१४३. सुरेचे परिणाम, सुरापानाचा पूर्वेतिहास व परिणाम.

(कुंभजातक नं. ५१२)

प्राचीनकाळीं काशीराष्ट्रांत सुर नावाचा एक वनचर रहात असे. अरण्यांतून नानाविध पदार्थ गोळा करून तो आपली उपजीविका करी. हिमालयाच्या पायथ्यावरील अरण्यांत एक मोठा वृक्ष होता. एक पुरुष उंचीवर त्या झाडाला तीन मोठाल्या शाखा फुटल्या होत्या. व त्यांच्यामध्यें एक मोठाल्या मातीच्या भांड्याएवढी पोकळ जागा होती. जवळपास आवळीचीं, हरड्याचीं वगैरे पुष्कळ झाडें होतीं व त्या वृक्षांवर रहाणारे पक्षी तेथें आणून तें खात असत. त्यांपैकीं कांहीं त्या वृक्षाच्या वळचणींत साठलेल्या पावसाच्या पाण्यांत पडून रहात. हिमालयावर आपोआप उगवलेल्या भाताच्या शेतांतून कणसें आणून पोपट येथें बसून खात असत व त्यांतील कांहीं तांदुळाचे दाणे त्या पाण्यांत पडत. उन्हाळा आल्यावर तें पाणी संतप्‍त होऊन त्यापासून एक प्रकारचा मादक पदार्थ तयार होत असे. आणि झाडावरील नानाविध पक्षी तो पिऊन कांहीवेळ बेफाम होऊन झाडाखालीं पडून रहात असत.

एके दिवशीं सुर अरण्यांत संचार करीत असतां त्या वृक्षापाशीं आला आणि त्यानें हा सर्व प्रकार पाहिला. प्रथमतः झाडाच्या वळचणींत साठलेलें पाणी विषारी असावें असा त्याला संशय आला. परंतु कांहीं वेळानें तें पिऊन निश्चेष्टित पडलेले पक्षी उठून नाचूं बागडूं लागले. व एकमेकांशीं भांडू लागले. तें पाहून सुराला त्या पदार्थांत काय गुण आहे हें पहाण्याची उत्कट इच्छा झाली व त्यानें भीत भीत त्यांतील पेलाभर पाणी प्राशन केलें. त्याबरोबर त्याला एकप्रकारची मजेदार गुंगी आली व थोड्या वेळानें अर्धवट ताळ्यावर आल्यावर मांस खाण्याची फार इच्छा झाली. तेथें बेशुद्ध पडलेल्या पक्ष्यांपैकी कांहींना मारून व आपल्या चकमकीनें आग पाखडून त्या आगींत पक्ष्यांना भाजून त्यानें यथेच्छ खाल्लें. व तो नाचूं उडूं लागला.

त्याच अरण्यांत वरुण नावाचा एक तपस्वी रहात असे. सुराची आणि त्याची चांगली मैत्री होती. त्याला सुरानें घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि द्रोणांतून त्या वळचणींतून थोडें पाणी नेऊन तें त्याला पाजलें व आपणहि प्याला. त्यानंतर दोघांनीं नाचून बागडून मोठा तमाशा केला. वरुण ॠषीच्या अग्निहोत्रांत भाजून तयार केलेलें मांस यथेच्छ खाल्लें. त्या दिवसापासून त्या दोघांनाहि झाडाच्या वळचणींतील पाण्याची इतकी गोडी लागली कीं त्यांनीं तें थोडक्याच दिवसांत आटवून टाकलें. आतां पुढें काय करावें अशी चिंता उपस्थित झाली. वरुण तापसी मोठा हुषार होता. त्यानें त्या झाडाच्या वळचणींत साचलेले पदार्थ नीट तपासून पाहिले व ते पदार्थ स्वतः गोळा करून उन्हाच्या ऐवजीं आगीची आच देऊन त्यांच्यापासून निष्पन्न होणारा मादक पदार्थ स्वतः तयार केला. या नवीन पदार्थांत पूर्वीच्या पदार्थाहून त्याला अधिक गुण आहे असें दिसून आलें आणि निरनिराळे प्रयोग करून त्यांनीं शोधून काढलेल्या या नवीन पेयांत बरीच सुधारणा केली.

इतकें सर्व झाल्यावर वरुण सुराला म्हणाला, ''भो मित्रा, आम्ही मोठ्या प्रयत्‍नानें हें नवीन पेय शोधून काढलें आहे. तें जर लोकांना कळूं न देतां आमच्या बरोबरच नष्ट झालें तर त्यापासून जगाची किती हानि होईल बरें ! क्षणभर मिळणार्‍या ब्रह्मानंद सुखाला किती लोक मुकतील ? तेव्हां आम्ही मोठमोठाल्या शहरांत जाऊन आमचा हा शोध तेथील नागरिकांना सांगूं व त्यापासून त्यांचें व आमचें अनंत कल्याण करूं.''

सुरालाहि अरण्यवासाचा बराच कंटाळा आला होता. तेव्हां त्याला आपल्या मित्राचें म्हणणें फार पसंत पडलें. व ते दोघे एका हिमालयाच्या पायथ्यापासून जवळ अंतरावर असलेल्या शहरांत आले आणि वेळूच्या नळकांड्यांतून बरोबर आणलेलें पेय त्यांनीं तेथील राजाला नजर केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel