त्या भिक्षुसंघांत वृद्धपणीं भिक्षु झालेला २सुभद्र (२- बुद्धांचा शेवटचा शिष्य सुभद्र निराळा, आणि हा निराळा.) नांवाचा एक भिक्षु होता, तो ह्मणालाः-“सखे हो, शोक करूं नका. त्या महाश्रमणाच्या (बुद्धाच्या) तडाक्यांतून आह्मी मुक्त झालों आहों. अमुक करावें, आणि अमुक करूं नये. अशा प्रकारें तो आह्मांस उपद्रव करी. परंतु आतां आह्मी आमच्या इच्छेप्रमाणें वागूं.” हें त्या भिक्षूचें भाषण ऐकून महाकाश्यप भिक्षुसंघास ह्मणालाः-“सखे हो, आता आपण १धर्म आणि २विनय यांचा संग्रह करूं. कारण त्यांच्या अभावीं अधर्मवादी(सुभद्रासारखे) भिक्षू बलवान् होतील, आणि धर्मवादी भिक्षू दुर्बल होतील.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- धर्म = बुध्दोपदेश. २- विनय = भिक्षुसंघाचे नियम.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तेव्हां भिक्षूंनीं धर्म व विनय यांचा संग्रह करण्याला समर्थ असे भिक्षू निवडण्यास महाकाश्यपास विनंति केली. तिला अनुसरून महाकाश्यपानें ४९९ भिक्षू निवडले. ते सर्व अर्हत्पदाला पावलेले होते. त्या वेळीं आयुष्मान् आनंद अर्हत्पदाला पावला नव्हता. तथापि भिक्षू महाकाश्यपाला ह्मणालेः- भदन्त हा आयुष्मान् आनंद जरी अर्हत् नाहीं तरी तो छंद, द्वेष, भय आणि मोह, यांच्या योगें कुमार्गानें कधींहि जाणार नाही. आणखी यानें भगवंतांपासून धर्मविनयाचें पुष्कळ अध्ययन केलें आहे. ह्मणून आपण यालाहि निवडावें अशी आमची विनंति आहे.” महाकाश्यपानें भिक्षूंच्या विनंतीस मान देऊन आनंदालाहि निवडलें. ह्या सर्व निवडक भिक्षूंनीं त्या चातुर्मासांत राजगगृहांत राहण्याचा बेत केला,व त्याप्रमाणें ते सर्व राजगृहास गेले. तेथें त्यांनीं धर्मविनयाचा संग्रह केला. ज्या दिवसीं धर्म संग्रहाला आरंभ झाल त्याच्या पूर्व रात्रींच आनंदानें अर्हत्पद मिळविलें. ह्या संघाचे महाकाश्यप अध्यक्ष होते. त्यांनीं उपालीस विनय विचारला, व आनंदास धर्म विचारला. त्या दोघांनीं आपल्या स्मरणांतील सर्व गोष्टी सांगितल्या. सर्वांच्या संमतीनें धर्म आणि विनय ह्यांच्या रूपानें त्यांचा संग्रह करण्यांत आला. याप्रमाणें पहिल्या संगीतीचें (परिषदेचें) काम संपलें.

बुद्धपरिनिर्वाणाला १०० वर्षे झाल्यावर वैशाली नगरींतील वालीकाराम नांवाच्या विहारांत दुसरी संगीति (परिषद) झाली. वैशालींतील वज्जिपुत्तक भिक्षू विनयाविरूद्ध १० गोष्टी प्रतिपादूं लागले. त्यांतील मुख्य गोष्ट ह्मटली ह्मणजे भिक्षूंनी सोनें रूपें घेणें योग्य आहे, ही होय. एका उपोसथाच्या दिवसीं त्या भिक्षूंनीं भिक्षूसंघाच्या बसण्याच्या जागीं एक पाण्याने भरलेली कांशाची थाली ठेवली, आणि उपासकांना त्यांनीं संघाला पैशाच्या रूपानें काहींना कांही मदत करण्यास उपदेश केला. तेथें काकंडकपुत्र यश नांवाचा भिक्षु होता त्याला हें त्या भिक्षूंचें कृत्य आवडलें नाहीं त्यानें तेथल्या तेथेंच ह्या कृत्याचा निषेध केला परंतु त्याच्या निषेधाकडे लक्ष न देतां उपासकांनीं संघाला बरेच पैसे दिले. दुसर्‍या दिवसीं त्या भिक्षूंनीं त्या पैशांचे वांटे करून यशाचा वांटा यशास दिला. परंतु यशानें तो घेतला नाहीं. इतकेंच नव्हे तर त्यानें वैशाली नगरींत जाऊन उपासकगणास एकत्र करून बुद्धोपदिष्ट धर्माप्रमाणें भिक्षूंनीं पैसा घेणें गैरशिस्त असें त्यांस समजावून सांगितलें. हें वर्तमान त्या भिक्षूंस समजल्यावर त्यांनीं यशास बहिष्कार घालण्याचा बेत केला. यशास वैशालींत बहुमत मिळण्याचा संभव नव्हता. ह्मणून तो एकदम तेथून कौशांबी नगरीस गेला, व तेथून त्यानें पावा नगरींतील आणि अवंतीकडील भिक्षूंपाशीं मनुष्य पाठवून त्यांना हें वर्तमान कळविलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel