गणराज्यांची व्यवस्था

ही राज्ये एका काळी गणसत्ताक किंवा महाजनसत्ताक होती, असे वर म्हटलेच आहे. वज्जी, मल्ल किंवा शाक्य यांच्या संबंधाने जी माहिती त्रिपिटक ग्रंथांत सापडते, तिजवरून असे दिसून येते की, या राज्यांतील गावोगावच्या पुढार्‍यांना राजा म्हणत. हे सर्व राजे एकत्र जमून आपल्यापैकी एखाद्याला अध्यक्ष निवडीत. त्याची मुदत तहाह्यात किंवा काही कालपर्यंत असे, यासंबंधी काहीच माहिती मिळत नाही. वज्जींमध्ये कोणी तरी महाराजा होता असेही दिसून येत नाही. वज्जींच्या सेनापतीचा उल्लेख आहे, पण महाराजाचा नाही; कदाचित तेवढ्या वेळेपुरता अध्यक्ष निवडून ते काम चालवीत असतील. या गणराज्यात न्यायदानासंबंधाने आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी यासंबंधाने काही कायदे ठरलेले असत आणि त्यांना अनुसरूनच हे गणराजे आपले राज्ये चालवीत.

गणराज्यांच्या नाशाची कारणे

सोळा जनपदांच्या गणराजांचा नाश होऊन बहुतेक राज्यात महाराजसत्ता स्थापन झाली होती. आणि मल्लांची लहानशी दोन व वज्जींचे बलाढ्य एक मिळून जी तीन गणसत्ताक स्वतंत्र राज्ये बाकी राहिली, ती पण एकसत्ताक राज्यपद्धतीच्या आहारी जाण्याच्या बेतांत होती. याची कारणे काय झाली असावी? माझ्या मते गणराजांचा ऐषआराम आणि ब्राह्मणांचे राजकारणात वर्चस्व, ही या क्रांतीची प्रमुख कारणे असली पाहिजेत.

गणराजांना कोणी निवडून देत नसे. बापाचा मुलगा त्याच्या मागोमाग राजा होत असे. वंशपरंपरेने हा अधिकार भोगावयास मिळाल्यामुळे हे चैन आणि बेजबाबदार होणे अगदी साहजिकच होते. वर जे ललित विस्तरातून वज्जीचे वर्णन दिले आहे, त्याचा विचार केला असता, ते गणराजे जरी प्रबळ होते, तरी परस्परांविषयी त्यांचा आदर नसून  प्रत्येक जण आपणालाच राजा समजत होता असे दिसते. त्यामुळे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अजातशत्रूला वज्जीच्या गणराजांत फूट पाडून ते राज्य अनायासे काबीज करता आले.

सामान्य जनतेचा या गणराज्यांना पाठिंबा असणे शक्य नव्हते. जो तो राजा आपल्या परीने लोकांवर जुलूम करू लागला, तर त्याला आळा घालण्याचे सामर्थ्य लोकांत किंवा इतर राजांत नव्हते. त्यापेक्षा हे सर्व राजे नष्ट होऊन एकच सर्वाधिकारी राजा असणे सामान्य माणसांच्या दृष्टीने अधिक सोईवार होते. महाराजा आपल्या अधिकार्‍यांवर जोरजुलूम करी. राजधानीच्या आजूबाजूला एखादी सुस्वरूप तरुणी सापडली, तर तिला आपल्या झनानखान्यात घाली. असले काही थोडेबहुत जुलूमाचे प्रकार त्याच्याकडून घडले; तरी ते गणराजाइतके असणे शक्यच नव्हते. गणराजे गावोगावी असल्याकारणाने त्यांचा जुलूम सुरू झाला, तर त्यातून बहुजनांपैकी कोणीही सुटू शकत नव्हता. कराच्या आणि बेगारीच्या रुपाने हे राजे सर्वांनाच त्रास देत असावेत. एकसत्ताक महाराजाला अशा रीतीने शेतकर्‍यांना सतावण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. त्याच्या ऐषआरामापुरता पैसा त्याला नियमित कराच्या रूपाने सहज वसूल करता येत होता. तेव्हा सामान्य लोकांना, ‘दगडांपेक्षा वीट मऊ’ या न्यायाने एकसत्ताक राज्यपद्धतीच बरी वाटली असल्यास नवल नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल