घोड्यांचा लढाईत उपयोग

इ. स. पूर्वी दोन हजार वर्षे बाबिलोनियात घोड्याचा उपयोग मुळीच माहीत नव्हता. रथाला बैल किंवा गाढवे जुंपीत असत; आणि ते लोक घोड्यांना जंगली गाढवे म्हणत. बाबिलोनियाच्या उत्तरेस डोंगरी प्रदेशात राहणारे केशी लोक प्रथमत: माल वाहून नेण्याच्या कामी घोड्यांचा उपयोग करू लागले. या जंगली गाढवांना लगामात आणून आणि त्यांच्यावर स्वार होऊन धान्य गोळा करण्याच्या वेळी ते बाबिलोनियात येत; आणि तेथील शेतक र्‍यांना मदत करून मजुरीबद्दल मिळालेले धान्य आपल्या घोड्यांवरून वाहून नेत. केशी लोकांना युद्धकला मुळीच माहीत नव्हती. ती कला ते बाबिलोनियन लोकांपासून शिकले, आणि त्यांनी प्रथमत: लढाईत घोड्याचा उपयोग केला. (L. W. King : A History of Babylon, (१९१५), p. १२५. )

आपल्या घोडदळाच्या बळावर केशींच्या गदश नावाच्या राजाने इ. स. पूर्वी १७६० या वर्षी बाबिलोनियात सार्वभौम राज्य स्थापन केले. आणि त्यानंतर त्याच्या वंशजांची परंपरा सुरू राहिली. (L. w. King : A History of Babylon, (१९१५), p. २१४) मुद्द्याची गोष्ट ही की, इ. स. पूर्व अठराशे वर्षांमागे घोड्याचा लढाईत उपयोग केला गेल्याचा दाखला कोठेच सापडत नाही; आणि वेदांत तर जिकडे तिकडे घोड्याचे महत्त्व वर्णिले असून केशींचा आणि घोड्यांचा निकट संबंध दाखविलेला आहे. यावरून आर्यांची सप्तसिंधूवरची स्वारी इ. स. पूर्वी सतराशे वर्षापलीकडे जाऊ शकत नाही, हे स्पष्ट होते.

दास

आर्य येण्यापूर्वी सप्तसिंधुप्रदेशात (सिंध आणि पंजाब प्रांतात) दासांचे राज्य होते. दास या शब्दाचा अर्थ गुलाम असा होऊन बसला आहे. परंतु वेदांत दासू आणि दाश् या दोन धातूंचा प्रयोग `देणे’ या अर्थी होतो; आणि तसाच तो अलीकडच्या कोशातही देण्यात आला आहे. म्हणजे दास् शब्दाचा मूळचा अर्थ दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे. आवेस्तांतील फर्वदीन यस्तमध्ये या दास देशातील पितरांची पूजा आहे. त्यात त्यांना `दाहि’ म्हटले आहे. (We worship the Fravashis of the holy men in the Dahi Countries.).

प्राचीन पर्शियन भाषेत संस्कृत स चा उच्चार ह होत असे. उदाहरणार्थ, सप्तसिंधूला आवेस्तात हप्तहिंदू म्हटले आहे. त्यालाच अनुसरून दासी किंवा दास याचे रूपांतर दाहि असे झाले आहे.

आर्य

आर्य हा एक शब्द ऋ धातुपासून  साधला आहे; आणि निरनिराळ्या गणात जे ऋ धातु सापडतात ते बहुतेक गत्यर्थ आहेत. म्हणजे आर्य या शब्दाचा अर्थ फिरस्ते असा होतो. आर्यांना घरेदारे करून राहणे आवडत नसे असे दिसते. मोगल लोक जसे तंबूमध्ये राहत असत. तसेच आर्य लोक तंबूतून किंवा मंडप घालून राहत असावेत. एका बाबतीत त्यांची ही परंपरा अद्यापि कायम राहिली आहे. बाबिलोनियात यज्ञयागाच्या जागा म्हटल्या म्हणजे मोठमोठ्या मंदिरांची आवारे असत. आणि हरप्पा व महिंजो-दारो या दोन ठिकाणी जे प्राचीन नगरावशेष सापडले आहेत, त्यांत देखील दाहि लोकांची मंदिरे यज्ञयागाच्या जागा असत असे तज्ज्ञांना वाटते. ही परंपरा आर्यांनी मोडून टाकली. यज्ञयाग करावयाचा म्हटला म्हणजे तो मंडपातच केला पाहिजे अशी त्यांनी वहिवाट पाडली. आर्यांचे वंशज तंबूतली राहणी सोडून कालक्रमाने घरे बांधून राहू लागले. पण यज्ञाला मंडपच पाहिजे ही प्रथा अद्यापि टिकून राहिली आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel