मारयुद्ध

याप्रसंगी बोधिसत्त्वाशी माराने युद्ध केल्याचे काव्यात्मक वर्णन बुद्धचरितादिक ग्रंथातून आढळते. त्याचा उगम सुत्तनिपातातील पधानसुत्तात आहे. त्या सुत्ताचे भाषांतर येथे देतो –

१. नैरंजन नदीच्या काठी तपश्चर्येला आरंभ करून निर्वाणप्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने मी ध्यान करीत असता –
२. मार करुणस्वर काढून माझ्याजवळ आला. (तो म्हणाला) तू कृश आणि दुर्बणं आहेस, मरण तुझ्याजवळ आहे.
३. हजार हिश्शांनी तू मरणार, एक हिस्सा तुझे जीवित बाकी आहे. अरे भल्या माणसा तू जग. जगणे उत्तम आहे. जगलास तर पुण्यकर्मे करशील.
४. ब्रह्मचर्याने राहिलास आणि अग्निहोत्राची पूजा केलीस तर पुष्कळ पुण्याचा साठा होईल, हा निर्वाणाचा उद्योग कशाला पाहिजे?
५. निर्वाणाचा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम आहे. ह्या गाथा बोलून मार बुद्धापाशी उभा राहिला.
६. असे बोलणार्‍या त्या माराला भगवान म्हणाला, हे निष्काळजी मनुष्याच्या मित्रा, पाप्या, तू इथे का आलास (हे मी जाणतो).
७. तशा पुण्याची मला बिलकुल गरज नाही. ज्याला पुण्याची गरज असेल त्याला माराने ह्या गोष्टी सांगाव्या.
८. मला श्रद्धा आहे, वीर्य आहे आणि प्रज्ञा पण आहे. येणेप्रमाणे मी माझ्या ध्येयावर चित्त ठेवले असता मला जगण्याबद्दल का उपदेश करतोस?
९. नदीचा ओघ देखील हा वारा सुकवू शकेल. परंतु ध्येयावर चित्त ठेवणार्‍याचे (प्रेषितात्म्याचे) माझे रक्त तो सुकवू शकणार नाही.
१०. (पण माझ्या प्रयत्नाने) रक्त शोषित झाले तर त्याबरोबर माझे पित्त आणि श्लेष्म हे विकार देखील आटतात, आणि माझे मास क्षीण झाले असता चित्त अधिकतर प्रसन्न होऊन स्मृति, प्रज्ञा व समाधि उत्तरोत्तर वाढतात.
११. याप्रमाणे राहून उत्तम सुखाचा लाभ झाला असता माझे चित्त कामोपभोगाकडे वळत नाही. ही माझी आत्मशुद्धि पहा.
१२. (हे मारा), कामोपभोग ही तुझी पहिली सेना आहे. अरति ही दुसरी भूक आणि तहान ही तिसरी, आणि तृष्णा ही तुझी चौथी सेना आहे.
१३. पाचवी, आळस, सहावी भीति, सातवी कुशंका, आठवी अभिमान (किंवा गर्व).
१४. लाभ, सत्कार, पूजा (ही नववी) आणि खोट्या मार्गाने मिळविलेला कीर्ति (ही दहावी), जिच्या योगे मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करतो.
१५. हे काळ्या नमुचि, (लोकांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. भ्याड मनुष्य तिला जिंकू शकत नाही. जो तिला जिंकतो, त्यालाच सुख लाभते.
१६. हे मी माझ्या शिरावर मुंज गवत* धारण करीत आहे. माझा पराजय झाला, तर माझे जिणे व्यर्थ, पराजय पावून जगण्यापेक्षा संग्रामात मरण आलेले बरे.
१७. कित्येक श्रमण ब्राह्मण तुझ्या सेनेत मिसळून गेल्यामुळे प्रकाशात नाहीत आणि ज्या मार्गाने साधुपुरुष जातात तो मार्ग त्यांना माहीत नाही.
१८. चारी बाजूंना मारसेना दिसते, आणि मार आपल्या वाहनासह सज्ज झाला आहे. त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी मी पुढे सरसावतो. का की त्याने मला स्थानभ्रष्ट करू नये.
१९. देव आणि मनुष्य तुझ्या सेनेपुढे उभे राहू शकत नाही. त्या तुझ्या सेनेचा, दगडाने मतीचे भांडे फोडून टाकावे त्याप्रमाणे मी माझ्या प्रज्ञेने पराभव करून टाकतो.
२०. संकल्प ताब्यात ठेवून आणि स्मृति जागृत करून अनेक श्रावकांना उपदेश करीत मी देशोदेशी संचार करीत.
२१. (श्रावक) माझ्या उपदेशाप्रमाणे सावधपणे चालून आणि आपल्या ध्येयावर चित ठेवून तुझ्या इच्छेविरुद्ध अशा पदाला जातील की जेथे शोक करण्याचा प्रसंग येत नाही.
२२. (मार म्हणाला), सात वर्षेपर्यंत भगवंताच्या मागोमाग हिंडलो, परंतु स्मृतिमान बुद्धाचे काहीच वर्म सापडले नाही.
२३. तेथे काही मऊ पदार्थ सापडेल, काही गोड पदार्थ मिळेल, अशा आशेने कावळा मेदवर्ण पाषाणाजवळ आला.
२४. परंतु यात लाभ न दिसून आल्यामुळे कावळा तेथून निघून गेला. त्या कावळ्याप्रमाणे मी देखील गोतमापासून निवृत्त होऊन निघून जातो.
२५. याप्रमाणे शोक करीत असता माराच्या काखेतून वीणा खाली पडला, आणि तो दु:खी मार तेथेच अंतर्धान पावला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*संग्रमातून पराजय पावून मागे फिरावयाचे नाही. यासाठी मुंज नावाचे गवत डोक्याला बांधून प्रतिज्ञा करीत असत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या सुत्ताचे भाषांतर ललितविस्तराच्या अठराव्या अध्यायात आले आहे. त्यावरून याचे प्राचीनत्व सिद्ध होते, वर दिलेला भयभैरवसुत्तातील मजकूर वाचला असता या साध्या रूपकाचा अर्थ सहज लक्षात येतो. मनुष्यजातीच्या कल्याणाला कोणी पुढे सरसावला असता त्यावर पहिल्याने हल्ला करणारी मारसेना म्हटली म्हणजे कामोपभोगाची वासना होय. तिला दाबून पुढे पाऊल टाकतो न टाकतो तो (अरति) असंतोष उत्पन्न होतो. त्यानंतर भूक, तहान वगैरे एकामागून एक उपस्थित होतात आणि त्या सर्व वासनांवर व विकारांवर जय मिळविल्याशिवाय कल्याणप्रद तत्त्वाचा साक्षात्कार हे कधीही शक्य नाही. तेव्हा  बुद्धाने पराभव केला म्हणजे अशा मनोवृत्तीवर जय मिळविला असे समजावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel