बुद्धभगवान् कांही काल राजगृहांत राहून तेथून धर्मोपदेश करीत करीत कपिलवस्तु नगरीस गेले. तेथें ते निग्रोधारम नांवाच्या विहारांत राहत होते. एके दिवशीं भिक्षेसाठीं कपिलवस्तु नगरींत त्यांनी प्रवेश केला, व ते फिरत फिरत शुद्धोदन राजाच्या घरीं गेले. तेथें त्यांना बसण्यासाठीं मांडलेल्या आसनावर ते बसले असतां राहुलाच्या आईनें (बोधिसत्वाच्या पत्नीनें) त्यांस पाहिलें, व ती राहूलकुमारास ह्मणाली “बाळ हा पहा तुझा बाप त्याच्या जवळ जाऊन तुझा हिस्सा (दायभाग) माग।” हे आईचे शब्द ऐकून राहुल बुद्धासमोर जाऊन उभा राहिला. बुद्ध भगवान् कांहीं वेळानें आसना वरून उठून चालते झाले. राहुलहि त्यांच्या मागोमाग ‘ मला माझा हिस्सा द्या’ असें ह्मणत चालला. विहारांत गेल्यावर बुद्ध भगवंतांनीं सरिपुत्राला बोलावून-पैतृक धन देण्याच्या उद्देशानें राहुलकुमारास संन्यास देण्यास सांगितलें. राहुलाच्या वयास २० वर्षें झाली नव्हतीं ह्मणून त्यास श्रामणेर करण्यांत आलें. तेव्हांपासून श्रामणेर करण्याची पद्धत सुरू झाली.

श्रामणेरानें स्वतंत्र राहतां कामा नये. भिक्षूंच्या आश्रयानेंच राहिलें पाहिजे. त्याला दीक्षा देते वेळीं त्याचें मुंडन करितात; नंतर काषाय वस्त्रें घेऊन तेथें जमलेल्या भिक्षूंला नमस्कार करून तो पुढील वाक्य त्रिवार उच्चारितो.

“सब्बदुक्खनिस्सरणनिब्बणसच्छिकरणत्थं इदं कासावं गहेत्वा पब्बाजेथ मं भन्ते अनुकंपं उपादाय.”

(सर्व दु:खापासून मुक्त अशा निर्वाणाचा साक्षात्कार करण्याकरितां हीं काषायवस्त्रें घेऊन अनुकंपा करून मला संन्यास द्या.)

नंतर त्यांतील एक भिक्षु त्याला ‘बुध्दं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि,’ हीं वाक्यें त्रिवार उच्चारावयास लावतो, व त्यानें पाळावयाचे दहा नियम त्यास शिकवितो.(१) प्राणघातापासून विरत होणें. (२) चोरीपासून विरत होणें. (३) ब्रह्मचर्य धारण करणें. (४) खोटें न बोलणें. (५) सुरादि मादक पदार्थांचें सेवन व करणें. (६) माध्याह्नकालापूर्वीं जेवणें. (७) नृत्यगीतादि कामविकार उत्पन्न होणार्‍या गोष्टी न पाहणें. (८) मालागंधादि (चैनीच्या) पदार्थांचें धारण न करणें. (९) उंच आणि मोठ्या शय्येवर न निजणें. व (१०) सोनें आणि रूपें यांचा स्वीकार न करणे. हे दहा नियम श्रमणेरानें पाळले पाहिजेत.

भिक्षुसंघानें महिन्यांतून पूर्णिमा आणि कृष्णचतुर्दशी या दोन दिवशीं एकत्र जमून उपोसथकर्म केलें पाहिजे. त्या दिवशीं भिक्षूंच्या निषिद्धशीलांत समाविष्ट झालेल्या २२७ नियमांची यादी सर्व संघासमोर वाचली जाते. त्यापैकीं कोणत्याहि भिक्षूकडून एकाद्या नियमाविरूद्ध आचरण झालें असेल तर तो दोष त्यानें तेथल्या तेथें कबूल केला पाहिजे, व त्यास जें प्रायश्चित्त सांगितलें असेल तें केलें पाहिजे. ह्या २२७ नियमांला प्रातिमोक्ष असें ह्मणतात, व त्यांच्या यादीच्या वाचनास प्रातिमोक्षोद्देश असें ह्मणतात.

बुद्धाच्या हयातींत आणि बुद्धानंतर कांही वर्षें भिक्षुसंघ पावसाळ्याचे चार महिने एके ठिकाणीं राहत असे; व बाकी आठ महिने चोहेंकडे उपदेश करीत फिरत असे. ही स्थिति अशोककाळाप्रर्यंत टिकली असावी. अशोकाच्या वेळीं जरी पुष्कळ भिक्षू धर्मोपदेशासाठीं इतर देशांत गेले, तरी एकंदरींत भिक्षुसंघाला स्थायिक स्वरूप येऊं लागलें. त्याच्या योगें बौद्ध वाङ्मयाची बरीच वाढ झाली. परंतु भिक्षुसंघाचा पूर्वींचा जोम कायम राहिला नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel