“दुर्बळ लोक त्याचा मत्सर करितात; कामक्रोधादि अभ्यंतर व अग्नि चोर इत्यादि बाह्य शत्रू त्याला तुडवितात; आणि त्यामुळें फुटक्या होडींत पाणी शिरतें त्याप्रमाणें दु:ख त्याच्या अंत:करणांत शिरतें.”

भवतृष्णा म्हणजे जीवितृष्णा, इजमुळेंहि जगाच्या दु:खांत मोठी भर पडली आहे. शंभरवर्षे आयुष्य प्राप्त झालें. असतांहि मनुष्याची तृप्ति होत नाहीं. मेल्यावरहि सुख मिळावें आत्मा अमर व्हावा अशी त्याची इच्छा असते. तीस अनुसरुन तो व्रतांचें आणि उपवासाचें आचरण करितो यज्ञयाग करुन प्राण्यांला दु:ख देण्यास तयार होतो, व येणेंकरुन आपल्या आणि इतर प्राण्यांच्या दु:खांत भर घालतो.

विभवतृष्णा म्हणजे विनाशतृष्णा, जगांतून नाहींसें होऊन जाण्याची तृष्णा. ह्या तृष्णेला बळी पडलेले लोक आपल्याहि फायद्याकडे पाहत नाहींत, आणि दुसर्‍याच्याहि फायद्याकडे पाहत नाहीं. एवढ्यातेवढ्यासाठीं आत्महत्या करण्यास ते तयार असतात. आपण मेलों म्हणजे सारें जग संपलें असें त्यांचें म्हणणें असतें. ज्याला आपल्या जीविताची परवा नाहीं, त्याला दुसर्‍याच्या जीविताची कोठून असणार? दुसर्‍या प्राण्यांस कितीहि उपद्रव झाला; तरी त्यापासून अशा लोकांच्या अंत:करणांत दयेचा उदय होणें शक्य नाहीं. ह्यांचे जीवित नीरस झालेलें असतें. यांना धार्मिक सुखाची गोडी मुळींच माहीत नसते. एकंदरीत अशा निर्दयपणानें आणि नीरसपणानें इतरांचें आणि आपलें दु:ख ते वाढवित असतात.

दु:खनिरोध:- दु:खनिरोध म्हणजे दु:खाचें आकलन, दु:खाचा नाश. हा तृष्णानाशानेंच करितां येतो. वर सांगितलेल्या तिन्ही तृष्णांचा नाश केला, तरच दु:खाचा नाश होणार आहे. इतर उपाय निरुपयोगी आहेत. कामवासनेची तृप्ति करण्याच्या प्रयत्नानें दु:खाचा अंत होणार नाही; व्रत, उपवास, यज्ञ, याग इत्यादिकांचें आचरण करुन स्वर्गवासाची प्राप्ति करुन घेतली, तरी दु:खाचा अंत होणार नाहीं; किंवा आपण जगांतून नाहींसे झालों तरी दु:खाचा अंत होणार नाहीं.

दु:खनिरोधगामिनी प्रतिपत् (मार्ग):- तृष्णानाशानें दु:खनाश होतो हें समजले. पण तृष्णनाशाला कांही उपाय आहे की नाही? अंगांत शिरलेल्या शल्यापासून वेदना होतात, हें समजलें, परंतु ते शल्य सुरक्षितपणें काढण्याला जर उपाय माहीत नाहीं, तर नुसतें एवढें समजण्यापासून काय फायदा? म्हणून दु:खाचा निरोध करण्याला उपाय ह्या चवथ्या आर्यसत्यांत सांगितला आहे. हा उपाय ह्मटला म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय.

१.सम्यक् दृष्टि:- दु:खाचें ज्ञान, दु:खसमुदयाचें ज्ञान, दु:ख-निरोधाचें ज्ञान, आणि दु:खनिरोधगामी मार्गाचें ज्ञान, याला सम्यक् दृष्टि असें म्हणतात. जग अनित्य म्हणजे बदलणारें आहे. प्रपंच दु:खमय आहे, आणि आत्मा म्हणून अविनाशी आणि अविकारी असा पदार्थ नसून कर्मानुसार बदलणारा आहे, अशा यथार्थ ज्ञानाला सम्यक् दृष्टि असें म्हटलें असतां चालेल. कारण अशा ज्ञानानेंच चार आर्यसत्यांचें ज्ञान होणें शक्य आहे.

२.सम्यक् संकल्प:- नैष्कर्म्यसंकल्प म्हणजे एकांतवाससुखाची आवड, अव्यापादसंकल्प म्हणजे प्राणिमात्रावर शुद्ध प्रेम, आणि अविहिंसासंकल्प म्हणजे दुसर्‍यास किंवा आपणास त्रास होऊं नये अशी इच्छा. या तीन संकल्पांला सम्यक् संकल्प म्हणतात.

३.सम्यक् वाचा:- खोटें न बोलणें, चहाडी न करणें, कठोर शब्द न उच्चारणें, आणि वृथा भाषण न करणें ह्यांला सम्यक् वाचा म्हणतात.

४.सम्यक् कर्मान्त (कर्म)
:- प्राणघात न करणें, चोरी न करणें व परदारगमन न करणें, यांला सम्यक् कर्मान्त म्हणतात
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel