. किती उदार, किती धर्मशील ! दर महिन्याला नाशिकला येतात. रामरायाचे दर्शन घेतात. नवीन अलंकार प्रभूच्या अंगावर घालतात. फार थोर मनुष्य ! हजारांनी देणग्या त्यांनी दिल्या आहेत. स्वत:चा प्राणही देतील. ते प्रसिध्दीपराड्:मुख आहेत. परंतु गब्बूशेट म्हणजे झाकले माणिक आहे. अस्पृश्य सत्याग्रह करणार हे ऐकून त्यांच्या पायाची आग मस्तकाला गेली आहे. “या गोष्टीला आळा पडलाच पाहिजे. प्रतिकार झालाच पाहिजे. प्रचंड चळवळ केली पाहिजे” असे ते म्हणाले. ते अध्यक्ष होतील. आपल्या चळवळीस भरपूर मदतही देतील. चळवळ म्हटली म्हणजे पैसे हवेत, पैशांशिवाय काही चालत नाही.”

शेवटी गब्बूशेट अध्यक्ष ठरले. त्यांना तसे कळविण्यात आले. परिषदेची तयारी जोराने सुरू झाली. भव्य मंडळ घालण्यात आला. विद्युद्यीपांची व्यवस्था झाली. विद्युत्पंखेही होते. आणि स्वयंसेवकपथके तयार झाली. त्यांना भगव्या टोप्या देण्यात आल्या. नाशिक शहर गजबजून गेले. तिकडे हरिजनवस्तीतही रोज सभा होत होत्या. त्यांनीही प्रांतिक सत्याग्रह परिषद नाशिकला भरविण्याचे ठरविले. इकडे सनातनींची सभा; तिकडे अस्पृश्यांची. दोन्ही बाजूंस तयारी होत होती.

गब्बूशेट आज मुंबईहून येणार होते. त्यांची मोठी मिरवणूक निघायची होती. त्यांच्या बंगल्यापासून तो अधिवेशनस्थानापर्यंत ही मिरवणूक होती. शेटजींच्या बंगल्याजवळ ती पाहा गर्दी. ती पाहा धार्मिक पागोटी ! गंधे, भस्मे, यांची गर्दी आहे. शेटजींची मोटार आली. “सनातन धर्म की जय” म्हणून आरोळी झाली. शेटजींस हार-तुरे घालण्यात आले. एका शृंगारलेल्या मोटारीत त्यांना बसवण्यात आले. बँड वाजू लागला. सनातनी मंडळी निघाली. वाटेत गब्बूशेटांच्या गळयात हार पडत होते. नमस्कार करून त्यांचे श्रीमंत हात दुखू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel